अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:17 IST2025-06-05T11:16:17+5:302025-06-05T11:17:59+5:30
राजकीय नेतेही चांगल्या संधीसाठी सहज पक्षांतर करत विचारधारेचा ‘त्याग’ करतात असा हा काळ!

अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट
तीन वर्षांहून अधिक काळ एकाच जागी नोकरी आजकाल कुणी करत नाही आणि कुणी असं ‘चिकटलं’च तर त्या व्यक्तीला त्याचे समवयस्क सहकारीच ‘आऊटडेटेड’ लेबल लावतात. रिस्क घ्यायची हिंमत नाही म्हणून हिणवतात. ज्या संस्थेत ती व्यक्ती कार्यरत असते तेथील व्यवस्थापन आणि वरिष्ठही अनेकदा गृहित धरतात की ‘बाहेर’ कुणी बोलावत नाही म्हणून ‘टिकून’ आहे. एवढंच कशाला जनतेच्या ‘विकासा’चं उदात्त स्वप्न उराशी बाळगून राजकीय नेतेही चांगल्या संधीसाठी सहज पक्षांतर करत विचारधारेचा ‘त्याग’ करतात असा हा काळ!
त्याच काळातला एक तरुण १८ वर्षांपूर्वी ऐन तारुण्यात, तेही ‘अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप’ जिंकून आलेला असताना एका फ्रँचाइजीसाठी निवडला जातो. त्याच्याच राज्याची टीम त्याच्यावर भरवसा ठेवत नसताना दूर दक्षिणेतला एक संघ या तरुणावर भरवसा ठेवून त्याला संघात घेतो आणि तोही तिथे तब्बल अठरा वर्षे टिकून राहतो, ही गोष्ट खरीच चकित करणारी ! त्याकाळी त्या तरुणाचे पाळण्यातले बहकलेले पाय पाहून कुणाला वाटलंही नव्हतं की त्याच्यात ‘क्रिकेटचा किंग’ बनण्याची क्षमता आहे. पण, १८ वर्षं त्याच तरुणाने तासून काढलं स्वत:ला ! बाहेर अत्यंतिक आकर्षक आणि घसघशीत संधी असताना त्यानं आपली ‘निष्ठा’ बदलली नाही. संघबदल स्वीकारला नाही. त्याचे किती सहकारी निवृत्त झाले, काही अन्य संघात जाऊन स्टार आणि चॅम्पियन झाले. पण, तो तिथंच थांबला.
दरवर्षी नव्या ऊर्जेनं आणि नव्या क्षमतेनं परत परत येत राहिला, हरत राहिला. त्याच्या हरण्याची लोकांनी टिंगल केली, अपमान केले. पण, तो डगमगला नाही. पुन्हा पुन्हा जिंकण्याचं स्वप्न घेऊन आला आणि झुंजत राहिला. अपुऱ्या स्वप्नांचं ओझं घेऊन जगणं सोपं नसतंच, त्याच्यासाठीही नव्हतं. म्हणून तर ज्याक्षणी आपलं स्वप्न साकार होताना दिसलं, त्याक्षणी मैदानातच त्याचे डोळे भरून आले. त्याचं नाव विराट कोहली! ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता’ हे वाक्य त्यानं केवळ आपल्या मेहनतीनं, निष्ठेनं आणि संयमानं खोटं ठरवलं आहे. आणि रॉयल चॅलेंजर्सच्या विजयात त्याला साथ दिली रजत पाटीदार, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा ते सुयश शर्मा या तरुण खेळाडूंनी! म्हणायला उत्तर भारतात घरं असणाऱ्या या खेळाडूंनी दक्षिण भारतीय संघात खेळत ‘भारतीय’ माणसांना देशभर आनंद साजरा करण्याची संधी दिली.
यावेळच्या आयपीएलमध्ये ‘आरसीबी’च कशाला अगदी पंजाब संघाचं नेतृत्वही श्रेयस अय्यर नावाचा एक मराठी मुंबईकर तरुण करत होता आणि त्या संघातूनही किमान तीन मराठी खेळाडू खेळले. देशावर युद्धाचं संकट असताना थांबलेली ही स्पर्धा भारतीयत्वाची आणि खिलाडू वृत्तीची नवी कहाणी सांगून गेली! लहानशा शहरातले, खेड्यापाड्यातले तरुण विलक्षण जिद्दीने खेळले. वैभव सूर्यवंशी नावाच्या कोवळ्या तरुणापासून महेंद्रसिंग धोनी नावाच्या दिग्गजापर्यंत. विलक्षण, दर्जेदार क्रिकेट पाहण्याचं सुख या आयपीएलनं सर्वांना दिलं. तसंही टी-ट्वेण्टी क्रिकेट म्हणजे २० षटकांतलं मनोरंजन, त्यातही खेळ पूर्णत: बॅटर्सला झुकतं माप देणारा ही टीका नेहमी होतेच, मात्र क्रिकेटपेक्षा मोठं आणि क्रिकेटपेक्षा जादुई कुणी नाही, हा अनुभव या स्पर्धेनं पुन्हा अधोरेखित केलं.
अडीचशे धावांचा पाठलागही शक्य झाला आणि शे-सव्वाशे धावांतही संघ धारातीर्थी पडले. भारतात सर्वदूर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठी संधीची कवाडं खुली होत होत आता तर लहान शहरातली मुलंच या स्पर्धेवर आपला ठसा उमटवताना दिसली. फक्त ते होताना, त्याच अगदी गावखेड्यातही स्मार्टफोनवर ‘जुगार’ खेळणारी क्रिकेट ॲप्स पोहचली, अधिक पैसा कमावण्याचं ‘ड्रीम’ घेऊन ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या ‘सर्कल’ पर्यंत लाखो माणसं खेचली गेली आणि फक्त ४९ रुपयांचं आमिष दाखवून हातातले फोन जुगाराचे अड्डे बनत गेले. आवडत्या संघावरची निष्ठा नि प्रेम जुगारी ॲप्सनी मोडीत काढलं. एकीकडे निष्ठा, मेहनत, संयम यांचा विजय; तर दुसरीकडे चार घटका मनोरंजन आणि जुगारी संधिसाधू वृत्तीचा जल्लोष. ज्याच्या संयमाची वाहवा करत ‘विजय’ साजरा करण्यासाठी रस्त्यावर गर्दी लोटली, त्याच विराटच्या चाहत्यांच्या अतिरेकी आणि उथळ उत्साहाने चेंगराचेंगरी होऊन आयपीएलच्या जल्लोषाला गालबोट लावले; हा ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ!