Crime News in Marathi: आता जगायची इच्छा राहिली नाहीये. अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा, अशी हातावरच शेवटची इच्छा लिहून १९ वर्षीय शिखाने आत्महत्या केली. शिखाने घरातच गळफास घेतला. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील परास गावामध्ये ही घटना घडली. या घटनेने सगळे हळहळले.
शिखाचे वडील गुजरातमध्ये कामाला आहेत. आई शेतात गेलेली असताना शिखाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
अभिषेकच्या मृत्यूचा धक्का
पोलिसांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी १९ वर्षीय शिखाच्या चुलत भावाचे निधन झाले. अभिषेक असे त्याचे नाव असून, दिल्लीत साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा शिखाला धक्का बसला. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
हातावरच लिहिली सुसाईड नोट
शिखाचा मृतदेह बघताना तिच्या हातावर मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांना दिसले. तिने हातावरच सुसाईड नोट लिहिलेली होती.
"माझ्या मृत्युचेही काहीही कारण नाहीये. फक्त जगण्याची इच्छाच राहिली नाहीये. अभिषेकच्या शेजारीच मलाही जाळा. राणूलाही बोलवा. आई चिंता करू नकोस. मी मेल्यावर कल्लूची काळजी घे", असे शिखाने हातावर लिहिलेले होते.
शिखाने सुसाईड नोटमध्ये राणूचाही उल्लेख केलेला आहे. राणूसोबतच १९ वर्षीय शिखाचे लग्न ठरले होते.