शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शब्द संपले, भावना गोठल्या! आपण काही करणार आहोत की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:22 IST

एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही.

रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध नसल्याने पित्याने कोवळ्या मुलाचा, पतीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून कित्येक मैल पायपीट केल्याच्या, कसल्याशा वाहनात, काही वेळा एसटी बसने मृतदेह गावी नेल्याच्या काही घटना याआधी घडल्या आहेत. तेवढ्यापुरते आपण संताप व्यक्त करतो. आपली व्यवस्था सामान्य गरिबांच्या मुलाबाळांचा, एखाद्या बिचाऱ्या बाईचा मृत्यूनंतरही छळ, हेळसांड करते, म्हणून त्रागा करतो. एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही. आपण कमालीचे बधिर, संवेदनाहीन झालो आहोत. जन्म ही सर्वाधिक आनंदाची, तर मृत्यू ही दुःखाची बाब असूनही अशा घटनेच्या शिळा मनावर खोल रुतत नाहीत. पण, अशा सामूहिक अवस्थेतही पोटात खड्डा पडावा, डोळ्यांसमोर अंधार दाटून यावा, दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द सुचू नयेत, भावना गोठून जाव्यात, मन थिजून जावे, अशी घटना रविवारी राज्याची उपराजधानी नागपूरजवळ घडली.

साधारणपणे पस्तिशीचा माणूस दुचाकीवर महिलेचा मृतदेह टाकून महामार्गाने सुसाट निघाल्याचे महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पथकाला दिसते. ते पाठलाग करतात. तो थांबत नाही. तेव्हा, गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला जातो आणि उघडकीस येते प्रचंड हादरवून टाकणारी घटना, दुचाकीवर मृतदेह नेणारी ती व्यक्ती होती अमित यादव. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील करणपूर हे त्याचे मूळ गाव. पत्नी ग्यारसीसह तो दहा वर्षांपासून कामाधंद्याच्या निमित्ताने कोराडीजवळच्या लोणारा येथे राहतो. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने अमित व ग्यारसी हे दोघे दुचाकीने करणपूरला निघाले होते. देवलापारच्या पुढे मोरफाट्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे दोघे खाली पडले. ट्रकच्या मागच्या चाकाखाली ग्यारसी चिरडली गेली. हा पेंच अभयारण्याचा जंगल प्रदेश. अपघात घडला तेव्हाच जोराचा पाऊस सुरू झाला. डोळ्यासमोर पत्नी चिरडली गेल्याने आक्रोश करीतच अमितने मदतीसाठी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. कोणीही थांबले नाही. वैतागून त्याने पत्नीचा मृतदेह मोटारसायकलवर बांधला. वेगाने परत नागपूरकडे निघाला. महामार्ग पोलिसांच्या पथकाने महिलेचा मृतदेह गाडीवर टाकून जाणारी व्यक्ती पाहून थांबविण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना खुनाचा संशय आल्याचे जाणवते. त्यासाठी ते अमितला थांबविण्याचा प्रयत्न करताहेत असे दिसते. तो घाबरला असल्याने थांबला नाही, असे कारण पोलिस देतात खरे; पण तसे नसावे. भीतीपेक्षा तो संतापाने धगधगत असण्याची शक्यता अधिक आहे.

प्रिय पत्नी अपघातात डोळ्यादेखत जीव गमावते आणि कोणीही मदतीसाठी थांबत नाही. अपघात घडल्यानंतर मदतीसाठी पोलिस आले नाहीतच. उलट, आता आपण नशीब गाडीवर टाकून परत निघालो तर पाठलाग करतात, यामुळे तो संतापला असावा. एनएच ४४ हा देशाची उत्तर-दक्षिण टोके जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातील नागपूर-जबलपूर हा अत्यंत रहदारीचा टापू, अशा हमरस्त्यावर एका अभागी पतीला मदत मिळत नसेल, पत्नीचा मृतदेह गाडीवर बांधून संतापाने त्याला परत फिरावे लागत असेल, तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तो त्या स्थितीत परत येतानाही कुणाला त्याची फिकीर नसेल, सगळ्यांच्या दृष्टीने तो बेदखल असेल, महामार्ग पोलिसही खुनाच्या संशयानेच त्याचा पाठलाग करीत असतील, तर महामार्गावर, हमरस्त्यांवर मदतीच्या व्यवस्थेचे याहून मोठे धिंडवडे तरी कोणते? मंत्री, अधिकाऱ्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी सभा-समारंभातून टाळ्या घेण्यासाठी अशा व्यवस्थेचे गोडवे गायचे का? रस्त्याकडेच्या अशा दुर्दैवी अपघातांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे की नाही? मदतीसाठी थांबलो तर विनाकारण पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जर लोक असे असंवेदनशील, मुर्दाड बनत असतील तर यंत्रणा कधी या सामूहिक मनःस्थितीचा विचार करणार आहे की नाही? अमितच्या वाट्याला आलेले दुर्दैव अन्य कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून समाज, राष्ट्र, व्यवस्था म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? एरव्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी घडणाऱ्या घटना, हिंसाचार पाहून, ऐकून खोटे उसासे सोडणारे, आक्रंदनारे आपण आपल्या अवतीभोवतीच्या घटनांबद्दल असेच बेफिकीर राहणार आहोत का? 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातPoliceपोलिस