उदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 06:40 AM2018-08-21T06:40:44+5:302018-08-21T06:41:57+5:30

अटलजींच्या कवितेमधून त्यांच्या अंतर्मनाचे जसे दर्शन घडते तसेच त्यांच्या विशाल हृदयाचेही दर्शन घडते.

india is missing Liberal leader after atal bihari vajpayees death | उदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते!

उदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते!

Next

- अश्वनीकुमार

अटलजींच्या कवितेमधून त्यांच्या अंतर्मनाचे जसे दर्शन घडते तसेच त्यांच्या विशाल हृदयाचेही दर्शन घडते. त्यामुळेच अटलजींची ओळख त्यांच्या पक्षापेक्षा वेगळी समजली जाते. त्यामुळे त्यांचा स्वीकार पक्षतीतपणे होत असतो.

स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे विशाल व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे गौरवपूर्ण जीवन यांची मांडणी एका लेखातून करणे अवघड आहे. त्यांच्या मृत्यूने सारे राष्ट्र शोकाकूल झाले होते व त्यांना भावपूर्ण निरोप देण्यातून त्यांच्याविषयीची कृतज्ञता राष्ट्राने व्यक्त केली होती. त्यांच्याविषयी ज्या भावना व्यक्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि त्यांच्या विचारांनी या देशाच्या सार्वजनिक जीवनावर अमीट ठसा उमटविल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यांनी आयुष्यभर त्यांच्याशी आणि त्यांच्या पक्षाशी वैचारिक व राजकीय संघर्ष केला, त्याही व्यक्ती अश्रूभरल्या डोळ्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आहेत. देशातील प्रत्येक वर्तमानपत्राच्या आणि टेलिव्हिजन चॅनेलच्या माध्यमातून विभिन्न वर्गाशी जुळलेल्या नागरिकांनी माजी पंतप्रधानांना आपली श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्वभावात असे कोणते वैशिष्ट्य होते ज्याने त्यांना अजातशत्रू बनवले होते? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. आज आपला देश अशा नेतृत्वाच्या शोधात आहे जे आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि संवैधानिक मर्यादा जाणू शकेल आणि आपल्या देशाच्या राजकारणात त्यांचा समावेश करू शकेल, जसा प्रयत्न अटलजींनी आपल्या काळात केला होता. पक्षीय अभिनिवेशाच्या पलीकडे जात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या काव्यरचनांमध्ये मानवतेचे जे दर्शन घडते त्याच्याशी प्रत्येक देशवासी स्वत:ला जुळवून घेऊ शकत होता.
त्यांच्या ‘गीत नया गाता हूँ’ या कवितेच्या काही ओळी या ठिकाणी उद्धृत करीत आहे -
टुटे हुए इस सपने की सुने कौन सिसकी
अन्तर की चीर व्यथा, पलकों पर ठीठकी
हार नहीं मानूंगा, रार नही बनूंगा
काल के कपाल पर लिखता, मिटाता हूं
गीत नया गाता हूँ!
या ओळींमध्ये उद्ध्वस्त स्वप्नांमुळे झालेल्या वेदनेचे दु:ख जसे आहे तसेच आव्हानांनी भरलेल्या जीवनात पराभव न पत्करण्याचा संकल्पही आहे. त्याच आवेशात ते पुढे लिहितात,
बात ऐसी नही कि कोई गम भी नही
दर्द अपने- पराए कुछ कम भी नही,
हर चुनौती से दो हाथ मैंने किये
आंधियों में जलाए हैं बुझते दिये
आज झकझोडता तेज तूफान है
नाव भँवरों की बाँहों में मेहमान है!
पर पाने का कायम मगर होसला
देख तेवर तूफाँ का,
तेवरी तन गई, मौत से ठन गई
और लगी ऐसी नजर
बिखरा शीशे का शहर
अपनों के मेले में, मीत नही पाता हूं
गीत नही गाता हूं.
