लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 23:21 IST2020-04-18T23:18:15+5:302020-04-18T23:21:06+5:30
अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे.

लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन
देशभरातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असून केंद्र सरकारने लॉकडाउनचा दुसरा टप्पा देशभरात सुरु आहे. मात्र या निर्णयामुळे परराज्यातील मजुरांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असणारे हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. २२ मार्च रोजी पहिल्यांदा २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा रोजंदारीचे सर्व मार्ग बंद होणार असल्याने अनेक मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले. अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे. आत्महत्या करणारा छाबु हा मानसिक तणावात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला. मात्र यासंदर्भात कोणतीही चौकशी केली जाऊ नये असं छाबुच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात एफआयआरही दाखल केलेली नाही.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला. पेंटर म्हणून काम करणाऱ्या छाबुने घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी आपला मोबाईल अडीच हजार रुपयांना विकला. त्यामधून घरी अन्नधान्य घेऊन आला. मात्र नंतर घरात इतर कुटुंबीय नसताना घराचा दरवाजा आतून लावून घेत छाबुने गळफास लावून आत्महत्या केली छाबुची पत्नी पूनमने सांगितले की, मोबाईल विकून मिळालेल्या पैशामधून छाबुने घरातील लोकांसाठी अन्नधान्य आणि एक पंखा विकत घेतला. छाबु आई-वडील, चार मुले आणि पत्नीसहीत राहत होता. आमचा सर्वात लहान मुलगा पाच महिन्यांचा आहे.
मागील दोन दिवसांपासून आम्ही काहीच अन्न खाल्ले नाहीय. लॉकडाऊननंतर आम्ही अन्नासाठी शेजाऱ्यांवरच विसंबून होतो असंही पूनमने पुढे सांगितलं. छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली. छाबुची आई आणि वडील मुलांना घेऊन घरासमोरच्या झाडाखाली बसले होते. घरात कोणीही नसल्याने संधीचा फायदा घेऊन छाबुने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली.