पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:35 IST2025-07-29T17:35:00+5:302025-07-29T17:35:27+5:30
पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर ती केरळला पळून गेली. मात्र, चन्नगिरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे.

पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरीतून एक धक्कादायक खुनाचं प्रकरण समोर आलं आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर ती केरळला पळून गेली. मात्र, चन्नगिरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे. यासोबतच, पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या एका मित्रालाही अटक केली आहे. मृत पतीची ओळख चन्नगिरी तालुक्यातील अन्नापुरा गावातील रहिवासी निंगप्पा म्हणून झाली आहे.
आरोपी पत्नीचं नाव लक्ष्मी आहे, तर तिच्या प्रियकराचं नाव तिपेश नाईक आहे. या प्रकरणात तिसरा आरोपी संतोष आहे. दावणगेरे जिल्ह्यातील होन्नाली तालुक्यातील त्यागदकट्टे येथील लक्ष्मी आणि निंगप्पा यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. लग्नानंतर आठ वर्षांनीही या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. मूलबाळ होण्यासाठी लक्ष्मीने मंदिरं आणि रुग्णालयं अशी एकही जागा सोडली नव्हती.
पतीच्या मित्रासोबत अवैध संबंध!
शेवटी, एक दिवस तिला कळलं की निंगप्पामध्ये पिता बनण्याची क्षमता नाही. निंगप्पा सुपारीचा व्यवसाय करत होता. तिपेश नाईक आणि संतोष हे त्याचे मित्र होते आणि ते दोघे त्याच्याकडे मजुरीचं काम करत असत. याच काळात तिपेश नाईकची भेट लक्ष्मीशी झाली. त्यानंतर दोघांची ओळख झाली. हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. इतकंच नाही, तर त्यानंतर दोघांनी अवैध संबंध ठेवले. याचा परिणाम म्हणून लक्ष्मी गर्भवती झाली.
निंगप्पाला माहित होतं की तो बाप बनू शकत नाही, त्यामुळे त्याला आपल्या पत्नीवर संशय आला. त्याने तिला रुग्णालयात नेऊन गर्भपात करून घेतला. पतीच्या या वागणुकीमुळे लक्ष्मी नाराज झाली आणि तिने पती निंगप्पाच्या हत्येचा कट रचला. यानंतर, १८ जानेवारी २०२४ रोजी लक्ष्मी आपल्या प्रियकर तिपेश नाईकसोबत पती निंगप्पाला पार्टी देण्याच्या बहाण्याने चन्नगिरी तालुक्यातील नल्लूर गावात घेऊन गेली.
प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या कशी केली?
लक्ष्मी आणि तिपेशने निंगप्पाला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत धुंद असलेल्या निंगप्पाला भद्रा कालव्यात फेकून दिलं. नंतर, लक्ष्मीने चन्नगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिचा पती निंगप्पा घसरून भद्रा कालव्यात पडला. पोलिसांनी भद्रा कालव्यात खूप शोध घेऊनही निंगप्पा सापडला नाही. इकडे, लक्ष्मी आपल्या मूळ गावी परतली.
दरम्यान, तिपेश नाईक कामाच्या निमित्ताने केरळला गेला आणि तो तिथेच स्थायिक झाला. नंतर, तिपेशने आपली प्रेयसी लक्ष्मीलाही केरळला नेलं. लक्ष्मीने आपल्या कुटुंबातील कोणालाही न सांगता केरळ गाठलं. त्यानंतर लक्ष्मीच्या कुटुंबीयांनी चन्नगिरी पोलीस ठाण्यात लक्ष्मी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. लक्ष्मीच्या वागणुकीवर संशय आल्याने पोलिसांनी तिपेश नाईकचा मित्र संतोषला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली.
मित्राने सत्य सांगून टाकले!
संतोषने कबूल केलं की लक्ष्मी आणि तिपेश नाईक यांच्यात अवैध संबंध होते. जेव्हा लक्ष्मी गर्भवती झाली, तेव्हा निंगप्पाने तिचा गर्भपात करवला. यामुळे संतापलेल्या लक्ष्मीने आपल्या प्रियकर तिपेशसोबत मिळून पती निंगप्पाची हत्या केली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले.