शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मित्रांना वाकवतो, काँग्रेस स्वत: वाकते!

By यदू जोशी | Updated: March 1, 2024 09:13 IST

अर्थात मित्रपक्षांना वाकवणे ही सध्या भाजपची गरज आहे आणि मित्रांना सांभाळून घेणे ही काँग्रेसची मजबुरी आहे, हेही खरेच!

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वांत मोठा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल. क्रमांक दोनला काँग्रेस अन् तीनला शरद पवार यांची राष्ट्रवादी राहील. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तोवर वाटाघाटींमध्ये काँग्रेस वरचढ होती. अशोकराव आणि खा. संजय राऊत यांच्यात अनेकदा खडाजंगी व्हायची. आता शिवसेना फ्रंटफूटवर अन् काँग्रेस बॅकफूटवर गेलेली दिसते. संजय राऊत महायुतीवर तुटून पडतात तेव्हा ते काँग्रेसवाल्यांना डार्लिंग वाटत असतील; पण आता जागावाटपाच्या चर्चेत राऊत बोलू लागले की, काँग्रेसवाल्यांचे डोके दुखत असेल. अशोकरावांच्या भाजपमध्ये जाण्याने नांदेड, हिंगोली वा मराठवाड्यातच फरक पडलेला आहे असे नाही. चर्चेत काँग्रेस माघारल्याचे नुकसानही झाले आहेच. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा आपल्याकडे घेण्याची काँग्रेसला सर्वांत मोठी संधी अजूनही आहे. कारण सोबतचे दोन्ही पक्ष फुटफाट झालेले आहेत. २०१९ मध्ये भाजपलाही शिवसेनेचे एवढे प्रेम आले की, त्यांना २३ जागा लढवायला देऊन टाकल्या. आपण देशात एकट्याने २०० पर्यंतही जाणार नाही, असा न्यूनगंड भाजपला होता आणि त्यातून शिवसेनेचे लाड केले गेले. आता तीच चूक ठाकरेंच्या फुटलेल्या शिवसेनेबाबत काँग्रेस   करीत आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांना वाटाघाटीत वाकवतो आणि काँग्रेस मित्रांसमोर वाकते, हा फरक आहे. 

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी जोर लावून जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचल्या पाहिजेत, असे कार्यकर्त्यांना वाटते; पण ते राज्यातील नेत्यांना वाटते का, हे महत्त्वाचे आहे. केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी इथल्या नेत्यांना सांगितले आहे म्हणतात की, दाबदूब करून ३२ जागा आपल्याकडे घ्या. काँग्रेसच्या श्रेष्ठींचा राज्यातल्या त्यांच्या नेत्यांना निरोप आहे म्हणतात की, मित्रांना सांभाळून घ्या, त्यांना दुखावू नका, दोन जागा जास्त द्यायच्या तरी द्या. दोन पक्षांमधील शीर्षस्थ नेत्यांच्या मानसिकतेत हा फरक आहे. 

अर्थात मित्रपक्षांना वाकवणे ही भाजपची (त्यातल्या त्यात मोदी ब्रँडची) गरज आहे आणि मित्रांना सांभाळून घेणे ही काँग्रेसची मजबुरी आहे, हेही समजून घेतले पाहिजे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला हैराण केले आहे. आधी किमान समान कार्यक्रम दिला, मग पुरवणी किमान समान कार्यक्रम दिला. तुम्ही तीन पक्षांमध्ये कोणकोणत्या जागा वाटून घेतल्या आहेत ते मला आधी सांगा, अशी अट टाकली. आता तीन पक्षांनी ओबीसींना, दलितांना इतक्या संख्येने जागा दिल्या पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला आहे. एकूणच काय, तर आंबेडकर महाविकास आघाडीसाठी अवघड जागेचे दुखणे बनले आहेत. राज ठाकरेंच्या मनसेचे काय होईल? महायुतीसोबत जाणे किंवा स्वबळावर लढणे असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. स्वत:च्या मनाने राज निर्णय घेतील की भाजपने ठरवून दिलेल्या अजेंड्यावर चालतील? जी काही भूमिका घेतली तिचे समर्थन कसे करायचे हे त्यांना ठावूक आहे. शिवाय त्यांना कोणाला विचारायची गरज नाही. कारण त्यांचा कोणीही नेता नाही. 

खासदारकी नको भाऊ! एखाद्या आमदाराचे नाव लोकसभेसाठी चर्चेत असल्याचे लिहिले रे लिहिले की, त्याचा फोन येतो, “भाऊ! असं का बरं करता?- राहू द्या नं! मी जिथे आहे तिथे बरा आहे, कुठे दिल्लीत पाठवता. दिल्ली आपल्याला पचणार नाही. सहा महिन्यांनी पुन्हा आमदार झालो तर मंत्री होऊ इथेच!” -विशेषत: भाजपमध्ये दिल्लीबाबतची टाळाटाळ अधिक आहे. मोदी, शहा या हेडमास्तरांच्या शाळेत जायला बरेच जण घाबरतात. जिंकण्यासारखी स्थिती असूनही अशी स्थिती आहे. काँग्रेसमध्येही वेगळे चित्र नाही. फक्त कारणे वेगळी आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांपासून कोणालाही देशाच्या राजधानीत जायचे नाही, असे दिसते. खासदारकी म्हणजे डिमोशन असे का वाटत असेल सगळ्यांनाच? 

भाजपमधील अशांत टापूभाजपमध्ये सर्वांत जास्त गटबाजी असलेले जिल्हे कोणते? याचा क्रम लावायचा ठरले तर लातूर टॉपवर आहे. लातूरने अमरावतीला मागे टाकले आहे. अमरावतीतील भाजपच्या नेत्यांना हा अपमान वाटून ते पहिल्या क्रमांकावर येण्याची नक्कीच धडपड करतील. नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून गटबाजी उफाळून येईल. राणा उमेदवार असतील तर आम्ही काम करणार नाही; उलट वाट लावू असे तेथील भाजपच्या अर्ध्या डझन नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितले आहे म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली अशी माहिती आहे; पण ते समजून घेतील का? अमरावतीत एकमेकांना केलेल्या जखमा लगेच भरून निघण्याची शक्यता कमीच आहे. भाजपमध्ये राजकीय हेव्यादाव्यांबाबत लातूर, अमरावतीला टक्कर देतोय तो माढा लोकसभा मतदारसंघ. तेथील भाजप अंतर्गत वादाला राष्ट्रवादीचे बडे नेते फोडणी देत आहेत. पाठोपाठ अहमदनगरदेखील आहेच. भाजपसाठी आपसात भरपूर खदखद असलेले हे काही अशांत टापू आहेत. आधी सोलापूर टॉपला होते, आता ते काहीसे सुधारलेले दिसते. भिवंडीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात कोल्डवॉर आहे.

जाता जाता : एकदा एका राजाने दुसऱ्या राजाला टार्गेट करण्यासाठी एका लढवय्याचा वापर केला. मग लढवय्याने त्या दुसऱ्या राजावर हल्ला केला. तिसऱ्या एका राजाने समाजाचे नेते आपणच कसे हे सिद्ध करण्यासाठी त्या लढवय्याचा वापर केला. तिन्ही राजांचा फायदा झाला अन् लढवय्याची कोंडी झाली. या कथेतले तीन राजे कोण, लढवय्या कोण, हे महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे पाहून तुम्हाला समजले असेलच.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा