शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

शड्डू, रुसवा आणि सायकलचा पाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:13 IST

खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार आणि खा. रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील तिघेही नेते काहीना काही कारणांनी कायम चर्चेत असतात. यावेळी या तिघांच्या तीन तऱ्हा.

- सुधीर महाजन खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार आणि खा. रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील तिघेही नेते काहीना काही कारणांनी कायम चर्चेत असतात. यावेळी या तिघांच्या तीन तऱ्हा. औरंगाबादचे हनुमानभक्त खासदार चंद्रकांत खैरे यांनी परवा ‘जयभद्र’ म्हणत रिकाम्या आखाड्यात शड्डू ठोकला. माझ्या विरोधात कोणीही उभे राहू द्या, अलाने-फलाने आले तरी चिंता नाही. कोणीही आला तरी त्याला धूळ चारू. त्यांच्या या हुंकाराने सारेच अचंबित झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांचे वारे सोडा साधी झुळूकही नसताना रिकाम्या मैदानात खैरे का जोर बैठका काढतात याचाच उलगडा कोणाला होत नाही. पालकमंत्री रामदास कदमांशी त्यांनी जुळवून घेतलेले दिसते. शिवाय शिवसेनेतही आलबेल आहे. महानगरपालिकेत आयुक्त बकोरियांची बदली झाल्याने कोंडी फुटली आहे. नाही म्हणायला कन्नडचे त्यांचे स्वपक्षीय आमदार हर्षवर्धन जाधव मात्र त्यांच्या मागे लागलेले दिसतात. खैरेंचा त्यांच्यावरील रोष हा त्या तालुक्यातील शिवसेनेचे वेगळे गणित मांडण्याचा जाधवांचा प्रयत्न आणि खैरेंना तेथे आपले वर्चस्व कायम ठेवायचे यातून एक गोष्ट झाली. जाधवांनी आपल्याच खासदारांची प्रकरणे बाहेर काढण्याचा सपाटा लावला. १९९९ साली खैरेंनी खासदार निधीतून सावरखेडा-शिंदेवाडी, घारेगाव-तांदुळवाडी आणि खापेश्वर-झोडगाव या तीन रस्त्यांची कामे केली; पण ही तीन गावे कन्नड तालुक्यातील नाहीत तर या रस्त्याचा खर्च तालुक्याच्या खात्यावर कसा टाकला, असा जाधवांचा सवाल आहे. याशिवाय आलापूर, देभेगाव येथे खासदार निधीतून कामे केली ती कागदावर. प्रत्यक्षात काम झाले नसल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन जाधवांनी केल्याने खळबळ उडाली. जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खैरे यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराने जाधवांच्या पत्नीचा पराभव केला, अशी ही धुसफूस आहे. सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा रुसवा आपोआपच निघाला. कोणाला त्यांची मिनतवारी करावी लागली नाही. नगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी पक्षाचे कोणतेच नेते आले नसल्यामुळे रुसलेल्या सत्तारांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांकडे पाठविला होता. काँग्रेस संस्कृतीची परंपरा पाळत चव्हाणांनी पण तो निर्णय न घेता फायलीला जोडला. परवा अचानक सत्तारांनी आपण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारत आहोत, अशी घोषणा केली आणि आपला रुसवा निघाल्याचेही सांगितले. दरम्यानच्या काळात पाऊस नसतानाही पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. जमिनीच्या प्रकरणातील वक्तव्यामुळे सत्तार चांगलेच अडचणीत आले. नेहमीच बॅकफूटवर असणारी तालुक्यातील भाजपची मंडळी आक्रमक झाली तीसुद्धा वरून आदेश आल्यामुळे. त्यांनी सत्तारांच्या विरोधात रान पेटवले, पण पेटलेल्या रानाची धग ते आठवडाभरही पेटती ठेवू शकले नाहीत; पण ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे सत्तार यांना झटका बसला हे निश्चित. त्यातून स्वत:ला सक्रिय ठेवण्यासाठी रिकाम्याच असलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या खुर्चीवर ते जाऊन बसले. गांधी भवनातील मरगळ ते कशी घालवतात हे पाहणे मनोरंजक असेल. कारण दुसरे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार आहेत आणि मरगळलेल्या पक्षात चैतन्य आणण्यासाठी सत्तार-पवारांना तीन पायांची शर्यत करायची आहे. ते ही शर्यत जिंकतात की एकमेकांच्या पायात-पाय घालतात, याचीच कार्यकर्त्यांसह सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे अस्सल ग्रामीण भाषेची उधळण करत सभा गाजवतात, नाही म्हणायला बोलण्याच्या ओघात कधी-कधी गाडी घसरते. ‘‘मी बारा भोकांचा (छिद्रांच्या) सायकलचा पाना आहे; कुठेही फीट बसतो’’ हे त्यांचे वक्तव्य फार गाजले होते. तर सायकल पानावाले दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी यशस्वी यादव यांची नियुक्ती रावसाहेबांच्या शिफारशीमुळे करण्यात आली, अशी माहिती पुढे आली आहे. ते जरी औरंगाबादेत राहत असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र जालना असल्याने औरंगाबादच्या आयुक्तपदी ‘आपल्या माणसाला’ त्यांनी का बसवले असा प्रश्न औरंगाबादच्या भाजपमधील भल्याभल्यांना पडला. बारा भोकांच्या पान्यामध्ये दानवेंनी हे तेरावे भोक काय-काय फीट करण्यासाठी पाडले आणि ते कुणा-कुणाला टाईट करतात अशीच ही चर्चा आहे.