लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 07:25 IST2025-06-28T07:22:49+5:302025-06-28T07:25:42+5:30

केवळ तापमान कमी सेट करून आपले घर थंड होईल, ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. घराची रचना आणि बांधकाम  पर्यावरणपूरक असणे रूमच्या रचनेप्रमाणे योग्य क्षमतेचा एसी लावणे, त्याची जागा योग्य ठिकाणी असणे अशा अनेक गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात.

Article: The AC in your house won't be 'very' cold anymore! | लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

- डॉ. विशाल तोरो (अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक)
केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकतेच जाहीर केले की, भारतात वातानुकूलित संचासंदर्भात (एसी) नवीन नियमावली येणार आहे. या नवीन नियमानुसार आगामी काळात विकल्या जाणाऱ्या एसी संचांसाठी (घरगुती तसेच व्यावसायिक वापर) किमान तापमान २० अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २८° सेल्सिअस ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

याचाच अर्थ असा की, या तापमान श्रेणीपेक्षा कमी अथवा जास्त तापमानाला भविष्यातले एसी संच वापरता येणार नाहीत. केंद्र शासनाचा हा निर्णय एकत्रित विचार करता स्वागतार्ह आहे, असेच म्हणावे लागेल. विशेषकरून सरकारच्या या धोरणामुळे एसी चालविण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण संरक्षण आणि दीर्घकालीन शाश्वत विकास ही उद्दिष्टे साध्य होण्यास नक्कीच हातभार लागेल.

सतत होणारे हवामान बदल, वाढते शहरीकरण, बदलत चाललेली जीवनशैली यामुळे घराघरांत आणि कामाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी एसीचा वापर ही आता ऐच्छिक बाब न राहता आवश्यक आणि सुविधा बनली आहे. याचाच परिपाक म्हणून देशात एसीचा वापर झपाट्याने वाढत आहे. हे सर्व एसी संच लक्षणीय प्रमाणात वीज वापरत असल्याने, देशात विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

हा वीजपुरवठा करताना कंपन्यांच्या वीज वितरण प्रणालीवरही ताण येत आहे. यातील बरीचशी वीजनिर्मिती ही जीवाश्म आधारित इंधने (जसे की कोळसा) वापरून होत असल्यामुळे अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास एसींचा वापर बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. एसीचे तापमान सेटिंग जेव्हा आपण १ अंश सेल्सिअसने कमी करतो, तेव्हा विजेचा वापर सुमारे ६ टक्क्यांनी वाढतो. 

तात्पर्य, एसी जितक्या कमी तापमानावर चालवू, तितका विजेचा वापर जास्त होणार. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, केवळ एसीच्या वापरामुळे भारतात सन २०३० पर्यंत १२० गीगावॅट एवढ्या प्रचंड क्षमतेच्या विजेची गरज भासणार आहे. 

एसीचा वापर प्रामुख्याने, घरांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी (शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, शोरूम्स इ.) केला जातो. सार्वजनिक ठिकाणचे एसी संच हे मोठ्या क्षमतेचे आणि केंद्रीकृत (centralized) असतात. आपण घरांत एसी वापरताना, प्रस्तावित नियमांच्या अनुषंगाने काही प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.

जसे की, बाहेरचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना, सुचवलेल्या २० ते २६ अंश सेल्सिअस श्रेणीत एसी सेट केला तर रूममधील तापमान आरामदायक राहील का? तज्ज्ञांच्या मते, घराबाहेरील तापमान कितीही जास्त असले तरी घरात एसी २५ अंश सेल्सिअसच्या आसपास सेट करणे योग्य आहे. एसी यापेक्षा खूप कमी तापमानावर करून दीर्घकाळ चालवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

केवळ तापमान कमी सेट करून आपले घर थंड होईल, ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. घराची रचना आणि बांधकाम  पर्यावरणपूरक असणे रूमच्या रचनेप्रमाणे योग्य क्षमतेचा एसी लावणे, त्याची जागा योग्य ठिकाणी असणे अशा अनेक गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. मुख्यत्वे उन्हाळ्यात दुपारी घरांची काँक्रीट छते खूप तापतात. अशा समस्यांवर तोडगा म्हणून आजकाल बाजारात रासायनिक आवरणे उपलब्ध आहेत, ज्यांचा लेप छतांवर लावला असता घर आतून थंड राहण्यास मदत होते.

या सर्व उपाययोजना घर थंड ठेवण्यास मदत करतात. बरेच वेळा आपण एसी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमानावर सेट करतो आणि मग थंडी वाजते म्हणून जाड पांघरूण घेऊन झोपतो! एसीचा असा वापरही योग्य नाही. तसेच एसी विकत घेताना, ५-स्टार रेटिंग असलेले, कार्यक्षम एसी संच घेण्याचा सर्व ग्राहकांनी आग्रह धरायला हवा, जेणेकरून विजेचा वापर कमी होईल. 

तात्पर्य, आगामी काळात एसी वापरासंबंधी केंद्र शासनाची नियमावली ही ऊर्जेचा वापर, पर्यावरण संरक्षण आणि दीर्घकालीन शाश्वत विकास या सर्वसमावेशक बाबींचा विचार करता नक्कीच स्वागतार्ह आहे. एसीचा वापर २० ते २८ अंश सेल्सिअस या स्वागतार्ह तापमान श्रेणीत करणे हे वापरकर्त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे आहे. मात्र हे बदल घडवून आणण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाद्वारे अनुपालन करणे पुरेसे नाही, तर त्याच्या जोडीला  एसीच्या वापरासंबंधीची जबाबदार मानसिकता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
v.v.toro@gmail.com

Web Title: Article: The AC in your house won't be 'very' cold anymore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.