Coronavirus : गुढी उभारू विजयी संकल्पाची!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:18 AM2020-03-25T03:18:14+5:302020-03-25T05:37:53+5:30

coronavirus : हिंदीत ‘जान है, तो जहान है’ असे नेहमी म्हटले जाते. खरेच आहे ते. जिवापेक्षा अधिक अथवा किमती दुसरे काही असूच शकत नाही.

Coronavirus: Gudhi Raising Victory Resolution! | Coronavirus : गुढी उभारू विजयी संकल्पाची!

Coronavirus : गुढी उभारू विजयी संकल्पाची!

Next

आज गुढीपाडवा, म्हणजे वर्षप्रतिपदा. त्यानिमित्त सर्वप्रथम समस्त वाचकांना मन:पूर्वक शुभेच्छा. खरे तर नवीन वर्षाचा आनंदाने, नव-नवोन्मेषाने व हर्षोल्हासाने प्रारंभ करण्याचा हा दिवस; परंतु त्यावर ‘कोरोना’च्या भयाचे सावट आहे. अर्थात, आपणच नव्हे तर संपूर्ण जगच या भय वा भीतीचा प्रत्यय आज घेत आहे. हिंदीत ‘जान है, तो जहान है’ असे नेहमी म्हटले जाते. खरेच आहे ते. जिवापेक्षा अधिक अथवा किमती दुसरे काही असूच शकत नाही. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूपासून उत्पन्न होणारा धोका लक्षात घेता जगाच्या पाठीवरील प्रत्येकच जण आपल्या जिवाची जपणूक करण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. चीनपाठोपाठ इटलीमध्ये यासंदर्भाने उडालेला हाहाकार आपण पाहतोच आहे. अन्य देशांचेही सोडा, स्वत:कडे जगाचे नेतृत्व घेऊ पाहणारी अमेरिकाही कशी चिंताक्र ांत झाली आहे, तेदेखील पाहावयास मिळत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला म्हणजे भारतालाही सावधानता बाळगणे व खबरदारी घेणे गरजेचेच बनले आहे. कारण ‘कोरोना’चा विषाणू आपल्याकडेही पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यासंबंधीचे धोके लक्षात आणून देऊन संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा करतानाच जनतेला सहकार्याचे आवाहन केले आहे. बंधनांचा स्वीकार करतानाच कोरोनाच्या संकटावर विजय प्राप्त करण्याचा संकल्प सोडण्याचे मोदी यांनी म्हटले आहे. हे संकट परीक्षा पाहणारे तसेच कसोटीचे आहे. अतिशय भयावह व अनपेक्षितपणे ते ओढवलेले असल्याने त्याला धैर्याने सामोरे जाण्याची वेळ सर्वांवर आली आहे. सारे जग हबकून गेलेले आहे; पण म्हणून गलीतगात्र होण्याचे; घाबरून जाण्याचेही कारण नाही. संकटास तोंड द्यायचे व त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे तर सावधानतेची गरज असते.

आज तेच अपेक्षित आहे. आपणास शोले चित्रपटातील एक वाक्य आठवत असेलच, ‘जो डर गया, वो मर गया!’ घाबरतो तो संपतो, हा तर जीवनानुभव आहे. तेव्हा घाबरण्याचे मुळीच कारण नाही, धीराने-धाडसाने, कणखरपणे मुकाबला करून आपल्याला ही लढाई लढायची आहे. आजवर प्लेग, पोलिओसारख्या अनेक साथीच्या रोगांविरुद्ध आपण ही लढाई यशस्वीपणे लढून त्यावर मात केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईतही तसेच करावे लागणार आहे.

सुदैवाने, शासन-प्रशासन पूर्ण ताकदीनीशी या लढाईच्या मैदानात उतरले आहे. सत्ता कुणाचीही असो, पक्ष व व्यक्ती कुणीही असो, कोरोनाशी लढण्यासाठी सारे एकजुटीने उभे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘जनता कर्फ्यू’ला मिळालेला प्रतिसाद व कोरोनाशी लढणाऱ्यांप्रती देशभर झालेला घंटा-थाळीनाद पाहता जनताही या लढाईत सोबत आल्याचे चित्र आहे. विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, कोरोनाच्या संशयित रु ग्णांची काळजी घेणारे डॉक्टर्स-नर्सेस आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा व कर्तव्य बजावत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छताविषयक सेवाही अव्याहतपणे सुरू असून, पोलीस दलही अहोरात्र जागून आवश्यक ती खबरदारी घेत आहे.

सीमेवरील सैनिकांचे काम जितके वा जसे जोखमीचे असते, तसेच व तितकेच या साºया लढवय्यांचेही काम मोलाचे आहे. हे सर्व घटक रोज आपल्या कर्तव्यावर निघत असताना त्यांच्या कुटुंबियांची होणारी घालमेल आपण समजू शकतो. घरातून निघताना त्यांना निरोप देणाºया हातांची थरथर ही संवेदनशील मनात थरकाप उडविणारीच असते. कारण कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग स्पर्शातून होऊ शकणारा आहे. खरे तर स्पर्शाची अनुभूती आनंददायी, आल्हाददायी तसेच अलवार अशीच असते. त्याबद्दलची भावना शब्दात व्यक्त करता येऊ नये. तो कवितेचाच विषय आहे. पण आज हा स्पर्शच जीवघेणा ठरू पाहतो आहे. मात्र सेवाभावाची पालखी वाहण्यासाठी वैयक्तिक सुरक्षिततेचा विचार न करता ही मंडळी घराबाहेर पडत आहे व जोखीम पत्करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवा-कार्याबद्दल व्यक्त करावी तितकी कृतज्ञता कमी आहे.

महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा अशी भयाची व त्या भयाशी दोन हात करीत संकटावर विजय मिळवण्याची वेळ असते, तेव्हा सावधानतेबरोबरच अचुक माहिती व मार्गदर्शनाच्या यथायोग्य संप्रेषणाची सर्वाधिक गरज असते. माध्यमे व त्यातही वृत्तपत्रे ती जबाबदारी अधिक काळजीपूर्वक पार पाडीत आहेत, ही आत्यंतिक समाधानाची बाब आहे. माध्यमे मग ती मुद्रित असोत, की इलेक्ट्रॉनिक वा डिजिटल; ती प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. त्यातही वृत्तपत्रांकडून माहिती देतानाच प्रबोधनही
घडविले जाते, त्यामुळे समाज शिक्षकाच्या भूमिकेतून त्याकडे
पाहिले जाते. विशेषत: आजच्या वाढत्या समाजमाध्यमांमधील अनिर्बंध व अविश्वसनीय वृत्तांनी सध्याच्या संशयास्पद व भयावह वातावरणात भरच पडत आहे. अशा काळात वस्तुनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचविणे हे वर्तमानपत्र व माध्यमांचे खरे काम आहे, किंबहुना ती त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. आज तेच खरे आव्हानही आहे.

समाजमाध्यमातून ज्या बातम्या मिळतात त्या तर कोरोनाच्या विषाणूपेक्षाही अत्यंत भयानक व घातक आहेत. त्यांचा वेगही खतरनाक आहे. त्यामुळे अशा काळात त्या बातम्यांची वस्तुनिष्ठता तपासणे आणि त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अशा कठीण काळात, अस्थिर वातावरणात कुठलीही खातरजमा न करता बातमी देणे हे समाजासाठी धोकादायक आहे. अशावेळी सत्य, वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह बातम्या देणे गरजेचे असून, ते काम वृत्तपत्रांच्याच माध्यमातून होऊ शकणारे आहे.
ती वर्तमानपत्रांची शक्ती आहे, कारण छापील शब्दावरचा
वाचकांचा विश्वास अद्यापही कायम आहे. हा विश्वास व
त्यासंबंधीची भावना समाज मनात कोरली गेली असून, तिला जपण्याची व बांधील राहण्याची प्रामाणिकता वर्तमानपत्रांनी आजवर कायम राखली आहे.

वर्तमानपत्रांचे व्यवस्थापन, त्यात काम करणारे पत्रकार-अन्य कर्मचारी यांच्याबरोबरच वृत्तपत्र घरोघरी पोहोचविणारे विक्रेते-वितरक यांची भूमिकाही यासंदर्भाने मोठी व मोलाची आहे. आजच्या संकटाच्या व कसोटीच्या काळात अचूक आणि विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची अत्यंतिक गरज असल्याने केंद्र शासन-प्रशासनानेही वृत्तपत्रांची गणना अत्यावश्यक सेवेत केली आहे. तेव्हा कसल्याही अपप्रचाराला बळी न पडता, सोशल मीडियामधून आदळणाऱ्या अर्धवट आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता, कोरोनाशी लढाई लढण्यास सज्ज होऊया.

आपापले स्वास्थ्य अबाधित राखतानाच ‘वसुधैव कुटुंबकम’च्या मंत्रास जागून या संकटातून बाहेर पडून सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी हातात हात घेऊन काम करूया. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला गांभीर्य व मन:पूर्वक प्रतिसाद देत ही लढाई लढण्यास सिद्ध होऊन आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनावर विजयाच्या संकल्पाची गुढी उभारूया. लोकमत माध्यम समूह त्यासाठी कटिबद्ध आहेच, वाचक म्हणून आपलीही साथ हवीय. अर्थात, ती मिळेलच असा पूर्ण विश्वास आहे!

Web Title: Coronavirus: Gudhi Raising Victory Resolution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.