शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : सब का साथ, सब की सरकार!

By संजय आवटे | Updated: June 8, 2024 10:12 IST

Lok Sabha Election Result 2024 : एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडूंच्या सोबतीने सरकार चालवण्याचा प्रवास ‘अग्निपथा’वरचाच असेल!

- संजय आवटे(संपादक, लोकमत, पुणे)

सत्तेच्या परिघापासून कोसो दूर असलेल्या भारतीय जनसंघाला सत्तेची चव सर्वप्रथम चाखवली ती समाजवाद्यांनी. काँग्रेस आणि त्यातही इंदिरा गांधींना विरोध हेच एकमेव सूत्र असलेल्या विरोधकांनी तेव्हा कोणताच विधिनिषेध बाळगला नाही. १९६२ नंतर बिगर काँग्रेसवादाचा सिद्धांत राममनोहर लोहियांनी मांडला आणि त्याचा प्रमुख लाभार्थी पुढे भाजपच ठरला.  त्यामुळेच भारतीय जनसंघाला पहिल्यांदा सत्ता मिळू शकली. जनता पक्षाचे आघाडी सरकार १९७७ मध्ये स्थापन झाले.

मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले. मात्र, जनता सरकार कोसळले. जनता पक्ष संपल्यात जमा झाला. मग तेच नाव घेऊन उभा राहिलेला भारतीय जनता पक्ष सर्वदूर पसरत गेला. डाव्यांची शकले होत रोज नवा पक्ष स्थापन होत गेला! महाराष्ट्रात आघाडीचा पहिला प्रयोग रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांनी १९७८मध्ये एकत्र येऊन केला खरा; पण त्याच वर्षी ‘समाजवादी’ शरद पवारांच्या पुलोदने जनसंघाला पहिल्यांदा मंत्रालय दाखवले. नंतरच्या भाजपने मग तिथे मुक्कामच ठोकायची तयारी केली, तेव्हा पवारांनीच त्यांना तिथून बाहेर काढले. 

१९७७ मध्ये सत्तेची ऊब अनुभवल्यानंतर जनसंघ स्वस्थ बसला नाही. त्याच्या नव्या अवताराने, अर्थात भारतीय जनता पक्षाने त्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहाची जागा बळकावली. १९८४ मध्ये दोन जागांवरून २०१९ मध्ये ३०३ जागा मिळेपर्यंत भाजपची मजल गेली. २०२४ च्या निवडणुकीत मात्र भाजपला २४० जागांवर थांबावे लागले. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता तर मिळवलीच, पण विरोधकांची दाणादाण करून टाकली. दहा वर्षांनंतर ही अशी पहिली लोकसभा असेल की जिथे विरोधी पक्षनेता असेल. आघाडीमधील घटक पक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही आणि चालवताही येणार नाही. 

 या निवडणुकीत एनडीए आघाडी चर्चेत नव्हती. मुद्दा भाजपचा, खरे तर मोदींचा होता. विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापली. ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ अशी ही आघाडी तिच्या नावामुळेच चर्चेत आली. संपूर्ण देश सत्तेच्या विरोधात लढतो आहे, असे वातावरण विरोधकांनी तयार केले. ‘इंडिया विरुद्ध मोदी’ असाच हा सामना होता.  प्रचारसभांमध्ये मोदींनी स्वतःचे नाव ७५८ वेळा घेतले, पण ‘एनडीए’चा उल्लेख अपवादानेच झाला. निकाल लागला आणि मग मात्र ‘एनडीए विरुद्ध इंडिया’ असे आकडे येऊ लागले. १९८४ला राजीव गांधींना ४१४ जागा मिळाल्या. त्यानंतर तीन दशके पुरेसे राजकीय भांडवल कोणालाच मिळाले नव्हते. २०१४ मध्ये भाजपने ते मिळवले आणि आता आघाडी सरकारचा काळ इतिहासजमा झाल्याचे अभ्यासकही सांगू लागले. मात्र, आता ते पर्व पुन्हा आले आहे. 

नितीशकुमार, चंद्राबाबू आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याशिवाय भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. हे तीनही शिलेदार वेगवेगळ्या धारणांचे आणि प्रदेशांचे आहेत. नितीशकुमारांना समान नागरी कायदा नको असेल अथवा जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावर त्यांचा पक्ष ठाम असेल. हिंदी पट्ट्यातील राष्ट्रवादाला चंद्राबाबूंचा विरोध असेल. मुंबईला स्वतंत्र दर्जा द्यायचा मुद्दा उद्या पुढे आलाच तर शिंदेंचा त्याला आक्रमक विरोध असेल. एखादा पक्ष ‘अग्निपथ’ला विरोध करून हे सरकार चालवणे हाच ‘अग्निपथ’ असल्याची जाणीव भाजपला करून देईल. त्यामुळे, विरोधक सोडाच, घटक पक्षांना पटवून दिल्याशिवाय कोणताही निर्णय भाजपला घेता येणार नाही. 

२००४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर, भारत-अमेरिका आण्विक कराराच्या मुद्द्यावरून तेव्हा डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी सरकार तरले आणि सलग दहा वर्षांत या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. मनरेगा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा, आधार, आण्विक करार, अर्थकारणाला गती हे सारे त्याच काळातले. अर्थमंत्री असताना ज्या दूरगामी आर्थिक सुधारणा मनमोहन सिंगांनी केल्या, ते १९९१ मधील पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकार हेही आघाडीचेच. स्वबळावर सरकार चालवणे हे कॉंग्रेसचे जन्मजात वैशिष्ट्य. त्याला विरोध म्हणून आघाडीचे प्रयोग भारतीय राजकारणात झाले. १९९९ चा अपवाद वगळता, आघाडी सरकारांचे प्रयोग यशस्वी केले काँग्रेसनेच. 

१९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले खरे, पण त्यापूर्वी त्यांची दोन सरकारे अल्पावधीत कोसळली. १९७७ चा विरोधकांचा प्रयोग तर सपशेल अपयशी ठरला होताच, पण त्यानंतर १९८९ मधील व्ही. पी. सिंग, १९९० मध्ये चंद्रशेखर; तर देवेगौडांचे १९९६ मधील, इंद्रकुमार गुजरालांचे १९९७ मधील असे सगळे आघाडी प्रयोग अल्पजीवी ठरले. या खेळांमध्ये पारंगत  नितीश आणि नायडू आता २०२४ च्या नव्या खेळात सहभागी झाले आहेत. ज्या मंडल-कमंडल राजकारणाने भारतात आघाड्यांचे पर्व सुरू झाले, त्याचा  दुसरा सिझन सुरू झाला आहे. एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडू यांना सोबत घेऊन सरकार चालवताना मोदींना आपले ‘मोदीपण’ विसरावे लागणार आहे!

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा