बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:31 IST2025-06-03T20:30:48+5:302025-06-03T20:31:47+5:30

सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली. ज्यात मृत मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे बंगळुरूपासून २४०० किमी दूर बिहारच्या नवादा जिल्ह्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पुढे आले

Missing girl, body in trolley bag, Girl's body found in trolley bag near railway bridge in Bengaluru, cops initiate probe | बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण

बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण

बंगळुरू - शहरातील एका रेल्वे ब्रीज खाली एक बेवारस ट्रॉली बॅग सापडली. ज्यात एका मुलीचा मृतदेह सापडला होता परंतु त्या बॅगेतून असा कुठलाही सुगावा सापडला नाही ज्याने मृतदेहाची ओळख पटू शकेल. बॅगेत भरलेल्या मृतदेहाचा चेहरा स्पष्ट दिसत होता, याच चेहऱ्यावरून बंगळुरूहून २४०० किलोमीटर दूर बिहारच्या नवादा जिल्ह्यापर्यंत धागेदोरे जोडले गेले, जिथून १५ मे रोजी एक मुलगी गायब झाली होती.

२१ मे रोजी बंगळुरूच्या चंदापुरा रेल्वे ब्रीजखाली निळ्या रंगाची एक ट्रॉली बॅग बेवारस अवस्थेत सापडली. या ब्रिजवर बंगळुरूपर्यंत येणाऱ्या सर्व ट्रेन प्रवास करतात. सकाळची वेळ होती, तेव्हा कचरा उचलणाऱ्या एका व्यक्तीची नजर त्या बॅगेवर पडली. बॅगेत काहीतरी मौल्यवान सामान असेल त्यामुळे त्या व्यक्तीने बॅग उघडण्याचा प्रयत्न केला परंतु ती बॅग उघडली नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने बॅगेचा वरील भाग टोकदार वस्तूने कापला. जसं ही बॅग उघडली तेव्हा तो जोरात किंचाळला. त्या बॅगेत एका मुलीचा मृतदेह भरला होता. 

थोड्या वेळात बंगळुरूच्या सूर्यनगर पोलीस स्टेशनला फोन आला. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. बॅग आणि मृतदेहाचा तपास सुरू झाला परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. बॅगेत अशी कुठलीही गोष्ट नव्हती ज्यामुळे मुलीची ओळख पटू शकेल. या मृतदेहाचा चेहरा स्पष्ट दिसत होता तोच पोलिसांसाठी दिशादायक होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत सरकारी हॉस्पिटलमध्ये पोस्टमोर्टमसाठी पाठवला. ज्याप्रकारे रेल्वे ब्रीजखाली बॅग सापडली, ती पाहता गुन्हेगाराने चालत्या ट्रेनमधून ही बॅग फेकली असावी असा अंदाज व्यक्त केला. 

सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली. ज्यात मृत मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे बंगळुरूपासून २४०० किमी दूर बिहारच्या नवादा जिल्ह्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पुढे आले. १५ मे रोजी १७ वर्षीय मुलगी तिच्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिला शोधण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. त्याच काळात अचानक २३ मे रोजी सोशल मीडियावर बंगळुरूतील ट्रॉली बॅग आणि मृत मुलीचे फोटो समोर आले. ही बातमी बिहारच्या हिसुओ पोलिसांपर्यंत पोहचली. पोलिसांनी जेव्हा मुलीचा फोटो पाहिला तेव्हा ही तीच मुलगी होती जी बिहारमधून गायब झाली.

बंगळुरूत सापडलेला मृतदेह बिहारमधील निर्मल दास यांच्या मुलीचा होता. हिसुओ पोलीस तातडीने बंगळुरूला पोहचली. मृत मुलीची ओळख पटवून घेण्यात आली. पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मग या मुलीचा खून कुणी केला हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. बिहार आणि कर्नाटक दोन्ही राज्यांतील पोलिसांनी एकत्रित याचा तपास करण्याचा निर्णय घेतला. मृत मुलीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याचा दावा केला होता. त्यात आशिक कुमार नावाच्या व्यक्तीवर संशय घेतला. विवाहित आशिकची पत्नी आणि मुलगा नवादा येथे राहतात मात्र आशिक बंगळुरूत नोकरी करतो. त्यानंतर पोलिसांनी आशिक कुमारला ताब्यात घेतले. तपास केला त्यानंतर आशिक कुमारसह ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. 

नेमकं काय झाले?

बंगळुरूत जाण्यापूर्वी अल्पवयीन मुलीसोबत आशिक कुमारची ओळख झाली होती. मे महिन्यात सुट्टीसाठी आशिक घरी आला होता. त्याने मुलीला बहाण्याने बंगळुरूला आणले. हे दोघे गया जंक्शनवरून ट्रेनमध्ये बसले आणि कोलकाताला पोहचले. कोलकाताहून बंगळुरूला गेले. २० मे रोजी बंगळुरू येथे घरात आशिक कुमार आणि मुलगी एकटेच होते. तेव्हा काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात आशिक कुमारने मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मित्रांना फोन करून घरी बोलावले आणि त्यांना या मुलीने आत्महत्या केल्याचं पोलिसांना सांगा नाहीतर तुम्हाला अडकवेन अशी धमकी दिली. त्यानंतर या सर्वांनी मिळून मुलीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरला आणि रेल्वे ब्रीज खाली फेकून दिला हे तपासात उघड झाले.  

Web Title: Missing girl, body in trolley bag, Girl's body found in trolley bag near railway bridge in Bengaluru, cops initiate probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.