धुळे : तालुक्यातील अवधान गावात विकासकामांचा एक टप्पा ओलांडत असतानाच पाच लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे भूमिपूजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रवीण अग्रवाल, नगरसेविका सारिका अग्रवाल, सुरेखा देवरे व नगरसेवक राजू पवार, दगडू बागुल, भगवान देवरे, रानमळ्याचे सरपंच प्रवीण पवार यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गावाला लागूनच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग ओलांडून ग्रामस्थांना नळाचे पाणी घेण्यासाठी जावे लागत होते. यात अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता अवधान गावासाठी पिण्याच्या पाण्याची दहा इंची लोखंडी पाइपलाइन व संपूर्ण गावाला पिण्याचे पाणी घरोघर नळाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता करण्यात आली असून, याच टाकीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. अवधान गावातील पाच पिण्याच्या नळजवळील टाकीशेजारी ही नवीन टाकी येणार होती. मात्र, जुन्या टाकीजवळील ओपन जागा ही नवीन टाकीसाठी कमी पडत असल्याकारणाने सदर नवी टाकी ही निंबा आण्णा यांच्या विहिरीजवळच्या ओपन स्पेसमध्ये आबा सुकलाल पाटील यांच्या घरासमोरील ओपन स्पेस येथे वर्ग करण्यात आली. हा भाग संपूर्ण गावातील उंच असल्याने आणि टाकीची उंची सुद्धा ५० फूट उंच असल्याने गावातील संपूर्ण कानाकोपऱ्यात पाणी घरोघरी पोहचू शकणार आहे़