शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आठवा सूर हरपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 05:16 IST

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे जाणे हे म्हटले तर जन्म-मृत्युच्या नैसर्गिक चक्राचे एक आवर्तन.

चंद्रशेखर कुलकर्णी,मुंबई- गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे जाणे हे म्हटले तर जन्म-मृत्युच्या नैसर्गिक चक्राचे एक आवर्तन. पण जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या आणि सांस्कृतिक भावविश्व कमालीचे समृद्ध करणाऱ्या अत्युच्च कोटीच्या कलावंतांचे जाणे हे निव्वळ आवर्तन उरत नाही. जरा-मरणाच्या कालचक्रातून कोणाचीही सुटका नसली तरी जन्म-मृत्युच्या या दोन टोकांच्या मधल्या कर्तृत्वाने व्यक्तीच्या निर्वाणाचा पोत बदलतो. किशोरीताईंनी घेतलेला इहलोकीचा निरोप हे या अर्थाने महानिर्वाणच! गानसरस्वती हे सार्थ बिरूद लागलेल्या किशोरीताईंची गायकी पारलौकिक आणि प्रतिभेचे नवे मापदंड निर्माण करणारी होती. खरेतर अशी विशेषणे त्यांची महती सांगण्यास तोकडी पडतात. ८५ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ८२ वर्षे संगीत साधनेला वाहताना त्यांनी भारतीय संगीतात टाकलेली मोलाची भर, त्यांची संगीतनिष्ठा, व्यासंग आणि अभिजात संगीताविषयीची त्यांची तळमळ हे सारे कल्पनातीत आहे. संगीत ही जणू जगन्नियंत्याशी साधावयाच्या संवादाची भाषा असल्याप्रमाणे त्या संगीत साधनेत रममाण झाल्या. त्यातून संपादन केलेल्या प्रभुत्वाचा विनियोग त्यांनी भारतीय संगीताच्या अभिजाततेचा पोत वाढविण्यासाठी केला. स्वान्त:सुखाय कलासाधनेला अध्यात्माच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम या गानससरस्वतीने केले. बुलंद गायकीचा जन्मदत्त वारसा लाभलेल्या किशोरीतार्इंनी तो वारसा नुसता जपला नाही, तर समृद्ध केला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील घराण्यांच्या पारंपरिक रूढ चौकटींच्या पलीकडचा सांगितिक विचार त्यांनी मांडला. संगीताचे प्रयोजन आणि त्याच्या अवस्था, सुरांचा सच्चेपणा तादात्म्याच्या पातळीवर नेऊन त्यातून एक अपूर्व अनुभूती देण्याचे कार्य त्यांच्या साधनेतून झाले. भावगायनापासून स्वरांच्या ‘स्व’भावाला ध्यासपर्वाच्या पातळीवर नेण्याचे मौलिक योगदान त्यांनी भारतीय संगीताला दिले. निसर्गाची हवीहवीशी वाटणारी नाना रूपे जणू गंधासह त्यांच्या गायकीतून बरसत राहिली. त्यात रातराणीचा गंध होता, प्राजक्ताच्या समर्पणाचा भाव होता. चाफ्याचा दरवळ होता. दवबिंदूंची नजाकत होती. विशुद्ध सात्विकतेची अनुभूती त्यांच्या स्वरांतून सहा दशकांहून जास्त काळ ‘कान’ असलेल्या जगाला मिळत राहिली. शब्दप्रधान आणि भावप्रधानतेचा संगम झाल्यावर गायकीतील नवोन्मेष कसा बहरतो, याचा प्रत्यय त्यांच्या गायकीने वारंवार दिला. गायकीच्या अभिव्यक्तीपासून रसनिष्पत्तीच्या सिद्धांतापर्यंत त्यांनी केलेल्या कृतीशील चिंतनातून भारतीय अभिजात संगीत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलं. कोणताही गानप्रकार त्यांनी वर्ज्य मानला नाही. पण त्या प्रत्येक प्रकाराचा पोत समजून घेतानाच सर्वाधिक प्राधान्य परमोच्च एकतानतेला देताना त्यांनी जगाची पर्वा केली नाही. स्वरांचे स्वयंभू झाड जेथे सर्वार्थाने बहरते तेथे पोहोचण्याचा ध्यास आयुष्यभर जपलेल्या या गानसरस्वतीच्या गायकीची अनुभूती घेता आली अशा भाग्यवंत रसिकांची संख्याही अमर्याद आहे. स्वरसौंदर्याच्या परिपूर्णतेचा हा साक्षात्कार जणू संगीतातील आठवा सूर बनला. सुरांवर तांत्रिक हुकमत गाजविण्यापेक्षा त्याच सुरांना शरण जाण्याचा मार्ग संगीत साधकांना दाखविताना त्यांनी मांडलेल्या रस सिद्धांताने साधनेच्या बरोबरीने रसास्वादासाठीही एक अपूर्व दालन खुले झाले. ‘स्वरार्थरमणी’ या त्यांच्या ग्रंथाने त्यांच्या सांगीतिक विचारांचा पट रसिक श्रोत्यांपुढे मांडला. सुरांचे खरेखुरे विश्वरूप दर्शन पाहायचे असेल तर अहंभाव, अहंकार सोडून देत या साधनेच्या मार्गाने जावे लागेल, ही गुरुकिल्ली पुढील पिढ्यांना बहाल करणाऱ्या गानसरस्वतीने स्वत: मात्र या अहंभावाला कायमच स्वरमंडलाइतकेच निगुतीने सांभाळले. पण त्यांची स्वत:ची गुणवत्ताच इतकी अफाट होती, की प्रसंगी तो अहं देखील सुरीला वाटू लागायचा. किशोरीतार्इंच्या मूडी असण्याच्या जितक्या कहाण्या आहेत, त्याहून जास्त दंतकथा आहेत. हा आठवा सूर इतका अलौकिक, की त्यांची प्रत्यक्ष भेट न झालेल्यांनाही त्याच्या आस्वादातून अक्षरश: दररोज सरस्वतीच्या साहचर्याची अनुभूती मिळत राहिली. म्हणूनच किशोरीतार्इंचे जाणे निर्वात पोकळी निर्माण करून गेले. त्यासाठीच तर ते महानिर्वाण आहे. आठव्या सुराचे अस्तंगत होणे हा आभास असावा असे यापुढे अनेक वर्षे वाटत राहील, हे पाहण्याचे उत्तरदायित्व त्यांनीच समृद्ध केलेल्या शिष्यांचे आहे. त्याने निदान ही सरस्वती तरी लुप्त होणार नाही.