Crime News:२० राज्यांत ४.५ लाख लोकांची आर्थिक फसवणूक; टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:26 IST2022-01-31T09:20:24+5:302022-01-31T09:26:34+5:30
Crime News: २० राज्यांतील ४,३८,८३४ लोकांची त्यांचा केवायसी अद्ययावत करून देण्याच्या नावाखाली त्यांच्या बँकेचा तपशील मिळवून फसवणूक केल्याचा या टोळीवर आरोप असून, या टोळीविरोधात किमान १७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Crime News:२० राज्यांत ४.५ लाख लोकांची आर्थिक फसवणूक; टोळी जेरबंद
भुवनेश्वर : झारखंडच्या जामतारातील ३ जणांच्या टोळीला पोलिसांनी येथील रसूलगड भागात अटक केली. २० राज्यांतील ४,३८,८३४ लोकांची त्यांचा केवायसी अद्ययावत करून देण्याच्या नावाखाली त्यांच्या बँकेचा तपशील मिळवून फसवणूक केल्याचा या टोळीवर आरोप असून, या टोळीविरोधात किमान १७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. अटक झालेल्यांची नावे प्रधून कुमार मंडल (२०), कृष्णा कुमार मंडल (१९) आणि छेट लाल मंडल (२८) अशी आहेत.
या टोळीने केलेल्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा जवळपास २ वर्षांपासून करीत असताना, ही टोळी फारशी शिकलेली नसतानाही जे ऐषारामी आयुष्य जगत असल्याचे शेजाऱ्यांना दिसल्यावर पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचले. नियमित उत्पन्न नसतानाही या टोळीने डिसेंबर, २०२१ पासून इमारतीचा सगळ्यात वरचा मजला खूप मोठे भाडे देऊन घेतला होता.
टोळीकडून क्रेडिट कार्ड फसवणूकही
हे लोक नियमितपणे कार्यालयात जाताना या शेजाऱ्यांनी पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाबद्दल शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ही टोळी लोकांची यूपीआय, क्रेडिट कार्ड आणि इतर प्रकारची फसवणूक करायची. भुवनेश्वरमध्ये त्यांचे नेटवर्क होते, असे पोलिसांनी सांगितले.