लोकसभेला पराभव, जि.प. निवडणुकीतूनही घेणार होत्या माघार; अर्चना पाटलांनी अखेर उधळला गुलाल, सक्षणा सलगरांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:12 IST2026-02-09T16:08:38+5:302026-02-09T16:12:21+5:30
Archana Patil ZP Election: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या अर्चना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत त्या भाजपाकडून मैदानात उतरल्या होत्या. त्यांच्या उमेदवारीवरून प्रचंड वादही झाला होता.

लोकसभेला पराभव, जि.प. निवडणुकीतूनही घेणार होत्या माघार; अर्चना पाटलांनी अखेर उधळला गुलाल, सक्षणा सलगरांचा पराभव
लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात मैदानात उतरल्यामुळे चर्चेत आलेल्या अर्चना पाटील यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाला आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असलेल्या अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या तेर गटातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सक्षणा सलगर या निवडणूक लढवत होत्या. त्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे.
अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र भाजपाकडून त्या मैदानात उतरल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर घराणेशाहीचा आरोप झाला. हा मुद्दा सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर खूपच चर्चेला आला होता. त्यामुळे त्यांनी माघार घेण्याची तयारी दाखवली होती. पण पक्षाने अखेरच्या क्षणी त्यांचा अर्ज कायम ठेवला होता.
सक्षणा सलगर यांचा मोठ्या फरकाने पराभव
तेर जिल्हा परिषद गटातून जिंकलेल्या अर्चना पाटील यांनी सक्षणा सलगर यांचा मोठे मताधिक्य घेत पराभव केला आहे. अर्चना पाटील यांनी २ हजार २३८ इतक्या मताधिक्याने विजय मिळवला. अर्चना पाटील या जिंकल्यामुळे त्यांचे नाव आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीही चर्चेत आले आहे.
पराभव झाल्यानंतर सलगर यांची ठाकरेंच्या खासदारावर टीका
जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवार सक्षणा सलगर यांनी उद्धवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली.
"निवडणुका सुरू होत्या, तेव्हा मी सांगितलं होतं की, जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गावकीपेक्षा भावकीवर जास्त लक्ष आहे. मी महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला पुन्हा सांगते ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या भावजयीला निवडून आणण्याचा प्लॅन यशस्वी केला आहे", असा आरोप करत सलगर यांनी पराभवाचे खापर खासदार निंबाळकर यांच्यावर फोडले.
'ओमराजेंनी जाणीवपूर्वक आघाडी केली नाही'
"अर्चना पाटील निवडून येतील, यासाठी प्लॅन निंबाळकरांनी प्लॅन आखला होता, त्यांचा प्लॅन यशस्वी झाला आहे. मी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे अभिनंदन करते. जिल्ह्याला आणि राज्याला कळू द्या की दोन्ही भाऊ एक आहेत. त्यांना जिल्ह्यात दुसरे कोणी नकोय. येडशी गटात आघाडी होते. सिद्धेश्वर वडगावमध्ये महाविकास आघाडी होते. जाणीवपूर्वक ओमराजे निंबाळकर यांनी तेरामध्ये आघाडी केली नाही. अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी निंबाळकर यांनी मदत केली", गंभीर आरोप सलगर यांनी केला आहे.