वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:19+5:302021-08-26T04:34:19+5:30
गुणवंत जाधवर उमरगा : प्रत्येक वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य आहे. मात्र, वीज बिल चुकविण्यासाठी काही ...

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार !
गुणवंत जाधवर
उमरगा : प्रत्येक वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य आहे. मात्र, वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून विद्युत ‘महावितरण’ची फसवणूक करतात. वीज चोरी उघड झाल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी स्वरुपाची कारवाई होऊन प्रसंगी तुरुंगाची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते तसेच संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो.
मुंबईवगळता ‘महावितरण’कडून राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जातात. मीटर रीडिंगनुसार वीज बिलांची आकारणी केली जाते. वीजबिल चुकविण्यासाठी काही ग्राहक चक्क मीटरमध्येच फेरफार करतात. वीज चोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत अधिनियम २००३ कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे याच्या गंभीर परिणामाला ग्राहकाला तोंड द्यावे लागते.
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
वर्ष कारवाया
२०१९ - ३७
२०२० - २१
२०२१ - ०१
मीटर जप्ती व मोठा दंड
कायद्याने वीज चोरी करणे गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीज चोरी पकडली गेल्यास त्याला चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो.
हा पर्याय स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाऊ शकतो. तथापी, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर मीटर जप्त करून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते.
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
‘महावितरण’तर्फे विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
हे पथक सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीज चाेरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कोणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके तत्काळ तेथे जातात.
पथकातील अधिकारी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची कधीही तपासणी करू शकतात.
कोट.........
विद्युत ग्राहकांनी वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार मीटरमध्ये फेरफार केल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या मुंबई वरिष्ठ कार्यालयात आपोआप समजते. तेथून तत्काळ ही माहिती उपविभागीय कार्यालयापर्यंत येते. अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. यामुळे ग्राहकांनी वीज चोरी करू नये.
- आर. एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय उमरगा