उत्तर प्रदेशातील गोंडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे जल महामंडळ विभागात तैनात असलेल्या एका ज्युनिअर इंजिनिअरला त्याच्याच पत्नीने त्रास दिला आहे. धर्मेंद्रने त्याच्या पत्नीने मेरठ हत्याकांडासारखी घटना घडवून आणण्याची धमकी दिल्याचं पोलिसांना सांगितलं.
धर्मेंद्र कुशवाहा म्हणाला की, त्याची पत्नी माया मौर्याने त्याला धमकी दिली होती की जर त्याने जास्त विरोध केला तर ती त्याचे तुकडे करून ड्रममध्ये भरेल. याप्रकरणी धर्मेंद्रने त्याच्या पत्नीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार दाखल केली आहे.
धर्मेंद्रची २०१२ मध्ये एका मॅगझिनच्या माध्यमातून माया मौर्याशी भेट झाली. त्यांच्यात मैत्री झाली आणि २०१६ मध्ये कुटुंबियांच्या संमतीने त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांचंही आयुष्य सामान्य होतं, पण २०२१ मध्ये त्यांना मुलगी झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली.
२०२२ मध्ये धर्मेंद्रने गोंडाच्या दिहवा ग्रामपंचायतीत एक जमीन खरेदी केली, ज्यावर घराचं बांधकाम पत्नी माया मौर्याचा दूरचा नातेवाईक नीरज मौर्या यांना देण्यात आलं. या काळात माया आणि नीरजमध्ये संबंध निर्माण झाले. कोरोना काळात नीरजच्या पत्नीचं निधन झालं होतं, त्यामुळे तो एकटाच होता.
७ जुलै २०२४ रोजी धर्मेंद्रने पत्नीला नीरजसोबत रंगेहाथ पकडलं. त्याने विरोध केला तेव्हा माया आणि नीरजने त्याला मारहाण केली आणि घरातून पळून गेले. २५ ऑगस्ट २०२४ रोजी माया नीरजसोबत परतली आणि घराचं कुलूप तोडून आत शिरली. तिने पुन्हा धर्मेंद्रवर हल्ला केला आणि सोन्याची चेन आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.