शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

आठवा सूर हरपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 05:16 IST

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे जाणे हे म्हटले तर जन्म-मृत्युच्या नैसर्गिक चक्राचे एक आवर्तन.

चंद्रशेखर कुलकर्णी,मुंबई- गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे जाणे हे म्हटले तर जन्म-मृत्युच्या नैसर्गिक चक्राचे एक आवर्तन. पण जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या आणि सांस्कृतिक भावविश्व कमालीचे समृद्ध करणाऱ्या अत्युच्च कोटीच्या कलावंतांचे जाणे हे निव्वळ आवर्तन उरत नाही. जरा-मरणाच्या कालचक्रातून कोणाचीही सुटका नसली तरी जन्म-मृत्युच्या या दोन टोकांच्या मधल्या कर्तृत्वाने व्यक्तीच्या निर्वाणाचा पोत बदलतो. किशोरीताईंनी घेतलेला इहलोकीचा निरोप हे या अर्थाने महानिर्वाणच! गानसरस्वती हे सार्थ बिरूद लागलेल्या किशोरीताईंची गायकी पारलौकिक आणि प्रतिभेचे नवे मापदंड निर्माण करणारी होती. खरेतर अशी विशेषणे त्यांची महती सांगण्यास तोकडी पडतात. ८५ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ८२ वर्षे संगीत साधनेला वाहताना त्यांनी भारतीय संगीतात टाकलेली मोलाची भर, त्यांची संगीतनिष्ठा, व्यासंग आणि अभिजात संगीताविषयीची त्यांची तळमळ हे सारे कल्पनातीत आहे. संगीत ही जणू जगन्नियंत्याशी साधावयाच्या संवादाची भाषा असल्याप्रमाणे त्या संगीत साधनेत रममाण झाल्या. त्यातून संपादन केलेल्या प्रभुत्वाचा विनियोग त्यांनी भारतीय संगीताच्या अभिजाततेचा पोत वाढविण्यासाठी केला. स्वान्त:सुखाय कलासाधनेला अध्यात्माच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम या गानससरस्वतीने केले. बुलंद गायकीचा जन्मदत्त वारसा लाभलेल्या किशोरीतार्इंनी तो वारसा नुसता जपला नाही, तर समृद्ध केला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील घराण्यांच्या पारंपरिक रूढ चौकटींच्या पलीकडचा सांगितिक विचार त्यांनी मांडला. संगीताचे प्रयोजन आणि त्याच्या अवस्था, सुरांचा सच्चेपणा तादात्म्याच्या पातळीवर नेऊन त्यातून एक अपूर्व अनुभूती देण्याचे कार्य त्यांच्या साधनेतून झाले. भावगायनापासून स्वरांच्या ‘स्व’भावाला ध्यासपर्वाच्या पातळीवर नेण्याचे मौलिक योगदान त्यांनी भारतीय संगीताला दिले. निसर्गाची हवीहवीशी वाटणारी नाना रूपे जणू गंधासह त्यांच्या गायकीतून बरसत राहिली. त्यात रातराणीचा गंध होता, प्राजक्ताच्या समर्पणाचा भाव होता. चाफ्याचा दरवळ होता. दवबिंदूंची नजाकत होती. विशुद्ध सात्विकतेची अनुभूती त्यांच्या स्वरांतून सहा दशकांहून जास्त काळ ‘कान’ असलेल्या जगाला मिळत राहिली. शब्दप्रधान आणि भावप्रधानतेचा संगम झाल्यावर गायकीतील नवोन्मेष कसा बहरतो, याचा प्रत्यय त्यांच्या गायकीने वारंवार दिला. गायकीच्या अभिव्यक्तीपासून रसनिष्पत्तीच्या सिद्धांतापर्यंत त्यांनी केलेल्या कृतीशील चिंतनातून भारतीय अभिजात संगीत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलं. कोणताही गानप्रकार त्यांनी वर्ज्य मानला नाही. पण त्या प्रत्येक प्रकाराचा पोत समजून घेतानाच सर्वाधिक प्राधान्य परमोच्च एकतानतेला देताना त्यांनी जगाची पर्वा केली नाही. स्वरांचे स्वयंभू झाड जेथे सर्वार्थाने बहरते तेथे पोहोचण्याचा ध्यास आयुष्यभर जपलेल्या या गानसरस्वतीच्या गायकीची अनुभूती घेता आली अशा भाग्यवंत रसिकांची संख्याही अमर्याद आहे. स्वरसौंदर्याच्या परिपूर्णतेचा हा साक्षात्कार जणू संगीतातील आठवा सूर बनला. सुरांवर तांत्रिक हुकमत गाजविण्यापेक्षा त्याच सुरांना शरण जाण्याचा मार्ग संगीत साधकांना दाखविताना त्यांनी मांडलेल्या रस सिद्धांताने साधनेच्या बरोबरीने रसास्वादासाठीही एक अपूर्व दालन खुले झाले. ‘स्वरार्थरमणी’ या त्यांच्या ग्रंथाने त्यांच्या सांगीतिक विचारांचा पट रसिक श्रोत्यांपुढे मांडला. सुरांचे खरेखुरे विश्वरूप दर्शन पाहायचे असेल तर अहंभाव, अहंकार सोडून देत या साधनेच्या मार्गाने जावे लागेल, ही गुरुकिल्ली पुढील पिढ्यांना बहाल करणाऱ्या गानसरस्वतीने स्वत: मात्र या अहंभावाला कायमच स्वरमंडलाइतकेच निगुतीने सांभाळले. पण त्यांची स्वत:ची गुणवत्ताच इतकी अफाट होती, की प्रसंगी तो अहं देखील सुरीला वाटू लागायचा. किशोरीतार्इंच्या मूडी असण्याच्या जितक्या कहाण्या आहेत, त्याहून जास्त दंतकथा आहेत. हा आठवा सूर इतका अलौकिक, की त्यांची प्रत्यक्ष भेट न झालेल्यांनाही त्याच्या आस्वादातून अक्षरश: दररोज सरस्वतीच्या साहचर्याची अनुभूती मिळत राहिली. म्हणूनच किशोरीतार्इंचे जाणे निर्वात पोकळी निर्माण करून गेले. त्यासाठीच तर ते महानिर्वाण आहे. आठव्या सुराचे अस्तंगत होणे हा आभास असावा असे यापुढे अनेक वर्षे वाटत राहील, हे पाहण्याचे उत्तरदायित्व त्यांनीच समृद्ध केलेल्या शिष्यांचे आहे. त्याने निदान ही सरस्वती तरी लुप्त होणार नाही.