अमरावती प्रकल्पातून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:25+5:302021-05-21T04:38:25+5:30
आगामी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १५ मार्च रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात अमरावती ...

अमरावती प्रकल्पातून पाणी सोडले
आगामी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १५ मार्च रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी हे शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांसाठी आरक्षित करण्यात आले होते. तसा दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी टंचाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आज वरीलप्रमाणे पहिले आवर्तन सोडण्यात आले असल्याचे अमरावती मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पीयूष पाटील यांनी सांगितले.
हे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. कोणीही कोल्हापुरी बंधारे अथवा शेतात वळवू नये. यासाठी सिंचन विभागाने पथक तयार करून पाण्याची चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसेच पाणी चोरी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.
हे पाणी उजव्या कालव्यातून जाणार असल्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढून विहिरींचा जलस्रोतदेखील वाढणार आहे. यामुळे बागायती कापूस लागवडीसाठी संधी असल्याने अप्रत्यक्षपणे तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तर प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत कालव्यातील पाणी झिरपत असल्याने तेथील शेतकऱ्यांचा आगामी खरीप हंगाम मात्र लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी प्रकल्पातून पाणी सोडताना विखरणचे सरपंच महेंद्र पवार, खर्दे सरपंच सुरेश पवार, अमरावती मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पीयूष पाटील, विशाल अहिरराव, प्रकल्पाचे कर्मचारी मगन चौधरी, जगन पवार, भुरु गिरासेे आदींसह टंचाईग्रस्त गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.
पाणी वाया जाण्याची भीती
उजव्या कालव्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. कालवा नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची भीती मालपूरकरांनी व्यक्त केली आहे.
असा प्रयोग भरपावसाळ्यात ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यातून विखरण तलाव भरण्यासाठी केला गेला होता. मात्र, तेथे घोटभर पाणी पोहोचले नसल्याचे त्यावेळी दिसून आले..
यासाठी प्रथम कालव्याची दुरुस्ती महत्त्वाची असून एक्स्प्रेस कालवा झाला तरच पाणी विखरण तलावात पोहोचेल. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.