आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

By विजय दर्डा | Published: March 25, 2024 06:46 AM2024-03-25T06:46:21+5:302024-03-25T06:47:56+5:30

होळी हा निसर्गाशी घट्ट जोडलेला सण तर आहेच; पण मानवी जीवनातल्या अनेकानेक रंगांचा बहारदार, दिलखुलास उत्सवही रंगतोच की त्या दिवशी!

Holi Special Article : If there are no colors in life, then... | आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

- डाॅ. विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

होळीच्या रंगांनी पहिल्यांदा चिंब भिजलो, तेव्हा काय वयाचा होतो; हे आता नीटसे आठवत नाही. नक्कीच ते बालवय असणार; प्रत्येक गोष्ट आठवणीच्या कुपीत भरून ठेवण्याची सुरुवात तेव्हाच तर होत असते. लहानपणी तन-मनाला लागलेल्या रंगांनी पुढे आयुष्यभर माझी सुंदर सोबत केली. आजही माझा आवडता सण होळीच आहे. आठवणीच्या आरशात पाहतो, तेव्हा होळीचे कितीतरी रंग उलगडत जातात. होळी खूप खेळलो. रंगांची होळी खेळलो. भावनांनी भरलेली होळी खेळलो. प्रेमाची, आपलेपणाची होळी खेळलो. जे दूर होते त्यांना जवळ आणण्याची होळी खेळलो. फुले आणि केशराच्या रंगांची होळी खेळलो. आपल्या माणसांना जवळ घेऊन होळी खेळलो. भांगविरहित ठंडाई पिऊन मस्तीची होळीही खेळलो. 

कधीकधी मनात येते, हे रंग नसते तर आपले जगणे कसे झाले असते? रंग नसते तर हा संपूर्ण निसर्ग आहे तसा नसता. मग कदाचित माणूसही असा नसता! निसर्गाने आपल्यावर रंगांची अशी काही बरसात केली आहे की जीवनाचे हरेक पान खुशीने भरून जाणारच जाणार! होळीच्या दिवशी दरवर्षी आपण हाच अनुभव घेतो.  यवतमाळमध्ये आमच्या घराबाहेर होळीच्या दिवशी शानदार उत्सवी वातावरण असायचे. माझे प्रिय बाबूजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्याबरोबर होळी खेळण्यासाठी प्रत्येक वर्गातले, जातीतले आणि धर्मातले लोक जमत असत. आपलेपणाच्या रंगाने सगळे रंगून प्रत्येक धर्माचा माणूस प्रेमरंगात बुडून जावा असाच हा सण आहे. राजकीय मैदानातले विरोधकही होळीचा सण साजरा करण्यासाठी यायचे. सगळ्यांसाठी ठंडाई आणि गोडाधोडाची रेलचेल असायची. ते दिवस आठवले, की हरिवंशराय बच्चनजींचे शब्द आठवतातच!

होली है तो आज अपरिचित से परिचय करलो, 
जो हो गया बिराना 
उसे भी अपना कर लो.. 
होली है तो आज शत्रू को 
बांहों में भर लो, 
होली है तो आज मित्र को 
पलकों में धर लो.. 
होळी साजरी करण्यामागे सामाजिक सौहार्दाचा धागा नक्की असणार. एक असा दिवस निश्चित करायचा ज्या दिवशी सगळे लोक वैरभाव विसरून एक होतील.

रंगांची बरसात मनसोक्त अनुभवता यावी म्हणून आम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घालायचो. त्यावेळी रसायनमिश्रित रंग नसायचे. आम्ही मित्रमित्र पळसाची लाल फुले गोळा करायला जंगलात जायचो. या फुलांपासून रंग तयार व्हायचा. हळदीच्या पाण्याची पिंपे भरलेली असत. आपले सण निसर्गाशी जोडलेलेच ठेवले पाहिजेत हा विचार बालपणाच्या त्या दृश्यांनी माझ्या मनावर ठसवला. पळसाची फुले आजही भरपूर फुलतात; पण कोण तिकडे लक्ष देते? गुलालाच्या बाबतीत थोडी जागृती झालेली आहे. हल्ली नैसर्गिक गुलाल वापरण्याकडे कल वाढतो आहे; पण तरीही ॲल्युमिनियमच्या रंगांनी भरलेले चेहरे पाहिले, की अशा लोकांची मला कीव येते. रसायनमिश्रित रंगांमुळे दरवर्षी कित्येकांना आपले डोळे गमवावे लागतात.  आपण नैसर्गिक रंगांनीच होळी साजरी केली पाहिजे. होळी पेटवण्यासाठी  झाडेही तोडता कामा नयेत. सण हे निसर्गाच्या संरक्षणासाठी असतात, विनाशासाठी नव्हे!

माझी आई जिला मी प्रेमाने बाई म्हणतो, मला होळीशी जोडलेल्या अनेक गोष्टी सांगायची. तिच्या एका गोष्टीत सावळ्या रंगाचा कृष्ण आईककडे तक्रार करीत असे, की राधा इतकी गोरी आणि मीच सावळा का? तेव्हा आई म्हणते, मग तू राधेला आपल्या रंगांनी रंगवून टाक... आपल्या लोकसंस्कृतीमध्ये राधा-कृष्णाचे प्रेम होळीचे प्रतीक झाले आहे. आजही आपल्या होळीच्या बहुतेक गाण्यांमध्ये याच प्रेमाचा रंग असतो. आपली चित्रपटगीते तर वृंदावनातल्या होळीच्या गाण्यांनी बहरलेली  आहेत.
वय थोडे पुढे सरकले, तसा मनात विचार आला की आपल्या सर्वांना आवडणारा हा उत्सव किती जुना असेल? काही नेमका पुरावा तर नाही; पण अशी माहिती नक्की मिळते की इसवी सनाच्या ६०० वर्षे आधी भारतीय सांस्कृतिक परंपरेत होळीची प्रथा होती. कालिदासाने रचलेला ग्रंथ ‘कुमारसंभवात’ होळीचा संदर्भ येतो. चंदबरदाईने हिंदीतले जे पहिले महाकाव्य ‘पृथ्वीराज रासो’ लिहिले त्यातही होळीचे अद्भुत वर्णन आहे. सूरदास, रहीम, रसखान, पद्माकर, मीराबाई किंवा कबीर या सगळ्यांनी होळीवर रचना केल्या आहेत. अनेक मुघल शासकही होळीचा उत्सव साजरा करत असत. बहादूर शाह जफरला तर होळी खूप आवडत असे. होळीच्या दिवशी त्याच्या दरबारी लोकांनी त्याला रंगवले तर किती आनंद व्हायचा. त्याने एक गाणे लिहिले आहे.

क्यों मो पे रंग मारी पिचकारी
देखो कुंवरजी दूंगी मै गारी 
अशा रचनांनी आपले साहित्य समृद्ध झाले आहे. भारतेंदू हरिश्चंद्र यांनी लिहिलेली एक कविता आमचे एक प्राध्यापक मला ऐकवत असत. जी मला आजही आठवते आणि खूप आवडते.
गले मुझको लगा लो ऐ दिलदार होली में,
बुझे दिल की लगी भी तो ऐ यार होली में..
नहीं ये है गुलाले – सुर्ख उडता हर जगह प्यारे, 
ये आशिक की है उमडी आहें आतिष बार होली में..
गुलाबी गाल पर कुछ रंग मुझको भी जमाने दो 
मनाने दो मुझे भी जानेमन त्यौहार होली में
चला, आपण सगळे जण एकत्र येऊन जीवनाचे प्रत्येक कोरे पान रंगांनी भरून टाकत राहू... प्रेम, स्नेह आणि आपलेपणाचे रंग आपल्या सर्वांच्या जगण्यात सदैव खुललेले राहोत!

Web Title: Holi Special Article : If there are no colors in life, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी 2024