शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

न्याय झाला, पण...

By admin | Updated: September 14, 2015 00:47 IST

मुं बईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांत ११ जुलैै २००६ रोजी झालेल्या भीषण साखळी स्फोटांच्या खटल्याचा निकाल लागल्याने ‘अखेर न्याय झाला’ असे म्हणता येईल.

मुं बईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांत ११ जुलैै २००६ रोजी झालेल्या भीषण साखळी स्फोटांच्या खटल्याचा निकाल लागल्याने ‘अखेर न्याय झाला’ असे म्हणता येईल. मात्र हे प्रकरण असो वा त्याआधीचे १९९३ सालचे साखळी बॉम्बस्फोटांचे प्रकरण असो, निकाल लागून आरोपींना दोषी ठरवले गेले असले, तरी अशी निर्णय लागलेली प्रकरणे हा अपवाद आहे. २००६ च्या बॉम्बस्फोटांंआधीच मुंबईतील मुलुंड व घाटकोपर रेल्वेस्थानकांबाहेर स्फोट झाले होते. मात्र त्याची प्राथमिक स्तरावरची न्यायालयीन सुनावणीही अद्याप पुरी झालेली नाही. असे होण्याची जी महत्त्वाची कारणे आहेत, त्यापैकी मुख्य म्हणजे दहशतवादाचे बदलत गेलेले स्वरूप आणि हे आव्हान पेलून त्यानुसार तपासाच्या पद्धती आणि तंत्र बदलण्यास होत असलेला विलंब. उपनगरी रेल्वेगाड्यांतील बॉम्बस्फोटांचा तपास हे याचे बोलके उदाहरण आहे. हे स्फोट झाल्यावर मुंबई पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा आणि राज्याचे दहशतवादविरोधी पथक या दोघांनीही समांतर तपास सुरू केला. त्यात दहशतवादविरोधी पथकाने ‘स्टुडण्ट्स इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या संघटनेच्या तरुणांना ताब्यात घेतले, तर गुन्हे अन्वेषण विभागाने ‘इंडियन मुजाहिदीन’ या संघटनेशी संबंधित असलेल्यांना अटक केली. यापैकी खरे आरोपी कोण हा वादाचा मुद्दा निर्माण झाला. तसा तो होण्याचे कारण अशा दहशतवादामागे असलेल्या पाकच्या बदललेल्या डावपेचांची पुरेशी दखल न घेता केलेला तपास हे आहे. हेच नेमके पाकने काश्मीरमध्येही केले होते. खोऱ्यात सुरुवातीला काश्मीरच्या आझादीची मागणी करणाऱ्या संघटना व गट यांच्या कार्यकर्त्यांना पाक हाताशी धरत होता. आझादीची मागणी राजकीय स्वरूपाची होती. तिला धार्मिक रंग देण्याची, म्हणजेच आजच्या परिभाषेत जिहाद पुकारण्याची, या संघटना व गट यांची तयारी नव्हती; शिवाय काश्मीरला आझादी देण्यास पाकची कधीच तयारी नव्हती व आजही नाही. या संघटना व गट आपल्या आदेशानुसार वागायला तयार होत नसल्याचे दिसून येऊ लागल्यावर पाकने त्यांना पद्धतशीरपणे दूर करण्याचे पाऊल उचलले. एवढेच नव्हे, तर या संघटना व गट यांच्या कार्यकर्त्यांची माहिती भारतीय लष्कराला देण्याची व्यवस्थाही पाकने केली. त्यामुळे या संघटना व गट यांचे असंख्य कार्यकर्ते लष्कराशी झालेल्या चकमकीत मारले गेले. मग पाकने ‘इस्लामी’ संघटना काश्मीर खोऱ्यात उभारण्यास सुरुवात केली. काश्मीरच्या मूळच्या ‘राजकीय’ प्रश्नाला ‘धर्मा’चा रंग चढू लागला, तो तेव्हापासून. हेच ‘सिमी’ व ‘इंडियन मुजाहिदीन’बाबत घडले आहे. मुस्लीम विद्यार्थ्यांची संघटना असे ‘सिमी’चे स्वरूप होते. मुस्लीम विद्यार्थ्यांचे हक्क जपणे, त्यांच्यावर अन्याय होत असल्यास त्याच्या विरोधात आवाज उठवणे अशा कामात ही संघटना होती; मात्र बाबरी मशिदीचे राजकारण जसे तापू लागले, तसे एकूणच मुस्लीम समाजात आणि बहुसंख्य हिंदूंतही जशी भावनात्मक खळबळ माजत गेली, तशी या संघटनेतील अनेकांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. ‘मुस्लिमांवरच्या अन्याया’ला वाचा फोडणे, त्याच्या विरोधात लढणे अशा कामात या संघटनेतील काही कार्यकर्ते स्वत:ला झोकून देऊ लागले. मात्र ही संघटना ‘धार्मिक’ वा ‘जिहादी’ नव्हती. तिच्या मागण्या ‘राजकीय’ होत्या. ‘सिमी’चे कार्यकर्ते स्वत:ला ‘मुजाहिदीन’ म्हणवून घेत नव्हते. पाकने या तरूणांना पहिल्यांदा हाताशी धरले आणि नंतर काश्मीरमधील संघटनांप्रमाणेच ‘सिमी’नेही आपली ‘राजकीय’ भूमिका सोडण्यास विरोध दर्शविल्यावर पाकने ‘इंडियन मुजाहिदीन’ उभी केली. वस्तुत: हा फरक लक्षात घेऊन दहशतवादी हल्ल्यांचा तपास करताना योग्यरीत्या दिशा बदलली असती, तर एकाच प्रकरणात दोन प्रकारचे आरोपी पकडले जाण्याची वेळ आली नसती. जाणते-अजाणतेपणी मुस्लीम जनमनात अन्याय होत असल्याची जी भावना रुजत गेली आहे, तिला खतपाणी घालून स्थानिकांचेच दहशतवादी गट उभे करण्याला पाक गेल्या काही वर्षांत प्राधान्य देत आले आहे. ‘हिंदू’ भारतात मुस्लीम असुरक्षित आहेत आणि तेच सरकारच्या विरोधात स्वत:हून शस्त्रे हाती घेत आहेत, असे जगाला दाखवून देण्याचा पाकचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच असे बॉम्बस्फोट वा दहशतवादी हल्ले किंवा अलीकडच्या काळात काही तरुणांनी इराक-सीरिया येथे जाऊन ‘इसिस’मध्ये सामील होण्याचा केलेला प्रयत्न असे प्रकार रोखायचे असतील, तर मुस्लीम समाजमनातील खळबळ जाणून घेण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी तपास यंत्रणांना मुस्लीम समाजात काय घडते आहे, याची इत्थंभूत माहिती असायला हवी. म्हणजेच त्या समाजातील निदान काही गटांना पोलिसांबद्दल, खरे तर भारतीय राज्यसंस्थेबद्दल, विश्वास वाटायला हवा. अन्यथा असे हल्ले झाले की, मुस्लीम समाजातील काहींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून तपास करण्याची जुनीच पद्धत सुरू राहील. त्यामुळे दोषींना शिक्षा होत नाही, ही बहुसंख्याक समाजातील भावना जशी प्रबळ होईल, तशी मुस्लीम जनमनातील अन्यायाच्या भावनेला आणखी खतपाणी मिळेल. म्हणून या एका खटल्याचा निकाल लागून न्याय झाला असला, तरी अजून बरीच मजल मारायची आहे, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.