महाविकास आघाडी सरकारमुळे जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:24+5:302021-08-01T04:30:24+5:30
कळंब : उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमुळे जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व वर्षानुवर्षे ...

महाविकास आघाडी सरकारमुळे जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी
कळंब : उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमुळे जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व वर्षानुवर्षे फक्त चर्चेत असलेले मराठवाडा कृष्णा प्रकल्पाचे पाणी प्रत्यक्षात आपल्या भागात येत आहे. जून २०२३ पर्यंत हे पाणी आपल्या तालुक्यातही येणार असून, यामुळे या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र आता ओलिताखाली येईल, अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.
तालुक्यातील तीन गावात जवळपास दीड कोटीहून अधिकच्या निधीतून विकास कामे करण्यात येत आहेत. याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये रांजणी गावात स्थानिक आमदार विकास निधीतून सुमारे १५ लाख रुपयातून बांधण्यात येणाऱ्या रांजणी-लासरा रस्त्यावरील पूल, २५:१५ योजनेतून आणि जनसुविधा योजनेतून तयार करण्यात येणारा सिमेंट रस्ता, पाझर तलाव अशा एकूण २७ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. याशिवाय लासरा येथे जलजीवन मिशन अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प आणि २५:१५ मधून मंजूर झालेल्या कामाचे, जनसुविधा, तांडा वस्ती सुधारणा या योजनेतून सिमेंट काँक्रीट रस्ता अशा एकूण १४ लाख रुपयांच्या कामांनाही प्रारंभ यावेळी करण्यात आला. वाकडी (इ) येथे ३०-५४ योजनेतून मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपये तर २५:१५ चा निधी,जनसुविधा, तांडा वस्ती या योजनेतून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अशा सुमारे एक कोटी १२ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आमदार पाटील याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं. स. सभापती संगिताताई वाघे, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, जि. प. सदस्य बालाजी जाधवर, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख बापू जोगदंड, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, युवा तालुका प्रमुख मनोहर धोंगडे, पं. स. सदस्य राजेश्वर पाटील, अजय समुद्रे, मीराताई बनसोडे, गोविंद वाघे, सुग्रीव पाडे, नवनाथ मदने, अशोक साळुंखे, राजाभाऊ आगरकर, अनिल साळुंखे, बाबा शिंदे, विजय धायगुडे, अन्सार शेख, लक्ष्मण शेळके आदींची उपस्थिती होती.