कृषी सेवा केंद्रासह उत्पादन व वाहतुकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:21+5:302021-05-09T04:37:21+5:30
धुळे : कृषी सेवा केंद्र व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत, तसेच ...
धुळे : कृषी सेवा केंद्र व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, ई-कॉमर्स (ऑनलाइन विक्री) पद्धतीने कमीतकमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून देण्याकरिता परवानगी देण्यात येत आहे. मात्र, शेतीशी संबंधित वस्तू, उत्पादनाव्यतिरिक्त इतर वस्तू व उत्पादने सदर केंद्रात ठेवण्यास व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. पर्जन्यमानास सुरुवात झाल्यानंतर कृषी निविष्ठा केंद्रावर खरेदीसाठी गर्दी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडी ठेवल्यास दुकानांवर गर्दी होऊन कोविड १९चा प्रसार वाढण्याची भीती व इतरही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्र चालू ठेवण्याबाबत व त्यांच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप ई- कॉमर्स (ऑनलाइन विक्री) पद्धतीने कमीतकमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, या दृष्टीने आदेश निर्गमित करावेत, असे कृषी आयुक्तांनी कळविले आहे. त्यानुसार, वरील आदेश देण्यात आले आहेत.
शासनाकडील २९ एप्रिलच्या आदेशान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी त्यावर उपाय करण्यासाठी शासनाच्या ‘ब्रेक द चेन’बाबत लागू करण्यात आलेले अतिरिक्त स्पष्टीकरणासह सर्व निर्बंध १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोविड १९) उपाययोजना नियम २०२०च्या नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ आणि साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाईस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे.