धुळे : कोरोना आणि लाॅकडाऊनच्या बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणाऱ्या उद्योजकांना उभारी देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी लघु उद्योग भारती संघटनेने ऑनलाइन व्याखानाचे आयोजन केले होते.
गेल्या वर्षभरापासून विशेषत: दुसऱ्या लाटेच्या गंभीर परिणामांमुळे औद्योगिक वसाहतीतील निकटवर्तीय उद्योजक मित्रांना काळाने हिरावून घेतले. यामुळे नीटनेटका चालणारा उद्योग अचानक अडचणीत सापडतो. त्याचप्रमाणे अनेक उद्योजकांना कोविड व आवश्यक असले तरीही लॉकडाऊनच्या गंभीर परिणामांमुळे आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत उद्योजकांना धीर देण्यासाठी शहरातील गुंतवणूक व कर सल्लागार श्रीराम देशपांडे यांचे ‘घाबरू नका कोरोनाला, सांभाळा आपल्या धंद्याला’ या विषयावर शनिवारी रात्री ऑनलाइन व्याख्यान झाले. लघु उद्योग भारती संघटनेने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्यवहारातील कॅश फ्लोचे नियोजन व कॅश क्रंचला सामोरे जाऊ नये यासाठी घ्यावयाच्या खबरदारीचे विशेष मार्गदर्शनपर करण्यात आले. वैयक्तिक, कौटुंबिक अर्थनियोजनासह व्यापार, उद्योग व व्यवसायातील अर्थनियोजनाचे महत्त्व काय? ते कशा पद्धतीने करावे? कॅशफ्लो मॅनेजमेंट, किमान इन्शुरन्स किती कसावा? गुंतवणुकीचे विविध पर्याय, सुरू असलेल्या कर्जाचे पुनर्नियोजन तसेच या परिस्थितीत नवीन कर्ज घेताना घ्यावयाची काळजी याबाबतीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन, काही ठोकताळे व काही सोप्या सूत्रांसह दृक-श्राव्य माध्यमांद्वारे सोप्या शब्दांत केले.
तसेच यावेळी अनेक उद्योजकांना भेडसावणाऱ्या आर्थिक नियोजनविषयक प्रश्नांची उकल प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यात आली. उद्योजकांनी आपल्या उद्योग व्यवसायाशी संबंधित आवश्यक गोष्टी, देण्या-घेण्यासंबंधीचे टिपण, बँक व इतर गुंतवणुकीविषयीची माहिती आपल्या व्यवसायातील भागीदारास अगर आपल्या जोडीदाराला कळवून ठेवावीत. तसेच बँक खात्याला जॉइंट करावे, खात्याला नॉमिनी लावणे आणि इतर आवश्यक बाबींवर देखील मार्गदर्शन केले.
यावेळी धुळे, मालेगाव, नाशिकचे लघु उद्योग भारतीचे सदस्य तसेच अवधान औद्योगिक वसाहतीतील इतर अनेक उद्योजक, व्यावसायिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लघु उद्योग भारतीच्या वित्त व बँकिंग विभागाचे संचालक सीए रवी पटेल, अध्यक्ष राहुल कुलकर्णी, सचिव वर्धमान सिंगवी, बापू बडगुजर, कपिल सराफ, भूषण अमृते यासह इतर संचालक सदस्यांनी प्रयत्न केले. कोविड काळात उद्योजकांसाठी उपयुक्त व्याख्यानाचे आयोजन केल्यामुळे लघु उद्योग भारतीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
उद्योजकांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या लघु उद्योग भारती या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेच्या धुळे शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. उद्योजकांच्या विविध अडी-अडचणी, समस्यांचे समाधान करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न असोत किंवा धोरणात्मक बाबींसाठीचा पाठपुरावा असो, लघु उद्योग भारती नेहमीच उद्योजकांच्या पाठीशी असते.