शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शब्द संपले, भावना गोठल्या! आपण काही करणार आहोत की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:22 IST

एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही.

रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध नसल्याने पित्याने कोवळ्या मुलाचा, पतीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून कित्येक मैल पायपीट केल्याच्या, कसल्याशा वाहनात, काही वेळा एसटी बसने मृतदेह गावी नेल्याच्या काही घटना याआधी घडल्या आहेत. तेवढ्यापुरते आपण संताप व्यक्त करतो. आपली व्यवस्था सामान्य गरिबांच्या मुलाबाळांचा, एखाद्या बिचाऱ्या बाईचा मृत्यूनंतरही छळ, हेळसांड करते, म्हणून त्रागा करतो. एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही. आपण कमालीचे बधिर, संवेदनाहीन झालो आहोत. जन्म ही सर्वाधिक आनंदाची, तर मृत्यू ही दुःखाची बाब असूनही अशा घटनेच्या शिळा मनावर खोल रुतत नाहीत. पण, अशा सामूहिक अवस्थेतही पोटात खड्डा पडावा, डोळ्यांसमोर अंधार दाटून यावा, दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द सुचू नयेत, भावना गोठून जाव्यात, मन थिजून जावे, अशी घटना रविवारी राज्याची उपराजधानी नागपूरजवळ घडली.

साधारणपणे पस्तिशीचा माणूस दुचाकीवर महिलेचा मृतदेह टाकून महामार्गाने सुसाट निघाल्याचे महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पथकाला दिसते. ते पाठलाग करतात. तो थांबत नाही. तेव्हा, गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला जातो आणि उघडकीस येते प्रचंड हादरवून टाकणारी घटना, दुचाकीवर मृतदेह नेणारी ती व्यक्ती होती अमित यादव. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील करणपूर हे त्याचे मूळ गाव. पत्नी ग्यारसीसह तो दहा वर्षांपासून कामाधंद्याच्या निमित्ताने कोराडीजवळच्या लोणारा येथे राहतो. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने अमित व ग्यारसी हे दोघे दुचाकीने करणपूरला निघाले होते. देवलापारच्या पुढे मोरफाट्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे दोघे खाली पडले. ट्रकच्या मागच्या चाकाखाली ग्यारसी चिरडली गेली. हा पेंच अभयारण्याचा जंगल प्रदेश. अपघात घडला तेव्हाच जोराचा पाऊस सुरू झाला. डोळ्यासमोर पत्नी चिरडली गेल्याने आक्रोश करीतच अमितने मदतीसाठी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. कोणीही थांबले नाही. वैतागून त्याने पत्नीचा मृतदेह मोटारसायकलवर बांधला. वेगाने परत नागपूरकडे निघाला. महामार्ग पोलिसांच्या पथकाने महिलेचा मृतदेह गाडीवर टाकून जाणारी व्यक्ती पाहून थांबविण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना खुनाचा संशय आल्याचे जाणवते. त्यासाठी ते अमितला थांबविण्याचा प्रयत्न करताहेत असे दिसते. तो घाबरला असल्याने थांबला नाही, असे कारण पोलिस देतात खरे; पण तसे नसावे. भीतीपेक्षा तो संतापाने धगधगत असण्याची शक्यता अधिक आहे.

प्रिय पत्नी अपघातात डोळ्यादेखत जीव गमावते आणि कोणीही मदतीसाठी थांबत नाही. अपघात घडल्यानंतर मदतीसाठी पोलिस आले नाहीतच. उलट, आता आपण नशीब गाडीवर टाकून परत निघालो तर पाठलाग करतात, यामुळे तो संतापला असावा. एनएच ४४ हा देशाची उत्तर-दक्षिण टोके जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातील नागपूर-जबलपूर हा अत्यंत रहदारीचा टापू, अशा हमरस्त्यावर एका अभागी पतीला मदत मिळत नसेल, पत्नीचा मृतदेह गाडीवर बांधून संतापाने त्याला परत फिरावे लागत असेल, तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तो त्या स्थितीत परत येतानाही कुणाला त्याची फिकीर नसेल, सगळ्यांच्या दृष्टीने तो बेदखल असेल, महामार्ग पोलिसही खुनाच्या संशयानेच त्याचा पाठलाग करीत असतील, तर महामार्गावर, हमरस्त्यांवर मदतीच्या व्यवस्थेचे याहून मोठे धिंडवडे तरी कोणते? मंत्री, अधिकाऱ्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी सभा-समारंभातून टाळ्या घेण्यासाठी अशा व्यवस्थेचे गोडवे गायचे का? रस्त्याकडेच्या अशा दुर्दैवी अपघातांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे की नाही? मदतीसाठी थांबलो तर विनाकारण पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जर लोक असे असंवेदनशील, मुर्दाड बनत असतील तर यंत्रणा कधी या सामूहिक मनःस्थितीचा विचार करणार आहे की नाही? अमितच्या वाट्याला आलेले दुर्दैव अन्य कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून समाज, राष्ट्र, व्यवस्था म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? एरव्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी घडणाऱ्या घटना, हिंसाचार पाहून, ऐकून खोटे उसासे सोडणारे, आक्रंदनारे आपण आपल्या अवतीभोवतीच्या घटनांबद्दल असेच बेफिकीर राहणार आहोत का? 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातPoliceपोलिस