विनय

By Admin | Updated: May 31, 2015 23:55 IST2015-05-31T23:55:49+5:302015-05-31T23:55:49+5:30

ज्या समाजानं ज्ञानदेवादी भावंडांचा अनन्वित छळ केला, त्यांच्या माता-पित्यास देहान्त प्रायश्चित्त दिलं, त्या समाजाला शिव्याशाप तर राहू द्या; परंतु कडक शब्दांतून

Modesty | विनय

विनय

डॉ. कुमुद गोसावी

आकाशात पौर्णिमेचं टिपूर चांदणं पूर्ण चंद्राची आभा वाढवतं तसं विद्याविभूषित माणसाचं विनयशील वागणं हे त्याचं भूषणच ठरतं. ‘विद्या विनयेन शोभते’ असं रत्नालंकारासारखं म्हटलं जातं. संत-महंतांची, ज्ञानी-विचारवंतांची, महान कलावंतांची चरित्रं, त्यांनी मळलेल्या वाटा आणि त्यांची भव्यदिव्य वाङ्मय दालनं बघितली की, त्यांच्यातील विनयाचं-विनम्रभावाचं दर्शन आकाशाला गवसणी घालून जातं!
ज्या समाजानं ज्ञानदेवादी भावंडांचा अनन्वित छळ केला, त्यांच्या माता-पित्यास देहान्त प्रायश्चित्त दिलं, त्या समाजाला शिव्याशाप तर राहू द्या; परंतु कडक शब्दांतून तक्रारही ज्ञानदेवांनी केलेली नाही! हा केवढा विनय म्हणायचा, ज्ञानदेव माउलींचा!
‘ज्ञानाचा एका’ म्हणणाऱ्या संत एकनाथांच्या अंगावर वारंवार थुंकणाऱ्या यवनावर न रागवता उलट त्याच्या थुंकण्यामुळे आपल्याला अनेकवार गोदास्नान घडलं, म्हणून त्याला धन्यवाद दिले! शांतिब्रह्म नाथांच्या या टोकाच्या विनम्रभावानं त्या यवनाचं मनपरिवर्तन झालं! तो त्या रात्री आपण होऊन नाथांच्या कीर्तनास नाथवाड्यात गेला!
याउलट अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली माणसं आपण बघतो. अहंतेच्या आहारी जाऊन सत्ताधीशांची मुजोरी आपण अनुभवतो. भोळ्याभोळ्या माणसांची समाजात होणारी फसवणूक आपण पाहतो. कधी एखादी भाजीवालीदेखील आपल्याशी अरेरावीची भाषा वापरते. तरीही गरजू ग्राहक तिच्याकडून भाजी विकत घेतो. त्यामुळे ती ताठच राहते! मात्र एखाद्या बड्या अधिकाऱ्याकडं वा दिग्गज कलावंताकडं दबकतच जातो आणि त्यांच्या विनयशील वृत्तीनं आपण भारावून जातो! ‘प्रेमानं जग जिकता येतं!’ असं म्हणतात; पण त्या पे्रमाची वीण जर विनयाच्या धाग्यांनी विणलेली नसेल तर ती चटकन उसवून जाण्याची शक्यता असते.
वीर हनुमंत श्रेष्ठ दर्जाचे संगीतज्ञ होते! एकदा हिमालयावर एकांतात ते वीणावादन करतात. भजनात तल्लीन होतात! नारद तिथं येतात, आपली वीणा बाजूच्या खडकावर ठेवून हनुमंताचं रामभजन ऐकतात. हनुमंताला भान नसतं. त्यांच्या त्या आर्द्र अंत:करणाच्या भजनानं तो खडक पाझरतो! नारदाची वीणा त्या पाझरणाऱ्या खडकात असते! हनुमंताचं भजन थांबताच तो खडक पूर्ववत होतो! नारद वीणा आणायला जातात. (आत्मप्रौढीनं) म्हणतात, ‘हनुमंता! मी वीणेवर भजन गातो म्हणजे खडक द्रवेल, मग माझी वीणा मी घेईन.’ नारद तास-दीड तास गातात! मात्र खडक पाझरत नाही! हनुमान विनयानं गातात व खडक द्रवतो! नारदाचा अहंकार गळून पडतो! खरंच इथं हा विनयाचा फार मोठा विजयच म्हणायला हवा!

Web Title: Modesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.