लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 08:59 IST2025-06-25T08:58:02+5:302025-06-25T08:59:34+5:30

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते.

Article: Why should people keep money in a bank savings account at a loss? | लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?

लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?

- ॲड. कांतीलाल तातेड (अर्थशास्त्राचे अभ्यासक)
स्टेट बँक ऑफ इंडिया १० कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवर २.७० टक्के, तर १० कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवर ३ टक्के दराने व्याज देत असे; परंतु १५ जूनपासून स्टेट बँकेने सर्व बचत खात्यांवरील व्याजदर २.५० टक्के केला आहे. एचडीएफसी बँकेमागोमाग इतर बँकाही बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व बँकांतील बचत खात्यांमध्ये ७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा असून त्यापैकी २० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम महिलांच्या बचत खात्यात जमा आहे. मे २०२५ मध्ये किरकोळ महागाईचा दर २.८२ टक्के होता. तर बचत खात्यावर मिळणारे व्याज महागाईच्या दरापेक्षाही कमी आहे. हे योग्य आहे का?

गरिबातल्या गरिबाने भविष्यासाठी थोडी-थोडी का होईना बचत करावी, यासाठी बचतीवर आकर्षक व्याज देऊन घरगुती बचतीचे प्रमाण वाढवावे हा बचत खाती सुरू करण्यामागचा मूळ उद्देश. २० ऑगस्ट, १९९३ पूर्वी बचत खात्यावर ६ टक्के दराने व्याज दिले जात होते. आता मात्र उद्योगपतींना स्वस्त दराने कर्जे मिळावीत, बँकांच्या नफ्यात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश झाला आहे.

वाढणारी महागाई, रुपयाचा होणारा मूल्यऱ्हास यांसारख्या आर्थिक निकषांच्या आधारे व्याजदर निर्धारित करणे आवश्यक असते. वाढत्या महागाईमुळे गुंतवणुकीचे वास्तव मूल्य वेगाने कमी झाल्याने गुंतवणूक करण्यामागील मूळ हेतूच विफल होतो. व्याजदर निश्चित करताना गुंतवणूक योजनेचा मूळ उद्देशही लक्षात घेणे आवश्यक असते. आपल्या देशात गुंतवणुकीपासून मिळणारे व्याजाचे उत्पन्न हेच कोट्यवधी लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते, हेही येथे महत्त्वाचे. 

२०२५ चा किरकोळ महागाईचा निर्देशांक २.८२ टक्के आहे.  बचत खात्याचे व्याजदर  त्यापेक्षा जास्त असावयास हवेत; परंतु स्टेट बँकेने उलट त्यात कपात केली आहे. प्राप्तिकराचा विचार केला तर १० टक्क्यांच्या टप्प्यात करपात्र उत्पन्न असणाऱ्या गुंतवणूकदारांना २.२४ टक्के, २० टक्क्यांच्या टप्प्यात असणाऱ्यांना १.९८ टक्के, तर ३० टक्क्यांच्या टप्प्यातील गुंतवणूकदारांना १.७२ टक्केच व्याजदर पडतो. त्यामुळे  बचत खात्यातील गुंतवणुकीवर उत्पन्न तर सोडाच, प्रत्यक्षात मुद्दलातच मोठ्या प्रमाणात घट होत असते.

‘आजकी बचत, कलका उजाला’ असे म्हणतात. प्रत्यक्षात मुद्दलातच वेगाने होणारी घट पाहता ‘आजकी बचत, कलका अंधेराही अंधेरा’ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते. महागाईचा दर २.८२ झाला याचा अर्थ महागाई कमी झाली असा नव्हे, तर महागाई वाढण्याचा वेग त्या महिन्यात कमी झालेला असतो. उदा. एप्रिल १९८७ मध्ये बचत खात्यावर ६ टक्के व्याज मिळत होते. त्यावेळी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ६९१ होता. आता मार्च २०२५ मध्ये तो ९४००.६२ इतका आहे. म्हणजेच केवळ महागाई निर्देशांकाचा विचार केला तरी या कालावधीत महागाईमध्ये १३.६० पटींनी वाढ झालेली आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला या आधारावर गुंतवणुकीवरील व्याजदर कमी करणे अन्यायकारक असते. त्यामुळे महागाईचा दर जर २.८२ टक्के आहे. तर बचत खात्यातील गुंतवणुकीच्या व्याजदरात कपात करून ते २.५०टक्के करणे अन्यायकारकच आहे.
kantilaltated@gmail.com

Web Title: Article: Why should people keep money in a bank savings account at a loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.