कोरोना रोखण्यासाठी लसीकरणच हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:27+5:302021-05-19T04:33:27+5:30
कळंब : कोरोना रोखण्यासाठी धडक व व्यापक लसीकरण कार्यक्रम राबविणे गरजेचे आह, असे मत मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष ...

कोरोना रोखण्यासाठी लसीकरणच हवे
कळंब : कोरोना रोखण्यासाठी धडक व व्यापक लसीकरण कार्यक्रम राबविणे गरजेचे आह, असे मत मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
मराठवाड्यातील विविध स्वयंसेवी संस्थाचे संघटन असलेल्या मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांनी ग्रामीण भाग, तेथील कोरोना, लसीकरण याची सद्यस्थिती व यामध्ये तातडीने कराव्या लागणाऱ्या सुधारणा याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्रव्यवहार केला आहे.
यात ग्रामीण भागात कोरोनाची संख्या वाढत आहे. यात गंभीर रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. बेड, इंजेक्शन्स, ऑक्सिजन असे अनेक प्रश्न असतानाच कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. यामुळे उद्योग, रोजगार, व्यवसाय ठप्प आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.
यामुळे यावर केवळ लसीकरणाचीच मात्रा कामी येणार असल्याचे म्हटले आहे. शासनाने सर्व शक्ती पणाला लावत लसीकरणाची व्याप्ती वाढवल्यास आपोआप कोरोना थांबेल, ठप्प झालेले सर्व काही मार्गी लागेल. समाजभान असलेल्या अनेक लोकांचे हात विलगीकरण कक्षासाठी पुढे आले आहेत. आता ही ताकद लसीकरणाकडे वळवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना खासगी ठिकाणी लस घेण्याची अनुमती देत आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला लागेल ती किंमत अदा करून शासनाने लस उपलब्ध करून द्यावी. या कामात खासगी संस्थांचीदेखील मदत घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चौकट...
सर्व काही स्वतःच्या ताब्यातच का ?
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांनी सरकार लसीकरणाच्या संदर्भात सर्वकाही स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न का करत आहे? असा सवाल करत यामुळे ताण, अनियमितता व गोंधळ वाढत असल्याचे नमूद केले आहे. लस देण्याची जबाबदारी शासनाचीच आहे? परंतु, यात विकेंद्रीकरण हवे. इतरांची मदत घ्यावी. आधीच आरोग्य यंत्रणेवर ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट याचा मोठा ताण आहे. याचाही विचार करावा, असे तोडकर यांनी उल्लेखित केले आहे.