कवी अटलजी यांनी लिहिलेल्या या ओळींमध्ये संघर्षाचे आणि निश्चयाचे दर्शन जसे घडते तसेच त्यांच्या हृदयातील दु:खाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उदासीनतेची जाणीवही दिसते. ही वेदना एका उदारहृदयी मानवाची आहे ज्याला सत्तेच्या दालनातही मानवी दु:खाची तीव्र जाणीव होत असते. या वेदनेच्या जाणिवेने तसेच संवेदना आणि मानवता या भावनांनी राजकारणाच्या काठिण्याला उदारतेच्या भावनांनी गोंजारले. त्यांचे नरमपंथी रूप हा काही देखावा नव्हता किंवा मुखवटा नव्हता. त्यांच्या कवितेमधून त्यांच्या अंतर्मनाचे जसे दर्शन घडते तसेच त्यांच्या विशाल हृदयाचेही दर्शन घडते. त्यामुळेच अटलजींची ओळख त्यांच्या पक्षापेक्षा वेगळी समजली जाते. त्यामुळे त्यांचा स्वीकार पक्षतीतपणे होत असतो.
अटलजींना आपल्या दीर्घ आयुष्यात अनेक चढउतार पहावे लागले. अपमान सोसावे लागले. कटु शब्दांचे वार झेलावे लागले. अभद्र टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले पण त्यांनी आपल्या विरोधकांच्या संदर्भात कधीही अपशब्दांचा वापर केल्याचे मला आठवत नाही. मला आठवते की, १९७७ साली आणीबाणीनंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा माझे स्वर्गीय पिताजी पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांची लढत जनता पक्षाच्या उमेदवाराशी होती. त्यांच्या समर्थनार्थ अटलजींनी पठाणकोट येथे निवडणूक प्रचारसभेत भाषण केले. पण आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस उमेदवाराविषयी एकदाही कटु शब्दांचा वापर केला नाही. तसेच कुणावार व्यक्तिगत टीका केली नाही. मी त्यांचे भाषण लोकांच्या गर्दीत उभे राहून ऐकले. त्या भाषणाची छाप आजही माझ्या मनावर कायम आहे.
२००२ साली काँग्रेस पक्षाने मला राज्यसभेचे सदस्यत्व दिले. त्यामुळे पंतप्रधान वाजपेयींना भेटण्याची संधी मला मिळत राहिली. मी त्यांना नमस्कार करायचा तेव्हा त्यांचा स्नेहभरा हात ते माझ्या खांद्यावर ठेवीत. त्यावेळी राज्यसभेच्या दालनात त्यांच्यासोबत चालण्याची मला संधी मिळायची. राज्यसभेत भाजपा सरकारवर कठोर टीका करूनही अटलजींच्या माझ्यावरील मैत्रीत मला कधीही कमतरता जाणवली नाही. ते धैर्यवान होते तसेच मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांच्यातील या गुणांमुळे सर्व पक्षांचे नेते त्यांना आदर देत. कारगील युद्धावरून काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी अटलजींवर अवांच्छनीय टीका केली तेव्हा सोनियाजींनी असे न करण्याबद्दल स्पष्ट शब्दात बजावले. त्यावेळी मी पक्षाचा प्रवक्ता होतो.
आपली परिपक्व लोकशाही आणि तिच्या संवैधानिक परंपरा ही आपली फार मोठी उपलब्धी आहे. आपला देश आज कुशल नेत्याच्या शोधात आहे. अशावेळी कवी इक्बाल यांच्या बहुचर्चित ओळी मला आठवतात. राष्टÑाचा नेता कसा असावा याचे वर्णन करताना, ‘‘उच्च विचारसरणी, मधुर भाषा आणि लोकांचे हृदय जिंकण्याची क्षमता आणि गतिमानता हीच अशा नेत्याची ओळख’’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आज राष्टÑाला अटलजींची उणीव जाणवते आहे. राजकीय जीवनाची प्रेरणा त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंपासून मिळाली होती हे सर्वांना ठाऊक आहे. मनुष्य हा अखेर अपूर्णच असतो. आपली अपूर्णता दूर करण्याचा संकल्प करण्यातच व्यक्तीची महानता असते. त्या कसोटीवर अटलजींचा समावेश देशाच्या महनीय व्यक्तिमत्त्वात करता येईल. त्यांना निरोप देताना सर्व पक्षाचे लोक एकत्र आले होते. त्यामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व झाली. जाताना जणू ते म्हणत होते, ‘खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते हैं’. भविष्यात राष्ट्राला समविचारी, सहृदयी, लोकशाही परंपरांविषयी आस्था बाळगणारे नेतृत्व मिळणे हीच अटलजींना श्रद्धांजली ठरेल.

(लेखक माजी विधिमंत्री आहेत)

Web Title: india is missing Liberal leader after atal bihari vajpayees death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.