ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:42 AM2021-08-09T08:42:23+5:302021-08-09T08:42:48+5:30

टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.

editorial on indias historic performance in Tokyo Olympics | ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट

ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट

googlenewsNext

७ ऑगस्ट २०२१ हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. नीरज चोप्रा याने टोकियोत ऑलिम्पिकच्या मूळ मैदानी खेळांपैकी एक, भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकले. अथेन्स येथील १८९६च्या आधुनिक ऑलिम्पिकनंतर सव्वाशे वर्षांत भारताचे हे ॲथलेटिक्सचे पहिले पदक. मिल्खा सिंग, पी.टी. उषा वगैरे दिग्गजांना त्याने हुलकावणी दिली होती. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश इंडियाकडून खेळलेले नॉर्मन पिचार्ड यांची दोन रौप्यपदके आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ इंग्लंडची मानतो. नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज दुसराच. याशिवाय भारताला मिळाली ती आठही सुवर्णपदके सांघिक, हॉकीची. आठ वर्षांपूर्वीचा लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम टोकियोत मोडला गेला. चार दशकांनंतर हॉकीचे कांस्य व नीरजचे सुवर्णपदक हा ऐतिहासिक यशाचा कळस. मीराबाई चानू व रवीकुमार दहिया यांची रौप्यपदके आणि पी. व्ही. सिंधू, लवलीना बोरगोहेन, बजरंग पुनिया यांची कांस्यपदके अशी टोकियोची एकूण कमाई सात पदकांची. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी.



टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. गरिबी, निरक्षरता, कुपोषण, अनारोग्य वगैरे मूलभूत समस्यांचा सामना करणाऱ्या भारतात केवळ लोकसंख्या प्रचंड आहे म्हणून जगज्जेते खेळाडू तयार होतील, असे नाही. मूलभूत प्रश्न आधी सोडविणे महत्त्वाचे. अशीच प्रचंड लोकसंख्या असलेला चीनदेखील गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडल्यानंतरच क्रीडा महासत्ता बनू शकला. पदकतालिकेतील वरच्या देशांशी भारताची तुलना शक्य नाही. आर्थिक संपन्नता व शारीरिक क्षमतांची जनुकीय वैशिष्ट्ये यांची सांगड घातली जाते तेच देश जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करतात. आफ्रिकन, मंगोलियन, युरोपियन खेळाडूंच्या क्षमतांपुढे दक्षिण आशियातील खेळाडू कमी पडतात. तरीदेखील आर्थिक महासत्ता बनू पाहणारा भारत क्रीडा विश्वगुरू का बनू शकत नाही, हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे.



एकतर क्रिकेट हा देशाच्या क्रीडा विकासात मोठा अडथळा आहे. इतर खेळांचा पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, वलय सारे काही क्रिकेटने बळकावले आहे. पंधरा दिवस ऑलिम्पिकची चर्चा झाली तेवढेच. मॅच फिक्सिंगसारखी कीड लागल्यानंतरही क्रिकेटचा बाजार थांबला नाही. क्रिकेटची मैदाने व स्टेडियमवर जितका खर्च केला त्याच्या चौथा हिस्सा जरी अन्य खेळांवर केला असता तर आतापर्यंत डझनांनी ऑलिम्पिक पदके आली असती. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आदी प्रगत, संपन्न राज्यांचे क्रिकेटशिवाय अन्य खेळांकडे अजिबात लक्ष नाही. क्रिकेटसह देशातील प्रत्येक खेळ, नव्हे प्रत्येक कृतीत नको तितके राजकारण घुसले आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहिली जाते. खेळाडूंच्या मेहनतीचे फुकट श्रेय घेणारे राजकारणी व त्यांना ते देऊ पाहणारे नागरिक दोन्हीही याला जबाबदार आहेत. याशिवाय, सगळ्याच जागतिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंचे वय खूप महत्त्वाचे असते. कॅच देम यंग किंवा अगदी चार-सहा वर्षे वयाचे उगवते खेळाडू शोधणे व त्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करणे ही प्रक्रिया भारतात जवळपास नाहीच. शालेय स्पर्धा औपचारिकता म्हणून पार पडतात. टोकियोतल्या यशाला खेलो इंडिया स्पर्धेचा फायदा झाला; पण हा अपवाद आहे. तिसरे कारण खेळांच्या पायाभूत सुविधांचा अभाव. सरकार, बडे उद्योग, अन्य संस्थांनी एकत्र येऊन या सुविधा दिल्या तरच चॅम्पियन्स घडतील. तसे होत नसल्याने ऑलिम्पिक पदकविजेत्यांची संख्या एका किंवा दोन हातांच्या बोटांवर मोजावी लागते.

सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे. तेव्हा उद्योजकांनी समोर यायला हवे. नीरज चोप्राला जिंदाल समूहाने बळ दिले. इतरही उद्योग अशी मदत करतात. पण, ती वाढायला हवी. महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना भव्यदिव्य, जग जिंकण्याची स्वप्ने पडायला हवीत. ती सत्यात उतरविण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसायची तयारी हवी. ईशान्य भारतातील खेळाडूंचा आदर्श या बाबतीत घ्यायला हवा. रडगाणे गाण्याऐवजी प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द हवी. इतिहास घडविणारा नीरज चोप्रा चौदाव्या वर्षी घरातून बाहेर पडतो. भाल्याला सर्वस्व वाहून घेतो. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतरही त्याची भूक शमलेली नसते. यशाच्या शिखरावर असतानाही त्याला जागतिक विक्रम खुणावतो. ही अशी जिद्द अंगात असेल तरच कष्टाला, स्वप्नांना सोनेरी भाले फुटतात व सन्मानांची माळ गळ्यात पडते.

Web Title: editorial on indias historic performance in Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.