सगळं फाटत चाललंय, कुणीतरी शिवलंही पाहिजे ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:02 IST2026-03-21T09:00:14+5:302026-03-21T09:02:27+5:30
राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्ताने लेखक - चित्रकार राजू बाविस्कर यांच्याशी साधलेला हा खास संवाद.

सगळं फाटत चाललंय, कुणीतरी शिवलंही पाहिजे ना?
युद्ध नको, भांडण नको.. शांतताच तर हवी आहे. जे फाटतंय, ते शिवण्याची भूमिका असायला हवी. पाखरं जशी चोचीने शिवतात, तसा प्रत्येकाने प्रयत्न करावा, बस्स!
‘काळ्या निळ्या रेषा’ या शीर्षकातील ‘काळ्या’ आणि ‘निळ्या’ रेषा नेमक्या कोणत्या अनुभवांचे प्रतीक आहेत?
– या काळ्या-निळ्या रेषांकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलने पाहू शकतो. पण, पाठीवर उमटणारे वळ बघितले, तर ते काळे-निळेच असतात. त्या अर्थाने या रेषा म्हणजे आयुष्यात कळत-नकळत उमटलेले व्रण- व्यवस्थेचे, जगण्याचे, दारिद्र्याचे! त्या सगळ्या अनुभवांचे प्रतीक म्हणून हे शीर्षक.
तुमच्या आयुष्यात बँडमधील वाद्य, चित्रकला, गावातील अनुभव, जातीय वास्तव हे सारे घटक एकत्र आले. या प्रवासात आतून बदलून टाकणारा अनुभव कोणता?
– मी दहावी पास झालो, तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. त्यानंतर चित्रकला महाविद्यालयात गेलो आणि मला माझं स्वतःचं आकाश सापडलं. वाटलं. आता आपल्या विषयात आपण हरणीच्या वेगाने धावू शकतो. गावात दारिद्र्य असतं, चढ-उतार असतात. पण, त्याचबरोबर चांगली माणसंही भेटतात. त्या माणसांची ‘बेरीज’ करता आली पाहिजे, हे महत्त्वाचं. माझा जन्म कुठे व्हावा, हे माझ्या हातात नव्हतं. पण, त्या परिस्थितीतून पुढे जाण्याची ताकद मात्र मिळाली. गावात लोक म्हणायचे, ‘अरे, बाबू मांगाचा मुलगा छान चित्र काढतो!’ ही दाद मोठी होती. शिक्षकांनी चित्रकला स्पर्धांसाठी स्वतः खर्च करून मला घेऊन जाणं, डबा देणं, हे खूप वेगळं होतं. ही माणसं माझ्या आयुष्यात आली, हे माझं भाग्य!
आत्मकथनात संघर्ष मांडताना कटुतेपेक्षा माणुसकीचा सूर अधिक जाणवतो. तो का?
– त्यात करुणा आहे. अन्याय झाला नाही असं नाही, तो होतच होता. बँड वाजवायला जाताना अपमान व्हायचा. पण, तरीही आम्ही जगण्याचा सूर सोडला नाही. मी माणसं पकडली. एखादा वाईट अनुभव असला, तरी त्याचबरोबर चांगली माणसंही भेटत गेली. त्या माणुसकीतूनच करुणा आली. माझ्या आयुष्यात लहानपणापासून अनेक चांगली माणसं आली आणि पुस्तकातली पात्रं म्हणजे तीच माणसं आहेत. मी स्वतः फक्त वीस टक्के आहे त्या पुस्तकात; बाकी सगळं त्यांचंच आहे. पुरस्कारही त्यांचाच आहे. मला सिकंदर काका आठवतात... तडवी समाजातील माणूस. दसऱ्याला अंगाला शेंदूर लावून, शेपूट बांधून तो हनुमान बनायचा. आम्हाला लहानपणी वाटायचं हा खरोखरचा हनुमानच आहे! अशी माणसं खूप निरागस आणि जिवंत होती. मग प्रश्न पडतो, हे सगळं कुठे हरवलं? आपलं गाव इतकं सुंदर होतं. मग, कुणी खरडले आमचे रंग? जाती-धर्माचे रंग कोणी लावले? हे पुस्तक त्या पात्रांचंच आहे. चित्रकलेमुळे बारकावे पाहण्याची सवय लागते. एखादी वस्तू कुठे आहे, तिच्या मागे काय आहे, प्रकाश कसा पडतो, हे सगळं लक्षात राहतं. हेच निरीक्षण लेखनातही उतरलं. चित्रकला हे माझं मूळ माध्यम आहे. त्यातून मी पटकन व्यक्त होऊ शकतो. लेखनात वेळ लागतो, विचार करावा लागतो. चित्रांमध्ये अभिव्यक्ती सहज येते; लेखनात ती हळूहळू आकार घेते.
तुमच्या लेखनात वेदना आहे, पण आक्रोश नाही; विद्रोह आहे, पण आक्रस्ताळेपणा नाही. ही जाणीवपूर्वक निवड आहे की स्वभावाचा भाग?
– मी आतून तसाच आहे. चित्रांमध्ये माझा विद्रोह अधिक दिसतो. लेखनात तो करुणेच्या रुपात येतो. थेट विद्रोह करण्यापेक्षा तो सूक्ष्मपणे मांडला, तर तो अधिक परिणामकारक ठरतो. वय वाढत गेलं की, समज बदलते. मी हे लेखन साठीच्या आसपास केलं. त्यामुळे त्यात प्रगल्भता आली. तरुणपणी लिहिलं असतं, तर कदाचित ते अधिक आक्रस्ताळं झालं असतं. आता मात्र करुणेचा विद्रोह महत्त्वाचा वाटतो.
तुम्ही काढलेल्या फाटलेल्या पानाच्या चित्रात पाखरं ते पान शिवत आहेत आणि त्याला तुम्ही ‘आमची भूमिका’ म्हटलं आहे. यामागचा
संदेश काय?
– कोणतंही वर्तमान असलं, तरी आपल्याला शांतता हवी आहे. युद्ध नको, भांडण नको. जे फाटतंय, ते शिवण्याची भूमिका असायला हवी... पाखरं जशी चोचीने शिवतात, तसं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करावा, बस्स इतकंच.
‘काळ्या निळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या सर्जनशील प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता?
– मी लिहून मोकळा झालो. त्यानंतर काय होईल, याचा विचारच केला नव्हता. पुढे काय लिहायचं, हेही ठरलेलं नाही. कलेत बळजबरी नसते. बीज पडतं, तेव्हा ते आपोआप वाढतं. कृत्रिम पेरणी करून चालत नाही. वेळ लागला तरी चालेल, पण जे येईल, ते अस्सल असावं, एवढंच फक्त वाटतं.
मुलाखत व शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, ‘लोकमत’
durgesh.sonar@lokmat.com