धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी (दि. २५) शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीस विरोध केला. यावेळी पोलिसांसोबत झटापट झाली. या प्रकरणानंतर लागलीच गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यालयात अधिकाऱ्यांसमोर शेट्टी यांनी शक्तिपीठबाबत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मवाळ भूमिका घेत महामार्गाची मोजणी तूर्त थांबवल्याचे स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली, असून जमीन मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी पथक पाहणीसाठी गेले होते, शेतकऱ्यांनी परतवून लावले होते. बुधवारी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह एक पथक वाणेवाडी शिवारात मोजणीसाठी गेले. तेव्हा शेतकरी व पोलिसांत झटापट झाली. यानंतर पथक मोजणीविना माघारी फिरले. दरम्यान, गुरुवारी सकाळी राजू शेट्टी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. बैठकीमुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नसल्याने अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासमवेत शेट्टी यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या व्यथा सांगून जमीन मोजणी रद्द करण्याची मागणी केली. यावर ज्योती पाटील यांनी तूर्त मोजणी प्रक्रिया थांबवली असल्याचे स्पष्ट केले.
समुद्रात महामार्ग बांधा : राजू शेट्टीशेतकऱ्यांनी मेहनतीने जमिनी कसून त्या बागायती केल्या. चांगल्या जमिनी महामार्गात जाणार असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील. दर जाहीर न करता केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. तुम्हाला महामार्ग करायचाच असेल, तर तिकडे समुद्रात बांधा, असा सल्ला शेट्टी यांनी सरकारला दिला.
लोणीकर चावडीवर या, हिशेब सांगतोआ. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना शेट्टी म्हणाले, यांना सत्तेचा माज चढला आहे. शेतकऱ्यांना दिलेले ६ हजार तुम्ही काढणार असाल, तर मी हिशेब घेऊन चावडीवर येतो. या चर्चा करूया. केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन दर कमी होऊन शेतकऱ्यांना एका वर्षात ३५ ते ४० हजार कोटींचा फटका बसला. ४०० रुपयांचे डीएपी खत २ हजाराला केले. सगळाच हिशेब सांगतो, तुम्ही याच, असे शेट्टी म्हणाले.