शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 05:43 IST

या वादळाने चेन्नईसारख्या महानगराला चोवीस तासांत ३०० मिलीमीटर पावसाने धुऊन काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने चेन्नई शहराला महापुराचे स्वरूप आले होते.

मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर हवामानातील बदलाचा वेग वाढल्याची चाहूल म्हणजे मिचाँग चक्रीवादळ आहे. त्याचा सर्वांत मोठा तडाखा तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावरील चेन्नई शहरासह चार जिल्ह्यांना बसला आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनोत्तर चक्रीवादळ निर्माण होण्याची जणू परंपराच आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या प्रदेश किनारपट्टीवर कमीअधिक प्रमाणात या वादळांचा तडाखा बसतो. गेल्या चार-पाच वर्षांत वेगाने होत असलेल्या हवामान बदलाने मान्सूनपूर्वदेखील चक्रीवादळ निर्माण होत आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मान्सून वाऱ्यामध्ये अडथळे निर्माण करणारे बिपरजॉय वादळ मागील एप्रिलमध्ये आले होते. परिणामी गुजरात आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला होता. आता निर्माण झालेले मिचाँग वादळदेखील हवामान बदलाचा परिणाम आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

या वादळाने चेन्नईसारख्या महानगराला चोवीस तासांत ३०० मिलीमीटर पावसाने धुऊन काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने चेन्नई शहराला महापुराचे स्वरूप आले होते. विमानतळावर तसे फारसे अडथळे नसतात. मात्र चेन्नईच्या विमानतळावर चार-पाच फूट पाणी साचून राहिले होते. शहरातील सखल भागात दहा-दहा फूट पाणी वाहत होते. मिचाँग वादळाने चेंगरूपर, कांचीपुरम, तिरुवल्लूर तसेच मच्छलीपट्टणम् जिल्ह्यांना मोठा फटका बसला. चेन्नई शहरासह  या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठा बंद पडल्या. इंटरनेट सेवा बंद झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. मिचाँग वादळ चेन्नईपासून १०० किलोमीटरवर असले तरी ताशी ९० किलोमीटरने वाहणाऱ्या वाऱ्याने दाणादाण उडवून टाकली आहे. पुढे हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेशकडे वळले असून, त्याचा फटका किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना बसतो आहे. पुढे ओडिशापर्यंत ते जाऊन धडकेल असा अंदाज आहे.

ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सर्व जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अद्याप तरी तामिळनाडूलाच फटका बसला असला आणि चक्रीवादळाचा जोर कमी नसल्याने बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला धोका आहे. या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील हवामान ढगाळ बनले आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाचा अपवाद वगळता पाऊस पडेल असे वाटत नाही. तो पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान करून जाणार आहे. मिचाँग चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही दोन दिवस राहण्याची तसेच ते तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या आंध्र प्रदेशातील अमरावती विभागाने व्यक्त केली आहे. हवामान बदलाचे संकेत भारतासारख्या उपखंडाला वारंवार मिळत आहेत. अरबी समुद्राच्या तटावरील मुंबईसारख्या महानगरात किंवा पूर्वेकडील चेन्नई, विशाखापट्टणम्, कोलकाता आदी महानगरात अतिदक्षता घेण्याची गरज आहे.

चेन्नई शहराला २०१५ मध्ये मान्सूनोत्तर चक्रीवादळाने तडाखा दिला होता. सुमारे चारशे मिलीमीटर पाऊस दोन दिवसांत झाला होता. चेन्नई शहराच्या विस्तारित भागातील पाणी वाहून नेणारे ओढे, नाले आणि छोट्या नद्या अदृश्य केल्याचे परिणाम काय असू शकतात. याचा स्पष्ट संकेत त्यावेळी निसर्गाने दिला होता. तरीदेखील आपण शहाणे होत नाही. निसर्गाने वारंवार इशारे देऊनदेखील त्याची नोंद घेत नाही. युरोपात उन्हाळ्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाणे किंवा टांझानियासारख्या आफ्रिका खंडातील देशाला प्रचंड वादळी पावसाने धुऊन काढणे, ही कशाची लक्षणे आहेत? संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी विकसित राष्ट्रांनी निधी दिला असला आणि त्याच्या परिणामांचे विश्लेषण केले असले तरी त्यांची नोंद घेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी आता परवडणारी नाही.

हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणारी पायाभूत सुविधा विकसित करण्याची तयारी महानगरांना तरी करावी लागणार आहे. आपल्या देशाच्या किनारपट्टीवर आठ-दहाच मोठी शहरे आहेत. त्यांचे नियोजन सुधारावे लागणार आहे. मागील मान्सूनच्या पावसाने हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमची हालत कशी झाली होती याचा अनुभव आपण घेतला आहे. हवामानातील या सर्व बदलांचा होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधण्यासाठी रडारसारख्या व्यवस्थेने देशाची इंच न इंच जागा नजरेखाली आणावी लागेल. त्या व्यवस्थेतून मिळणाऱ्या धोक्याच्या माहितीच्या आधारे सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांना तोंड कसे देता येईल, याचा अचूक अंदाज बांधावा लागेल तरच आपण होऊ घातलेले नुकसान टाळू शकू. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊस