माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:15+5:302021-08-23T04:34:15+5:30
या वर्षी निकाल दहावी, अकरावीचे वार्षिक परीक्षेतील गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला. परिणामी यंदा ...

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
या वर्षी निकाल दहावी, अकरावीचे वार्षिक परीक्षेतील गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला. परिणामी यंदा बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन अशी कोणतीही प्रक्रिया होणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन या सुविधा यंदा उपलब्ध नाहीत.
दहावीचे विद्यार्थी - ३८२८
पास झालेले विद्यार्थी-३८२७
बारावीचे विद्यार्थी - ३१७८
पास झालेले विद्यार्थी -३१७७
--------------------------------------------
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही...
अंतर्गत मूल्यमापन झाल्याने परीक्षेचा संबंध नाही. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनालाही वाव नाही.
यामुळे दाद कशी आणि कुठे मागणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना हा पेच पडत आहे.
यंदा बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, -पुनर्मूल्यांकन अशी कोणतीही प्रक्रिया होणार नाही. - गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत या सुविधा यंदा उपलब्ध नसतील
विद्यार्थी म्हणतात...
विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा न घेतल्या गेल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. विचित्र गुणदान पद्धतीमुळे निकाल असमाधानकारक आहे. या पद्धतीने आमचा अभ्यासाचा उत्साहच मावळून गेला आहे.
- गीतांजली सुरवसे, उमरगा
दहावी मध्ये खूप अभ्यास केला पण फायदा झाला नाही. कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. नववीच्या गुणावर आणि दहावीच्या चाचणी परीक्षा व तोंडी परीक्षेवर दहावीचा निकाल लागला. वर्गात सतत पहिला असून, खूप अभ्यास करूनही टक्केवारी मात्र इतर विद्यार्थ्यांना जास्त मिळाली. त्यात शासनाने सीईटी घेऊन अकरावीचा प्रवेश होणार म्हटल्यानंतर काही प्रमाणात समाधान वाटले होते. पण कोर्टाने याही आशेवर पाणी फेरले.
- आकाश भुसार, उमरगा
पालक म्हणतात...
शिक्षण विभागासमोर ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध असताना देखील परीक्षा घेतली गेली नाही. हे खुप दुर्दैवी आहे. या परीक्षेच्या निकालावर पालक म्हणून पाहताना आम्हाला त्यांच्या पुढील सीईटी, नीटसारख्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या तयारीचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे नेमकी अभ्यासाची दिशा ठरवता येत नाही. एमएससीआयटीच्या धर्तीवर कोविडचे पूर्ण नियम पाळून, पुरेशी खबरदारी घेऊन परीक्षा घेता आली असती.
- शिवाजी सुरवसे ,पालक उमरगा
मुलीला डॉक्टर करायचे स्वप्न आहे. परंतु, चांगल्या कॉलेजला नंबर लागेल की नाही सांगता येत नाही. पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, एनएमएमएस व इतर सर्व परीक्षेत सतत प्रथम क्रमांक मिळवूनही दहावी मध्ये माझ्या मुलीला ९८ टक्के गुण पडले. खरंतर शासनाने सीइटी घेऊन अकरावी प्रवेश केला असता तर माझ्या मुलीला सहज प्रवेश मिळाला असता. परंतु, सध्या काहीच सूचत नाही.
- उदय बिराजदार पालक,उमरगा
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला जास्त गुण कसे?
-अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बोर्डाने ठरवून दिली होती. वास्तविक नववीचा विद्यार्थी दहावीत चांगला अभ्यास करतो. त्यामुळे तो दहावीच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो.
- शिक्षण विभाग, बोर्ड यांनी वारंवार सूचना देऊन, पडताळणी करून शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन करून घेतले. त्यामुळे त्यात पारदर्शकता आहे.