हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
अधिकृतपणे काहीही सांगण्यात येत नसले तरी भाजपमध्ये एका व्यक्तीचा दबदबा खूपच वाढला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पक्षाचे अप्रत्यक्ष अध्यक्ष असल्यासारखे समोर येत आहेत. शाह यांचे राज्याराज्यांत दौरे चालू असून, पक्षाचे नेते आणि मित्रपक्षांबरोबर ते बैठका घेत आहेत. कुठे जागावाटपाबाबतचे विषय, तर कुठे स्थानिक वाद यात लक्ष घालून निवडणूक धोरणे मार्गी लावण्यातही ते मग्न आहेत. जयप्रकाश नड्डा यांच्यापेक्षाही झंझावती दौरे त्यांनी अलीकडेच केले, हे अनेकांच्या नजरेतून सुटलेले नाही. भाजपच नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांच्या बरोबर होणाऱ्या बैठकाही ते घेत आहेत. २०२५-२६ या वर्षात होऊ घातलेल्या घडामोडीत निर्वेध मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे प्रयत्न चालले आहेत.‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्यावेळी शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणामुळे त्यांच्या एकूण कामाच्या झपाट्याच्या विषयावर दिल्लीत चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नसतील तर संरक्षण खाते सांभाळणारे, सर्वात ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह हे चर्चेला उत्तर देतील असे अपेक्षित होते. परंतु ते उत्तर शाह यांनी दिले. अत्यंत घणाघाती भाषण अमित शाह यांनी केले. संसदेतील ताकदीपलीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न दिसला.भाजपच्या संपूर्ण सौर मालिकेत अर्थातच मोदी निर्विवादपणे केंद्रस्थानी आहेत. परंतु त्याच वेळी शाह यांची भ्रमणकक्षा वाढत असल्याने राजकीय निरीक्षकांना आश्चर्य वाटते आहे. यात नवे काही नाही, असेच भाजप अधिकृतपणे सांगत आहे. परंतु सत्तावर्तुळात त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अमित शाह यांचे नाव जास्त ठळकपणे समोर येत असेल तर असे लक्ष जाणे स्वाभाविकही आहे.भाजप विरुद्ध भाजप :बलियान यांनी रुडींचा किल्ला भेदलाभाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये प्रशासकीय सचिवपद गेली २५ वर्षे उपभोगले. परंतु, आता त्यांचे स्थान धोक्यात आले आहे. विरोधकांनी त्यांना आव्हान दिलेले नाही, तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील संजीव बलियान यांनी हे घडविले आहे. १२ ऑगस्टला कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये निवडणूक होत आहे. रूडी यांचे क्लबमधील स्थान एकेकाळी अबाधित मानले जात होते. परंतु आता त्याला आव्हान दिले गेले आहे. संजीव बलियान हे पक्षाचे मुझफ्फरनगरचे ग्रामीण चेहरा असलेले माजी खासदार आहेत. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली याचे अनेकांना आश्चर्य वाटले. बलियान यांना पक्षाच्या श्रेष्ठींचे आशीर्वादही मिळवले. मंत्री, पक्षाचे खासदार उघडपणे त्यांच्यासाठी काम करत होते. रुडी यांना हटविण्यासाठी हे चालले आहे, असा संकेत यातून दिसत होता.रुडी यांनी क्लबला पंचतारांकित स्वरूप दिले. तेथे जिम, स्पा, मोठे ग्रंथालय अशा सुविधा निर्माण केल्या याचे श्रेय त्यांना दिले जाते. पण आता त्यांची पकड ढिली पडलेली दिसते. बलियान यांनी माघार घ्यावी यासाठी रुडी यांच्या समर्थकांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ही प्रतिष्ठित संस्था मानली जाते. १२००च्या घरात तिचे मतदार असून, त्यामध्ये मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे यांच्यासारखे मतदार आहेत. हे भाजपच्या अंतर्गत उठावाचे प्रकरण असले तरी त्याने सर्वांचे लक्ष वेधले. एकेकाळी ज्यांना धक्का लावता येणार नाही असे मानले जाणारे रुडी आता आपली इभ्रत राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. क्लबमधील आरामदायी स्पामध्ये राजकीय चर्चेला ऊत आला असला तरी आतमध्ये वादळ घोंगावते आहे. ते भाजपतूनच आलेले आहे. रुडी यांच्या किल्ल्याला तडे गेले असून, यावेळी त्यांच्या शत्रुपक्षाचा रंगही त्यांच्यासारखाच आहे.भाजप-अकाली फेरजुळणीचे संकेतलुधियानातील पोटनिवडणुकीने रात्रीतून राजकीय समीकरणे बदलली नसली तरी भाजप आणि शिरोमणी अकाली दलात फेरजुळणी होण्याच्या शक्यतेविषयी पुन्हा चर्चा नक्कीच सुरू झाली आहे. या दोन जुन्या मित्रांनी एकमेकांना केलेल्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत, तरी आता त्यांना ‘आप’च्या रूपाने समान शत्रू समोर दिसतो आहे. लुधियानाची जागा आपने ३५,१७९ मतांनी सहजपणे खिशात टाकली. त्याच वेळी भाजप (२०,३२३) आणि अकाली (८,२०३) या मतसंख्येने निरीक्षकांचे लक्ष वेधले. त्यांनी दोघांनी मिळून २८,५२६ मते मिळवली. ‘आप’च्या ते फार मागे पडले नाहीत. काँग्रेसला पडलेल्या २४,५४२ मतांपेक्षा ही मते जास्त होती. सुखबीर बादल यांनी बोलताना अत्यंत काळजीपूर्वक शब्दयोजना केली. दोन्ही पक्षांच्या फेरजुळणीचे संकेत मिळत असताना भाजप आणि शिरोमणी अकाली दलात समझोता होईल काय? असे विचारले असता बादल म्हणाले, ‘आम्ही त्या दिशेने विचार करत नाही. कोणतीही आघाडी तत्त्वांवर आधारित असली पाहिजे. शेतकरी, अल्पसंख्याकांचे हक्क, आमच्या नदीचे पाणी आणि आमचा चंदीगडवरील दावा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत’ असे बादल म्हणाले. त्यांनी दरवाजे उघडे ठेवले आहेत, असा अर्थ त्यातून काढला गेला. मात्र उभय बाजूतील कटुता खोलवरची आहे. भाजपने शीख संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवल्याने अकाली भडकले. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचा ताबा भाजपने घेतला याचा संबंध त्यांच्याशी आहे. शेतीविषयक कायद्यामुळे झालेल्या जखमा अजून भरलेल्या नाहीत, असे असले तरी राजकारणात काहीही घडू शकते. दोन्ही पक्षांच्या समोर २०२७ साल आहे. ‘आप’ला हरवायचे तर स्वाभिमान बाजूला ठेवायला दोन्ही पक्ष तयार होतील. तूर्त उभय बाजू यावर काही बोलत नाहीत, यातूनच पुष्कळ कळते. harish.gupta@lokmat.com