"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:14 IST2025-06-09T18:13:10+5:302025-06-09T18:14:16+5:30
Sonam And Raja Raghuvanshi Case: सोनम अटकेपूर्वी गाजीपूर येथे ढाब्यावर पोहचली. तिथे तिने ढाबा चालकाला संपूर्ण कहाणी सांगत फोन करण्यासाठी त्याचा फोन मागितला होता.

"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणाऱ्या राजा रघुवंशीचा मृतदेह शिलांगला सापडल्यापासून पोलीस त्याची पत्नी सोनमचा शोध घेत होती. मध्य प्रदेश आणि मेघालय पोलीस या जोडप्याच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण सोडवत होते. अखेर या प्रकरणातील बेपत्ता सोनमला शोध लागला. सोनमने त्याच्या प्रियकरासोबत मिळून राजाची हत्या केली असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे तर दुसरीकडे सोनमने यूपीच्या गाजीपूर येथे ढाबा चालवणाऱ्याला जी कहाणी सांगितली ती अगदी उलट आहे.
पोलिसांच्या थेअरीनुसार, सोनम रघुवंशीचे राज कुशवाह नावाच्या युवकाची प्रेम प्रकरण होते. त्यात सोनमने राजसोबत मिळून राजाच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याची हत्या केली. परंतु या प्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे कारण सोनमच्या अटकेआधी तिने ढाबा चालवणाऱ्याला तिची कहाणी सांगितली होती. सोनम अटकेपूर्वी गाजीपूर येथे ढाब्यावर पोहचली. तिथे तिने ढाबा चालकाला संपूर्ण कहाणी सांगत फोन करण्यासाठी त्याचा फोन मागितला होता.
सोनमनं ढाबाचालकाचा फोन घेऊन तिच्या भावाला फोन केला होता आणि त्यानंतर तिने कथितपणे सरेंडर केले. पोलिसांनी सध्या सोनमला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. गाजीपूर येथे ढाबा चालवणारा साहिल यादव म्हणाला की, सोनम जेव्हा इथं पोहचली तेव्हा ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. रडून रडून ती तिची कहाणी सांगत होती. शिलांगमध्ये तिच्यासोबत चोरीची घटना घडली असं सोनम म्हणाली. त्यानंतर तिच्या डोळ्यादेखतच पतीची हत्या करण्यात आली.
फॅमिलीकडे मागितली मदत
जेव्हा सोनम पळत पळत ढाब्यावर आली तेव्हा काही लोक ढाब्यावर जेवत होते. त्यात एक महिलाही होती. सोनमला पळताना पाहून ती तिच्याकडे गेली आणि मदतीसाठी विचारणा केली. सोनमने तिच्याकडूनही मोबाईल मागितला होता. जेव्हा महिलेने मोबाईल देण्यास नकार दिला तेव्हा सोनमने माझ्याकडे मोबाईल मागितला. सोनमला मोबाईल दिल्यानंतर तिने कॉल लावला असं साहिल यादवने सांगितले. सोनमने जेव्हा कॉल लावला तेव्हा ती मोबाईलवर धाय मोकलून रडत होती. हॅलो, भैय्या असं ती म्हणाली. साहिलने सोनमच्या भावाला ढाब्याचा पत्ता दिला आणि त्याने लवकरच पोहचतो असं सांगितले. सोनमची अवस्था पाहून साहिलने तिला काय घडले हे विचारले.
ढाबाचालकाने तिला विचारणा केली तेव्हा सोनम म्हणाली, माझे मे महिन्यात लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवसांत मी पतीसोबत मेघालयात फिरायला आली होती. तिथे काही जणांनी माझे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पतीची क्रूर हत्या केली. हत्येवेळी सोनम बेशुद्ध पडली. या गुन्हेगारांनी सोनमला उचलून नेले आणि कित्येक दिवस एकाच खोलीत बंद ठेवले. अपहरणानंतर सोनमला आरोपींनी गाजीपूरला आणले आणि तिथे सोडून दिले. सोनम रात्री १ वाजता ढाब्यावर पोहचली, त्यानंतर ३ वाजता पोलिसांनी सोनमला त्यांच्यासोबत नेले असं ढाबाचालक साहिलने सांगितले.