दहावी-बारावीची परीक्षा देताय? चिंता कमी करण्यासाठी मुलांनी अन् पालकांनी ही अष्टसूत्री वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 07:37 IST2026-02-08T07:36:21+5:302026-02-08T07:37:03+5:30
कधी कधी मूल अतिचिंतेमुळे अभ्यास करू शकत नाही. अशावेळी मुलांना पालकांनी धीर दिला पाहिजे.

दहावी-बारावीची परीक्षा देताय? चिंता कमी करण्यासाठी मुलांनी अन् पालकांनी ही अष्टसूत्री वाचा...
डॉ. शैलेश उमाटे
मानसोपचारतज्ज्ञ
ऐन परीक्षेच्या काळात मुलांना बऱ्याच गोष्टींचं टेन्शन येत असतं. मला मार्क्स बरोबर पडतील का? मी पास होईल का? मला परीक्षेत सर्व आठवेल का? अशा विविध प्रश्नांनी ९० टक्के मुले चिंतातुर झालेली असतात, पण स्वतःला अभ्यासात किंवा परीक्षेचा पेपर लिहिण्यात गुंतवून घेतल्यास मनातून या चिंता दूर होतात आणि व्यवस्थित अभ्यास होतो. चिंता कमी होण्यासाठी मुलांनी, तसेच पालकांनी परीक्षेच्या आधी काही गोष्टी केल्या, तर परीक्षा ही परीक्षा न वाटता सहज सराव वाटतो.
परीक्षा काळातील घरातील वातावरण कसे ठेवले पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलाला अभ्यासासाठी एक जागा नेमून दिली पाहिजे. तेथे बाहेरील किंवा घरातील आवाज कमीत कमी असला पाहिजे. पुरेसा प्रकाश, बसण्याची सुविधा असल्यास मुले अभ्यासावर फोकस करू शकतात.
घरातील विविध उपकरणे जसे की, टीव्ही, मोबाइलचा वापर कमीत कमी केला पाहिजे. लक्ष विचलित होईल अशी गॅझेट्स बंद ठेवली तर अतिउत्तम. या काळात मुलांना घरातील किंवा बाहेरील कामे सांगणे सहसा टाळावे.
प्रत्येक पालकाने मूल व्यवस्थित जेवते की नाही, व्यवस्थित झोपते की नाही, याचा काटेकोर अंदाज घेतला पाहिजे. जेवण, झोप व्यवस्थित असेल तरच मूल अभ्यासात आणि परीक्षेत प्रगती करू शकते.
दररोजचा सामान्य आहारच मुलांना द्यावा. मूल खूप खात नसेल तर फळे, ज्यूस, मिल्क शेक द्यायला पाहिजे. मॅगी, पास्ता आणि इतर जंक फूड पूर्णपणे टाळले पाहिजे.
कधी कधी मूल अतिचिंतेमुळे अभ्यास करू शकत नाही. अशावेळी मुलांना पालकांनी धीर दिला पाहिजे. मार्क्स किंवा रिझल्टवर लक्ष देऊ नको, असे त्यांना वारंवार सांगावे.
मुलांनी परीक्षेचे साहित्य जसे की, हॉल तिकीट, पेन्सिल, पेपर, पेन हे घरात एकाच ठिकाणी ठेवले पाहिजे. तेथूनच ते साहित्य स्वतःबरोबर परीक्षेत घेऊन गेले पाहिजे. परीक्षा देऊन परत आल्यावर ते साहित्य त्याच ठिकाणी ठेवले पाहिजे.
मुलाना मुलांनी रिलॅक्सेशन थेरेपी किंवा ध्यान या गोष्टी शिकायला पाहिजे. परीक्षेत किंवा या काळात जर खूप तणाव जाणवत असेल, पाच मिनिटांसाठी रिलॅक्सेशन केल्यास मुलांचा मेंदू शांत होऊन त्यांना बऱ्याच छान पद्धतीने प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात.
परीक्षा ही जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण, ती जीवनापेक्षा महत्त्वाची कधीच नाही. म्हणून परीक्षेला महत्त्व दिले पाहिजे, पण जीवनापेक्षा किंवा स्वतःच्या अस्तित्वापेक्षा कधीही त्यास जास्त महत्त्व देऊ नये.