शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचेही ‘तत्त्व’ राखितो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 07:59 IST

शुक्रवारी दुपारी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, श्रीमती तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल.

शुक्रवारी दुपारी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, श्रीमती तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल, तेव्हा दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या मराठी मनांच्या सर्जनशील स्पंदनांचे सात दशकांचे वर्तुळ पूर्ण होईल. या संमेलनात, उद्घाटनात आणि स्वरूपातही अनेक साम्यस्थळे आहेत. १९५४च्या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले. काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते, तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संमेलनाध्यक्ष होते. त्याचवेळी देशभरातील भाषांचा व्यवहार पाहणारी साहित्य अकादमी आकार घेत होती. नॅशनल ॲकेडेमी ऑफ लेटर्स या ब्रिटिश आमदानीतील संस्थेला देशी आंगडेटोपडे घातले जात होते. पंतप्रधान नव्हे तर लेखक नेहरू त्या अकादमीचे अध्यक्ष बनत होते. नरहर विष्णू उपाख्य काकासाहेब गाडगीळ हे नुसतेच दिल्लीच्या सत्तावर्तुळातील मोठे नाव नव्हते, तर लेखक म्हणूनही सारस्वताच्या प्रांतात त्यांना मान्यता होती.

 तर्कतीर्थ हे त्या काळातील ख्यातनाम धर्म मीमांसक होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हे त्या तिघांचेही समान सूत्र होते. तो संदर्भ आताच्या तिघा-चाैघांना जोडण्याची गरज नाही. कारण, देशाच्या स्वातंत्र्यानेही आता पाऊणशे वयमान गाठले आहे. ‘प्रगल्भ अशा प्रादेशिक मातृभाषा ही भारतीय लोकशाहीची मुख्य गरज आहे’, असे ७१ वर्षांपूर्वी अध्यक्षीय भाषणात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री म्हणाले होते. ते आज निश्चितच प्रासंगिक आहे. यंदाच्या संमेलनाला मराठीला अभिजात दर्जाचे कोंदण आहे. आपली मराठी अभिजात आहे, तिचा दर्जा सर्वोत्तम आहे, हा आत्मविश्वास प्रथमच या संमेलनात असेल. मराठीचे साहित्य वारकरी, वाचक-रसिकांच्या देहबोलीत तो अभिमान असेल. आधी काही न्यूनगंड असलाच तर तो दूर झालेला असेल. उद्घाटन समारंभात अभिजात दर्जासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले जातील. आता मराठीचे अधिक गोमटे व्हावे, ही अपेक्षा व्यक्त होईल. त्यासाठी सरकार काय करणार, याची विचारणा होईल. अध्यासन वगैरे आकर्षक घोषणाही होतील. तथापि, तेवढे पुरेसे आहे का आणि अशा परस्पर काैतुकाने तुझ्या गळा-माझ्या गळा करून नेमके काय साधले जाणार आहे, यावर गंभीर चिंतन होणे गरजेचे आहे. केवळ सरकारच भाषेचे भले करू शकते का, हा प्रश्न त्या चिंतनाच्या केंद्रस्थानी असेल. तो यासाठीही महत्त्वाचा आहे की, श्रीमती तारा भवाळकर यांना अध्यक्षपद हे यंदाच्या संमेलनाचे खास विशेष आहे. ‘भूपाळी ते भैरवी’ हा दीड तासाचा संगीतमय कार्यक्रमवगळता प्रत्यक्ष संमेलनात हा विशेष प्रतिबिंबित झाला नाही हे खरे. पण, ते खूप महत्त्वाचे नाही. लोकसंस्कृतीच्या प्रवाहात महिलांनी भरलेले रंग, दिलेला गोडवा याविषयी ताराबाईंच्या चिंतनाला मिळालेली मान्यता अधिक महत्त्वाची. खाणे-पिणे, पेहराव, प्रथा-परंपरा, सण-उत्सव यांच्यासोबत भाषा ही संस्कृतीचे प्रतीक व चेहराही असतो. ती शब्दांशी खेळते. त्यातून संवाद घडतात. लोकसंस्कृतीचा प्रवाह खळाळत राहतो. लोकजीवन, संस्कृती शहरी असो, ग्रामीण, आदिम की अन्य कोणते, भाषा लोकसंस्कृतीची बोलकी वाहक असते. तीच तिच्या अन्य बहिणींशी संवाद साधते. त्यातून स्वत:ला विकसित करते, विस्तारत नेते.

   आधी घुमान व आता दिल्ली संमेलनाच्या निमित्ताने हा प्रवाह आता हिमालयाच्या कुशीत स्थिर होऊ पाहात आहे. अटक ते कटक पसरलेले मराठी राज्य, तंजावरपासून धार, इंदूर, ग्वाल्हेरपर्यंत स्थिरावलेले मराठी सरदार, त्यांच्या घोड्यांच्या टापांनी दणाणलेला परिसर, शूरांच्या तळपत्या तलवारीचे तेज, पानिपतच्या वेदना, थेट मुगल बादशहाला मांडीवर बसवून मराठ्यांनी राखलेले दिल्लीचे तख्त, बिठूरच्या रूपाने संघर्षसमयी गंगेच्या खोऱ्याने दिलेला आश्रय आणि स्वातंत्र्यानंतर हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री, अशा अनेक प्रसंगांनी गेल्या चारशे वर्षांत मराठी भाषा व संस्कृती गंगा-यमुनेच्या खोऱ्यात पोहोचली, विस्तारली. तिने आसमंत सुगंधित केला. या देदीप्यमान इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी भाषेला व भाषिकांना आता नवे हिमालय खुणावत असतील. त्या स्वप्नांच्या, आव्हानांच्या व्याख्या व परिभाषा या संमेलनात रेखांकित व्हाव्यात, ती आव्हाने पेलण्याचे बळही मराठी मनगटांमध्ये यावे, ही अपेक्षा व सदिच्छाही!