भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’चे अरविंद केजरीवाल आता निघाले गुजरातच्या दिशेने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:48 IST2025-07-09T07:48:08+5:302025-07-09T07:48:44+5:30

दिल्ली, पंजाबनंतर गुजरात ही ‘आप’ची मोठी प्रयोगशाळा ठरू शकेल. आपण भाजप-काँग्रेस या दोघांनाही खिंडार पाडू शकतो, असे केजरीवालांना वाटते.

AAP's Arvind Kejriwal, as the main rival of BJP, is now heading towards Gujarat... | भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’चे अरविंद केजरीवाल आता निघाले गुजरातच्या दिशेने...

भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’चे अरविंद केजरीवाल आता निघाले गुजरातच्या दिशेने...

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर 
लोकमत, नवी दिल्ली

काही महिने गप्प राहून ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय पटलावर पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यावेळी त्यांचे लक्ष गुजरातकडे आहे. विसावदार पोटनिवडणुकीत गोपाल इटालिया निवडून आल्यामुळे उत्साहित झालेले केजरीवाल आता गुजरातला त्यांची दुसरी राजकीय राजधानी करू इच्छितात. भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’ला उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. 

काँग्रेसवर त्यांची जास्त भिस्त दिसते. एरवी जुना असलेला काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये २०१७ पासून सातत्याने घसरणीला लागला आहे. २०२२ साली काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७० वरून १७ वर आली. त्यानंतर पक्षाचे पाच आमदार फुटून भाजपत आले. इतकेच नव्हेतर, पक्षाचा गुजरातमधील प्रतीकात्मक चेहरा असलेले शक्तिसिंह गोहिल यांनी अलीकडच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्षपद सोडले.

सुरतमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘आप’ने २०२१ साली गुजरातच्या राजकारणात प्रवेश केला. आता या पक्षाला गुजरातमध्ये मोकळी जागा दिसते आहे. ‘विसावदार ही उपांत्य फेरी होती. २०२७ ची अंतिम फेरी आमची असेल,’ असे आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी म्हटले आहे. ‘संघटन सृजन अभियान’ नावाने  पक्षाला उभारी देण्याची राहुल गांधी यांची मोहीम फसली आहे. स्थानिक स्तरावरून केल्या गेलेल्या ४० टक्के शिफारशी पक्षश्रेष्ठींनी डावलल्याने गटबाजीला ऊत आला आहे. 

अर्थात आम आदमी पक्षाचा स्वतःचा प्रवासही सुरळीत नाही. हार्दिक पटेल यांच्याप्रमाणेच चळवळीचा एक प्रमुख चेहरा असलेल्या इटालिया यांच्यावर कायदेशीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत. हार्दिक पटेलही एकदा काँग्रेसमध्ये गेले होते याचे स्मरण करून दिले जाते. दोन वर्षांत ते भाजपकडे वळले. तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न गुजरातमध्ये यापूर्वी असफल झालेले आहेत. तरीही केजरीवाल मोठे काही घडेल अशा अपेक्षेत आहेत. आपली कारभाराची शैली आणि बाहेरचा नेता म्हणून असलेली प्रतिमा भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही खिंडार पाडील, असे त्यांना वाटते. गुजरातमध्ये आपली पाळेमुळे पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे राज्य कदाचित दिल्ली आणि पंजाबनंतर ‘आप’ची मोठी प्रयोगशाळा ठरू शकेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सात वर्षांनंतर पुन्हा विज्ञान भवनात
सात वर्षांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विज्ञान भवनात पुन्हा परतत आहे. चालू वर्षातच संघाच्या शताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून विज्ञान भवनात एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या प्रारंभी तीन दिवसांचा हा कार्यक्रम असेल. सरसंघचालक मोहन भागवत त्याची धुरा सांभाळतील. समाजाच्या वेगवेगळ्या आणि व्यापक स्तरापर्यंत पोहोचण्याचा संघाचा मानस असल्याचे यातून सूचित होते. देशातील राजकीय वातावरण बदलत असताना आपले वैचारिक वर्तूळ आणि शाखांच्या पलीकडे ज़ाण्याचा संघाचा प्रयत्न आहे. 

अशा प्रकारची व्याख्यानमाला २०१८ साली आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने जमलेल्या मुख्य प्रवाहातील लोकसमूहापुढे भागवत यांनी व्याख्याने दिली. ४० वर्षांनंतर असे घडले होते. दररोज साधारणतः १५०० लोक या व्याख्यानाला उपस्थित राहात असत.. त्यात उद्योगपती, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, न्यायाधीश तसेच निवृत्त नोकरशहांचा समावेश होता. पहिल्या दोन दिवशी भागवत यांचे एकट्याचेच भाषण झाले. तिसऱ्या दिवशी त्यांनी आधी मागवून घेतलेल्या  प्रश्नांना उत्तरे दिली. विषयाला धरून काळजीपूर्वक निवडलेले सुमारे २२० प्रश्न त्यांनी हाताळले. एरवी आपल्या एकूणच कार्यरचनेबाबत एकंदरीत अंतर्मुख असलेल्या संघासाठी खुलेपणा दाखविणारा हा एक अनोखा क्षण होता. तत्पूर्वी असा प्रसंग १९७४ साली आला होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत बोलले होते. अस्पृश्यता  हे पाप असल्याची सविस्तर मांडणी त्यांनी त्या व्याख्यानात केली होती. तो संघाच्या दृष्टीने सामाजिक संदर्भात लक्षणीय असा क्षण होता. 

आता यंदा दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत आपले विचार प्रक्षेपण अधिक सुस्पष्ट करून सांस्कृतिक आणि बौद्धिक ठसा व्यापक प्रमाणावर उमटविण्याचा संघाचा इरादा आहे; आणि हे सारे आयोजन ल्युटेन्स दिल्लीच्या हृदयस्थानी होणार आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राजकीय, वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रातील यापुढच्या लढ्यात संघ स्वतःला केवळ परावर्तीतच नव्हे, तर पुनर्स्थापित करू इच्छितो. 
    harish.gupta@lokmat.com

Web Title: AAP's Arvind Kejriwal, as the main rival of BJP, is now heading towards Gujarat...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.