हितेंन नाईक
पालघर - गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारातपालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे(वय 32 वर्ष) हा तरुण जागीच ठार झाला असून बोटीचा तांडेल(कॅप्टन)जखमी झाल्याची घटना घडली आहे. श्रीधर हा मागील तीन महिन्यापासून गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई ह्यांच्या जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता.त्यांची बोट मासेमारी करता करता ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्स मधून आलेल्या सैनिकांनी भारतीय मच्छीमारावर बेछूट गोळीबार केला.ह्या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर ह्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून बोटीच्या तांडेल ह्याला एक गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बोट मालक जयंतीभाई ह्यांनी आपणास सांगितल्याचे वडराई मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन माणेंद्र आरेकर ह्यांनी लोकमत ला सांगितले.श्रीधर ह्याच्यावर शवविच्छेदन करण्यासाठी त्याचे शव रुग्णालयात नेण्यात आल्याचेही बोट मालकांनी सांगितले.