दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:03 IST2025-12-11T09:58:50+5:302025-12-11T10:03:24+5:30
या कारवाईत अनेक संशयास्पद घरांवर धाड टाकली. त्याठिकाणी आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली जात आहे.

दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
ठाणे - पडघा येथील बोरिवली गावात ईडी आणि एटीएसकडून रात्रभर छापेमारी करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कुख्यात बोरिवली गावात रात्री उशिरा ईडी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर अनेक घरांमध्ये ED, ATS अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
एका दहशतवादाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना अर्थ सहाय्य केल्याप्रकरणी ईडी, एटीएस तपास करत आहे. या तपासात पडघ्यातील बोरिवली गावात घरांवर मोठी कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांसाठी संशयास्पद पैशाची देवाण घेवाण झाली. त्याबाबत ईडीला काही माहिती हाती लागली होती. त्यातून त्यांनी बुधवारी रात्री या गावात छापेमारी केली. ईडीने महाराष्ट्र एटीएसच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई केली.
या कारवाईत अनेक संशयास्पद घरांवर धाड टाकली. त्याठिकाणी आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली जात आहे. यावर्षी जून महिन्यात एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने बोरिवली गावात छापेमारी केली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीत काही स्लीपर सेल कारवाया करत असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती. त्या आधारे या भागात एटीएसच्या पथकांची विविध प्रकारे चाचपणी सुरू होती. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचणचे नातेवाईक आणि साथीदार अशा २२ जणांची माहिती मिळाली होती. त्याच आधारावर एटीएसने २२ पथके तयार करून २ जून रोजी पहाटे २ ते ३ वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत या २२ पैकी १६ जणांची चोकशी झाली होती.
बोरिवली गाव चर्चेत का?
देशविघातक कृत्यांसाठी दुसरी फळी बोरिवलीत तयार होत असल्याची माहिती एटीएसकडे होती. त्याच्या सहकाऱ्यांकडून चिथावणीखोर आणि जिहादी भाषणे, तसेच साकीबला आदर्श मानणे आणि साकीबवरील कारवाईचा दिवस काळा दिवस पाळणे, तसेच काही स्लीपर सेलही कार्यरत असणे, अशा अनेक संशयास्पद हालचालींमुळे या ठिकाणी अनेकदा कारवाई झाली आहे. २००३ मध्ये मुलुंड, घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पहिल्यांदा हे गाव प्रकाशझोतात आले. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून साकिब नाचण आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. साकिब नाचण व त्याच्या साथीदारांनी पडघा गावाला स्वतंत्र गाव किंवा मुक्त विभाग असे घोषित केले होते, तसेच अनेक मुस्लीम तरुणांना पडघा येथे राहायला आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते.