- कुमार केतकर(ज्येष्ठ पत्रकार-संपादक, राज्यसभेचे माजी सदस्य)
३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. त्या घटनेला आज ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. गांधीजींची प्रत्यक्ष हत्या १९४८ साली झाली असली तरी, त्यापूर्वी गांधी हत्येचे एकूण पाच प्रयत्न झाले हाेते. त्यापैकी पहिला प्रयत्न पुणे शहरात २५ जून १९३४ रोजी झाला. तेव्हा देशाच्या फाळणीचा मुद्दा नव्हता आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यानंतर दोन प्रयत्न १९४४ साली झाले. त्यातला एक प्रयत्न गांधीजी मोहमद अली जिनांना भेटण्यासाठी जात असताना झाला. परंतु, विशेष म्हणजे ज्या जिनांमुळे फाळणी झाली त्यांना नव्हे, तर गांधीजींना मारण्याचा उद्देश होता!
मुद्दा हा की, गांधीहत्येमागची जी ‘कारणे’ सध्या प्रचलित प्रचारात आहेत, त्यातील कोणताही मुद्दा या प्रयत्नांच्या वेळी अस्तित्वात नव्हता; तरीही गांधीद्वेष काही संघटनांच्या मुख्य अजेंड्यावर होता. जर्मनीत बसून हिटलरचेही तेच मत होते की, गांधींना गोळ्या घालून त्यांची चळवळ संपवून टाकली पाहिजे.
वस्तुत: हिटलर कधीही भारतात आला नव्हता वा त्याच्या जर्मन राष्ट्रवादाच्या आड तेव्हा गांधीजी आलेले नव्हते. हिटलरने जेव्हा ते उद्गार (शूट गांधी) काढले ते वर्ष होते १९३७. युरोपवर युद्धाचे ढग होते. हिटलरने जवळपासच्या देशांवर आक्रमण करायची सर्व तयारी केली होती. तो युद्धप्रसंग येऊ नये म्हणून युरोपात प्रयत्न सुरू होते. त्याचा एक भाग म्हणून लॉर्ड आयर्विन हॅलिफॅक्स हे भारताचे एक व्हाइसरॉय ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून हिटलरशी वाटाघाटी करण्यासाठी जर्मनीला गेले. हिटलरबरोबर चर्चा चालू असताना भारताचा विषय निघाला. लॉर्ड आयर्विन म्हणाले की, सध्या (म्हणजे १९३० पासून) गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात स्वातंत्र्य चळवळीचे सामर्थ्य वाढते आहे, त्यामुळे इंग्रजांची त्यात व्यग्रतासुद्धा वाढते आहे. हिटलर लगेच उद्गारला, ‘गांधीजींचा प्रश्न अगदी सोपा आहे. या माणसाला गोळ्या घाला. फक्त एकट्या गांधींनाच नव्हे, तर सोबतच्या इतर नेतेमंडळींनाही गोळ्या घाला. तरीही आंदोलन आटोक्यात आले नाही तर आंदोलकांवरही गोळीबार करा..म्हणजे एकदाची संपून जाईल ही चळवळ!’- म्हणजेच गांधी हत्येचा विचार नाझींचाही होता.
गांधी हत्येनंतर ज्या मंडळींनी पेढे वाटले त्यांच्यापैकी काही तथाकथित विचारवंत मंडळी अलीकडे गांधींबद्दल ‘एकूणच पुनर्विचार’ करण्याची गरज आहे, असे प्रबंध मांडत आहेत. ‘पुनर्विचार’ म्हणजे ‘अहिंसा’ हे कसे अर्थशून्य तत्त्वज्ञान आहे, गरीब व उपेक्षितांबद्दल करुणा बाळगून त्यांना मदत करणे कसे व्यर्थ आहे इत्यादी. या विचारवंतांच्या मते ‘स्वावलंबन’चा अर्थ म्हणजे, जे गरीब आहेत त्यांनी श्रम करून पैसे मिळवावे आणि श्रीमंत व मध्यमवर्गीयांनी शेअर बाजारात वा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पैसे मिळवावे असा असतो! शिवाय, काम कुठून आणि कसे मिळणार व त्याचा आर्थिक मोबदला किती आणि कधी मिळणार याची पर्वा मध्यमवर्गाने व या सधन विचारवंतांनी का करायची? पंडित नेहरूंना या जगातून अंतर्धान पावून ६२ वर्षे होऊन गेली, तरी तेच सध्या या देशातील मुख्य खलनायक आहेत, आणि गांधींनी नेहरूंना वारस करून महाप्रचंड चूक केली, असा त्या महात्म्यावर गंभीर आरोप आहे. तरी तमाम जगातले राष्ट्रप्रमुख देशात आले की ते आवर्जून राजघाटावर जाऊन भारताच्या राष्ट्रपित्याला वंदन करतात. खरे म्हणजे आजही जगभरातील नेत्यांनाही आकर्षण आहे ते गांधीजींचेच. जगातील सुमारे १०० देशांमध्ये गांधीजींचे स्मारक आहे, हे तर खरेच. पण, गांधींनी आता त्या स्मारकातून आणि चौकाचौकांतल्या त्यांच्या पुतळ्यातून बाहेर येण्याची गरज/तातडीची निकड जगभरात दाटून येते आहे. सतत युद्ध, संघर्षाची खुमखुमी आणि टोकाच्या विद्वेषाचे जहर सर्वत्र पसरत चाललेले असताना जगभरातल्या भांबावलेल्या सर्वसामान्य माणसांना हवा असलेला दिलासा या महात्म्याच्या सावलीतच मिळू शकेल.
गांधीजी म्हणत त्यांचे आयुष्य १२५ वर्षांचे आहे. पण, काहींना त्यांच्या त्या विधानाची इतकी धास्ती की, गांधीजींना ८० वर्षे पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांची हत्या केली गेली; पण महात्मा अमरच आहे... ketkarkumar@gmail.com
Web Summary : Despite multiple assassination attempts before 1948, Gandhi's ideals endure. Even Hitler sought his demise. Today, amidst global strife, Gandhi's principles of non-violence and compassion offer solace, remaining profoundly relevant.
Web Summary : 1948 से पहले हत्या के कई प्रयासों के बावजूद, गांधी के आदर्श कायम हैं। हिटलर भी उनका अंत चाहता था। आज, वैश्विक संघर्ष के बीच, गांधी के अहिंसा और करुणा के सिद्धांत प्रासंगिक बने हुए हैं।