मेन लाइनवरून नळ कनेक्शन कोणाला विचारून दिले जातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:37 AM2021-04-07T04:37:00+5:302021-04-07T04:37:00+5:30
वेळ आली आहे. महापालिकेकडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून नळ कनेक्शन दिले जात आहे. हे नळ कनेक्शन्स काेणाच्या आशीर्वादाने ...
![Who are the tap connections from the main line? | मेन लाइनवरून नळ कनेक्शन कोणाला विचारून दिले जातात Who are the tap connections from the main line? | मेन लाइनवरून नळ कनेक्शन कोणाला विचारून दिले जातात](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/dhule-marathi-default-image_202012531030.jpg)
मेन लाइनवरून नळ कनेक्शन कोणाला विचारून दिले जातात
वेळ आली आहे. महापालिकेकडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून नळ कनेक्शन दिले जात आहे. हे नळ कनेक्शन्स काेणाच्या आशीर्वादाने दिले जात आहेत, असा सवाल करीत नळ कनेक्शन साेधून काढण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेवक अमोल मासुळे यांनी केली.
मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पाणी प्रश्नावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समिती सभापती संजय जाधव, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी सभापती संजय जाधव म्हणाले की, सद्य:स्थितीत काही भागांत तीन ते काही भागांत आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. पाण्याचा पुरेसा साठा असल्याने केवळ नियोजन करण्याची गरज आहे.
पाणी पुरवठ्याच्या समस्या हेतूपुरस्सर केल्या जातात.
सभेत नगरसेवक नागसेन बोरसे म्हणाले की, शहरातील काही भागांत पाणी पुरवठ्याच्या समस्या हेतू पुरस्सर केल्या जात आहे. सध्या मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या या विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानधन तत्त्वावर घेण्यात यावे. १३६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन टाकण्याचे व जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. त्या जाेडून नियोजन का केले नाही, असा प्रश्न नगरसेवक बोरसे यांनी केला.
यावेळी मासुळे म्हणाले की, शहरातील लिकेज काढण्यासाठी लाखांची निविदा काढली जाते. काम सुरू झाल्यानंतर किती काम झाले याचीदेखील माहिती सभागृहाला देण्यात यावी. मिल परिसरात अनेक अवैध नळ कनेक्शन्स सुरू आहेत. मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही. सर्रासपणे मुख्य जलवाहिनीला नळ कनेक्शन दिले जात आहे. अनेक भागांत नळांना तोट्याही नाहीत. त्यामुळे फिल्टर पाणी वाया जात आहे. शहरात अनेक हाॅस्पिटल्स, महाविद्यालये व हाॅटेलला मेन लाइनवरून कनेक्शन दिले जात असल्याचा आरोप मासुळे यांनी केला.
वाईटपणा घ्यावा लागेल
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आधी मेन लाइनला जोडण्यात आलेले नळ कनेक्शन सोधून काढण्याची गरज आहे. चितोड रोडवर देखील मेन लाइनवरून कनेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे पाणी वाया जातो. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे शीतल नवले यांनी सांगितले.