दृष्टीकोन - कोरोनाचा आजार... अफवांचा बाजार... जनसामान्य बेजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 02:49 AM2020-08-06T02:49:10+5:302020-08-06T02:51:43+5:30

मुळात कोरोना विषाणू चीनमधून आला हे आता जगभरात सर्वमान्य झाले आहे. चीनच्या वूहान प्रांतात नोव्हेंबर २०१९ मध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

Attitude - Corona disease ... Rumors market ... General boredom! | दृष्टीकोन - कोरोनाचा आजार... अफवांचा बाजार... जनसामान्य बेजार!

दृष्टीकोन - कोरोनाचा आजार... अफवांचा बाजार... जनसामान्य बेजार!

Next

चंद्रकांत कित्तुरे ।

कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात वेगाने होतो आहे. बाधितांची संख्या १८ लाखांवर गेली आहे. याचवेळी कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३८ हजारांवर आहे. दररोज सुमारे ५५ हजार या गतीने बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. यात कोणतीही लक्षणे नसलेल्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. कोरोना विषाणू, त्याच्या होणाऱ्या चाचण्या यांबाबत समाज माध्यमांमधून व्हायरल होणाºया पोस्टमुळे समाजात अफवांचा बाजार सुरू आहे. त्यामुळे खरे काय अन् खोटे काय हे कळत नसल्याने सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. कुणी यात राजकारण पाहू लागले आहे, कुणाला मोदी सरकारने चीन-भारत सीमातंट्यावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी जाणीवपूर्वक सुरू केलेला हा उद्योग (?) वाटतो, तर कुणाला यामागे वैद्यकीय व्यवसायातील साखळी वाटते. कुणाला यात सरकारी अधिकाऱ्यांची खाबूगिरी दिसते. प्रत्यक्षात या सर्व अफवा आहेत हे जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला पटणार नाही, तोपर्यंत हा अफवांचा बाजार जोरात असणार हे स्पष्ट आहे.

मुळात कोरोना विषाणू चीनमधून आला हे आता जगभरात सर्वमान्य झाले आहे. चीनच्या वूहान प्रांतात नोव्हेंबर २०१९ मध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. चीनने सुरुवातीला ही बाब लपवून ठेवली. जानेवारीमध्ये कोरोना विषाणू संसर्ग सुरू असल्याचे मान्य केले. दरम्यान, अन्य देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. भारतात केरळमध्ये ३० जानेवरीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने ही महामारी असल्याचे जाहीर केल्यानंतर २४ मार्चला भारतात पहिल्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला. तोपर्यंत लॉकडाऊन म्हणजे काय, हा शब्दच सर्वसामान्यांच्या शब्दकोशात नव्हता. उद्योगातील टाळेबंदीपुरता एका ठरावीक वर्गापुरताच तो मर्यादित होता. लॉकडाऊन काळात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यात यश आल्याचा दावा सरकार तसेच तज्ज्ञ मंडळींनी केला आहे. मात्र, या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला. उद्योग, व्यवसायासह मानवी जीवनच जणू ठप्प झाल्यासारखे झाले. केंद्र सरकारने त्यावर पॅकेजची मात्रा दिली, तरी ती पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकूणच कोरोना आणि सरकारचे धोरण याबाबत समाजात समज, गैरसमज निर्माण होऊ लागले. याला कारणेही तशी घडली.

लॉकडाऊन शिथिल होताच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये कमी पडू लागली. त्यामुळे तात्पुरती उपचार केंद्रे सुरू केली. आजही ती करण्यात येत आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात भाजपच्या मुंबईतील एका महिला आमदाराने एका रुग्णापाठीमागे केंद्र सरकार दीड लाख रुपये देत असल्याचे सांगणारा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आणि वाढती रुग्णसंख्या ही जाणीवपूर्वक वाढवली जात आहे का, अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. याला कारण आढळणाºया रुग्णांमध्ये कोरोेनाची कोणतीही लक्षणे नसणाºयांचे प्रमाण जादा असणे हे होते. दरम्यान, त्या महिला आमदाराने तो व्हिडिओ फेक आहे, तो आवाज आपला नाही, असा खुलासा केला. मात्र, हा गैरसमज काही कमी झाला नाही. उलट यात भर पडली ती खासगी रुग्णालयांमधील उपचार आणि त्यांची बिले यासंदर्भात समाज माध्यमांमध्ये व्हायरला होणाºया पोस्टची. यात मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयातील दोन डॉक्टरांमधील संवादाच्या पोस्टने तर कोरोनाचा व्यवसाय सरकारनेच सुरू केल्याचे पसरविण्यात मोठा हातभार लावला. अशा पोस्ट व्हायरल होत असतील, तर का नाही पसरणार अफवांचा बाजार. मुळात कोरोना हा आजारच नाही, तो विषाणू आपल्या शरीरात आधीपासूनच आहे, फक्त त्याचा शोध आता लागला आहे, असा दावाही काहीजण करतात. घराबाहेर पडले नाहीत. इतरांच्या सहवासात आलेले नाहीत असे काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे ते या दाव्याच्या समर्थनार्थ सांगतात. असे असले तरी कोरोना विषाणूच्या लक्षणांचा अभ्यास अनेक संस्था व तज्ज्ञांनी केला आहे व करत आहेत. जामा नेटवर्क ओपनच्या संशोधकांनी वूहानमध्ये केलेल्या अभ्यासात ४२ टक्के रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेले आढळले आहेत, तर आॅस्ट्रेलियात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ५९ टक्के रुग्ण कोरोनाची लक्षणे नसलेले होते. इंडियाना विद्यापीठ, तसेच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील संस्थेने केलेल्या अभ्यासातही ४५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आढळले आहेत. भारतातही लक्षणे नसलेले रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे आणि कोरोनाने केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे या साथीचे कशाला कोण राजकारण करेल?

 

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार करीत असलेले प्रयत्न, या रुग्णांच्या उपचारावर होणारा खर्च पाहता जनतेला घरात कोंडून, उद्योग- व्यवसाय बंद ठेवायला लावून अर्थव्यवस्था डब्यात घालण्याचा उद्योग कशाला कोणते सरकार करेल? एवढा साधा प्रश्नही अफवा पसरविणाºयांना पडत नाही. त्या रोखण्यासाठी, तसेच उपचार व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करायला हव्यात, अन्यथा लस सापडून कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत हा अफवांचा बाजार गरमच राहणार आणि जनता आणखी बेजार होणार हे निश्चित.

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये वृत्तसंपादक आहेत)

Web Title: Attitude - Corona disease ... Rumors market ... General boredom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.