धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० मिनिटे झालेल्या दमदार पावसामुळे गहू, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शुक्रवारपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अगोदरच ‘अलर्ट’ केल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घेण्यावर भर दिला होता. असे असतानाही अवकाळीचा तडाखा बसलाच.
पिंपळनेरला गारपीट
साक्री तालुक्यातील मालनगाव, खबरी, सातारपाडा तसेच बल्हाणे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजता अचानक झालेल्या जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांवरच कांदा पीक पूर्ण क्षमतेने होणार होते पण त्यापूर्वीच अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे, एका शेतकऱ्यांच्या शेतात गारांचा खच दिसत होता, तर काढणीवर आलेला गहू या अवकाळी पाऊस व गारपिटीने संपूर्ण खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास शेवटी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी संकट व निराशा घेऊनच आल्याचे शेतकरी सांगत आहे. बलाने येथे जोरदार गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस यांनी प्रशासनाकडे केली आहे तर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी केली आहे.
धुळ्यात मुसळधार पाऊस
धुळे शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाला सुरूवात झाली. अवघ्या २० मिनिटाच्या पावसात सर्व शहर ओलेचिंब झालेले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने, बााजरपेठेतील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडालेली होती. नागरिकांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुकानाचा आडोसा घेतला होता.
वडजाई
वडजाई तिखी परिसरात जोरदार वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, त्यात शेतात गहू काढत असताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली अचानक आलेल्या पावसामुळे गहू ओला होऊ नये म्हणून झाकावे लागले .
याशिवाय नेर, कुसुंबा, न्याहळोद या परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता.