माफ करा, मुनीश्री, आपण चुकलात!
By Rajendra Darda | Updated: April 3, 2026 08:37 IST2026-04-03T08:37:34+5:302026-04-03T08:37:49+5:30
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागरजी यांनी केलेले 'महाराणी ताराबाई या जैनधर्मीय होत्या' हे विधान असत्यच नव्हे, तर इतिहासाची तोडफोड करणारे, महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे आहे. समाजात सौहार्द टिकवण्यासाठी आणि परस्पर सन्मान जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शब्दांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे'

माफ करा, मुनीश्री, आपण चुकलात!
राजेंद्र दर्डा
एडिटर-इन-चीफ लोकमत
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव नुकताच मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. सत्य, अहिंसा आणि सहअस्तित्वाचा संदेश देणाऱ्या या पवित्र दिवसाचे महत्त्व आजच्या जागतिक परिस्थितीत अधिक अधोरेखित होते.
जगभरात अस्थिरतेचे सावट गडद होत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे निर्माण झालेली युद्ध परिस्थिती केवळ त्या प्रदेशापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण जगावर त्याचे परिणाम उमटत आहेत. आखाती देशांसह भारतालाही त्याची झळ बसत आहे. अशा अस्थिर काळात जैन धर्मीय म्हणून आमची प्रामाणिक भावना अशी आहे की, भगवान महावीरांच्या शांततेच्या आणि अहिंसेच्या विचारांचे 'मिसाईल'च या अस्थिरतेवर खऱ्या अर्थाने उपाय ठरू शकते.
भगवान महावीरांनी दिलेली सत्य, अहिंसा आणि सहअस्तित्वाची शिकवण ही केवळ धार्मिक तत्त्वे नसून मानवतेच्या अस्तित्वाची मूलभूत गरज आहे. सहअस्तित्व म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्याचा समान अधिकार आहे, याची जाणीव ठेवणे. परंतु दुर्दैवाने, ज्या दिवशी आपण हा पवित्र महोत्सव साजरा करत होतो, त्याचवेळी एका वादग्रस्त विधानामुळे राज्यात अस्वस्थता निर्माण झाली. जैन मुनी नयन पद्मसागरजी यांनी 'महाराणी ताराबाई या जैनधर्मीय होत्या' असे विधान केले, ते केवळ धादांत असत्यच नव्हे, तर महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे आहे.
इतिहास हा समाजाचा पाया असतो. त्यात विकृती किंवा मनमानी बदल करणे हे कोणाच्याही हिताचे नाही. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य परंपरेतील एक झळाळते, तेजस्वी व्यक्तिमत्त्व होत्या. त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी आणि पराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. इ.स. १७०० मध्ये राजाराम महाराजांच्या निधनानंतर, औरंगजेबाच्या आक्रमणाला ताराराणींनी ज्या धैर्याने आणि कुशलतेने तोंड दिले, त्यातून त्यांचे नेतृत्वगुण अधोरेखित होतात. 'रणरागिणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराराणींनी स्वराज्याची पताका उंच राखत मुघलांना जेरीस आणले. हा इतिहास सर्वज्ञात आणि अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्र ही विविधतेने नटलेली भूमी आहे. येथे अनेक समाज, संस्कृती आणि परंपरा एकत्र नांदतात. जैन समाजही या भूमीशी शतकानुशतके एकरूप झाला आहे. श्वेतांबर असो की दिगंबर, स्थानकवासी असो की मंदिर मार्गी, हिंदी भाषक असो की मराठी भाषक, महाराष्ट्रात राहणारे आम्ही सर्व जैनधर्मीय या मातीशी एकरूप आहोत. आमचा श्वास मराठी, आमचे वागणे मराठी। आम्हा सर्वांची ओळख 'मराठी' हीच आहे. मराठी ही केवळ भाषा नव्हे, तर ती आपला श्वास, आपली संस्कृती आणि आपली अस्मिता आहे. त्यामुळेच कोणतेही विधान जे समाजात फूट पाडू शकते, ते अधिक संवेदनशीलतेने हाताळणे आवश्यक ठरते.
साधुसंत हे समाजाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या शब्दांना वजन असते, त्यांच्या विचारांचा प्रभाव व्यापक असतो. त्यामुळे त्यांनी केलेले प्रत्येक विधान हे विचारपूर्वक आणि पूर्ण जबाबदारीने केलेले असावे, ही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. कधीकधी एखाद्या विधानामुळे निर्माण होणारा वाद हा संपूर्ण समाजाला वेठीस धरतो. अशा प्रसंगी विवेक, संयम आणि समतोल दृष्टिकोन अत्यावश्यक ठरतो.
भगवान महावीरांनी शिकवलेली अहिंसा ही केवळ कृतीपुरती मर्यादित नाही. एखाद्याला शारीरिक इजा करणे हीच हिंसा नसून, आपल्या शब्दांनी जर कोणाचे मन दुखावले, तर तीदेखील हिंसाच ठरते. म्हणूनच जैन परंपरेत 'मिच्छामि दुक्कडम्' या संकल्पनेला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या कृतीने किंवा शब्दांनी नकळत कोणाला दुखावले गेले असेल, तर मनापासून क्षमा मागणे.
आजच्या या संवेदनशील काळात, जर एखाद्या विधानामुळे समाजात मतभेद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता असेल, तर ते टाळणे हीच खरी जबाबदारी ठरते. तेव्हा माझी नम्र विनंती की, समाजात सौहार्द टिकवण्यासाठी आणि परस्पर सन्मान जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शब्दांची जाणीव ठेवावी. कारण संवादातून पूल बांधले जाऊ शकतात, पण त्याच संवादातून दरीही निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रातील जैन समाज हा या भूमीच्या मुख्य प्रवाहाचा अविभाज्य घटक आहे. शांतता, सहिष्णुता आणि परस्पर आदर या मूल्यांवर आधारलेले सहजीवन हेच आपल्या सर्वांच्या प्रगतीचे खरे सूत्र आहे. म्हणूनच नम्रपणे म्हणावेसे वाटते की, माफ करा मुनीश्री, पण आपण चुकला आहात।
rjd@lokmat.com