तापमानाचा पारा वाढल्याने महानगरातील रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:36 AM2021-04-07T04:36:58+5:302021-04-07T04:36:58+5:30
गेल्या १५ दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत कमी-अधिक प्रमाण होत असताना, त्यात वाढ होताना दिसत आहे. त्यात पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून ...
गेल्या १५ दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत कमी-अधिक प्रमाण होत असताना, त्यात वाढ होताना दिसत आहे. त्यात पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. रविवारी तापमानाचा ३९ पारा होता, तो मंगळवारी ४१ अंशांपर्यंत पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी लिंबू-सरबतला मागणी असल्याने बाजारात लिंबू विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
शीतपेयांना मागणी
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील चौका-चौकांत शीतपेय विक्रेते दाखल झाले आहेत. उन्हापासून संरक्षण मिळावे, शरीराला थंडावा मिळावा, यासाठी शीतपेयांना मागणी वाढली आहे.
टोपी-रुमालला मागणी
उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे. घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे. बहुतांश जणांकडे बागायती मोठ्या आकाराचे रुमाल दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे.
सायंकाळी वाढली गर्दी
सकाळपासून जाणवणाऱ्या उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना, सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे. शहरात सर्वदूर हेच चित्र पाहावयास मिळत आहे.