धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 20:41 IST2026-04-03T20:40:47+5:302026-04-03T20:41:38+5:30
वाहने अडकल्याने लोकांना १०-१५ किमी चालत जावे लागले. ७ तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे लोकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
धाराशिव - जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. या यात्रेमुळे धुळे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जवळपास ७ तासांहून अधिक काळ वाहने खोळंबली आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत असून लोकांची गैरसोय झाल्याचे दिसून येते. दुपारपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्याचा फटका वाहनचालकांना बसला आहे.
वाहतूक कोंडीत अनेक भाविक अडकले त्यामुळे काहींनी पायपीट करत प्रवास सुरू केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी लोक येरमाळा येथे दाखल झालेत. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. वाहने अडकल्याने लोकांना १०-१५ किमी चालत जावे लागले. या वाहतुक कोंडीत भाजपा आमदार राणा पाटीलही ४-५ तास अडकून राहिले होते. ७ तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे लोकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची जत्रा चैत्र पोर्णिमेनिमित्त २ आणि ३ एप्रिलला भरवली होती. या यात्रेमुळे देवीच्या दर्शनासाठी भाविक येरमाळा येथे दाखल झाले. मात्र या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. अलोट गर्दीमुळे छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद आणि सोलापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. ही वाहतूक कोंडी कधी सुटणार असा इथले संतप्त नागरिक प्रश्न विचारत होते.