पाकिस्तानातले कैदीही पोलिसांना भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:18 IST2025-06-11T11:18:20+5:302025-06-11T11:18:42+5:30
Pakistan: आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो.

पाकिस्तानातले कैदीही पोलिसांना भारी!
दहशतवादाला सातत्यानं खतपाणी घातल्यानं, अतिरेक्यांना पोसल्यानं पाकिस्तानची जगभर छी-थू होतेच आहे; पण आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो.
कराची येथील मालिर तुरुंगातून दोन जूनच्या रात्री तब्बल २१६ कैदी फरार झाले. विशेष म्हणजे हे कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतर तिथला हेड कॉन्स्टेबल राशीद चिंगारीही फरार झाला. कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेमुळे पाकिस्तान हादरलं असून, आयजीसह २३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कैदी पळून गेल्यानंतर सिंध सरकारनं लगेच त्यांच्या अटकेचे आदेश दिले, पण अजून तरीही बरेच कैदी फरार आहेत. तुरुंगातून कैदी पळून जाण्याची ही घटना कराचीच्या तुरुंग इतिहासातली सर्वांत मोठी सुरक्षा चूक समजली जात आहे. त्यामुळेच तुरुंग सुरक्षा विभागाचे मोठमोठे अधिकारी आयजी, डीआयजी, सुपरिंटेंडंट.. इत्यादी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
तुरुंगातून इतके कैदी पळून गेल्यामुळे झालेली नाचक्की टाळण्यासाठी सिंध सरकारनं या कैद्यांनाच आमिषही दाखवलं होतं.. ‘तुरुंगातून तुम्ही पळून गेलात, पण २४ तासांच्या आत जर तुम्ही पुन्हा तुरुंगात आलात तर तुमच्यावर दया दाखवली जाईल, तुमच्यावर सक्त कारवाई केली जाणार नाही; पण पळून गेलेल्यांपैकी जे कैदी या काळात परत येणार नाहीत, त्यांना तुरुंग तोडून पलायन केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त सात वर्षांची शिक्षा दिली जाईल! आणखी नामुष्कीची गोष्ट म्हणजे तुरुंगातून एवढे कैदी पळून गेले, पण तुरुंगात साधे सीसीटीव्हीदेखील नव्हते. तुरुंग अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे नेमके कोणते कैदी, केव्हा पळून गेले, हे कळण्यातही अडचणी आल्या.
..पण पाकिस्तानी तुरुंगांतून कैदी फरार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकव्यात काश्मीरमधील रावळकोट तुरुंगातून १९ कैदी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या घटनेनंतरही पाकिस्तानचे वाभाडे निघाले होते. रविवारचा दिवस होता. दुपारचे अडीच वाजलेले. एका कैद्यानं पहारेकऱ्यालाच आपल्यासाठी लस्सी आणायला सांगितली, तीही त्याच्या बरॅकपर्यंत. पहारेकरी लस्सी घेऊन त्याच्या बरॅकपर्यंत येताच कैद्यानंच त्याची मानगुट दाबली. त्याची बंदूक हिसकावून त्याच्यावर ताणली. त्याच्याकडच्या तुरुंगाच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. या चाव्यांद्वारे त्यानं स्वत:च्या बरॅकचं कुलूप तर उघडलंच, पण इतरही बरॅकची कुलुपं उघडून त्यातल्या कैद्यांचीही सुटका केली. नंतर सर्वजण पळून गेले. हे कैदी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यातील एक कैदी ठार झाला होता.
इतरही अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण २०१२च्या घटनेनंही पाकिस्तानी सुरक्षेचं नाक कापलं गेलं होतं. त्यावेळीही तब्बल ४०० कैदी तुरुंगातून पळून गेले होते.