रक्तचंदन तस्करी प्रकरणी एकास मीरारोडहून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 19:49 IST2019-11-08T19:47:23+5:302019-11-08T19:49:03+5:30
नक्षली व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

रक्तचंदन तस्करी प्रकरणी एकास मीरारोडहून अटक
मुंबई - कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ पोलिसांनी शहजाद आलम सय्यद (३८) याला मीरारोडहून अटक केली आहे. या प्रकरणातील हा सहावा आरोपी आहे. या तस्करीत त्याची दलालाची भूमिका होती. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिसांनी यापूर्वी केलेल्या पाच जणांच्या अटकेनंतर यातील एक आरोपी मीरारोड परिसरात रहात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहजादला बुधवारी अटक केली. या तस्करीमागे नक्षली व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूझ परिसरात एक टोळी रक्तचंदनाची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सांताक्रूझ येथे दोन टेम्पोवर कारवाई करत असगर इस्माईल शेख (४९), अली शेख (३२) आणि वाजिद अब्बा अन्सारी(३२) यांच्यासह १५५६ किलोे रक्तचंदन हस्तगत केले होते. हे रक्तचंदन आंध्र प्रदेशच्या जंगलातून चेन्नईला आणि चेन्नईमार्गे मुंबई व इतर ठिकाणी पाठवलं जात असे. पोलिसांनी तपासात पुढे पोलिसांनी मोहम्मद अली मोहम्मदीन (३२), दिलीप कुमार जैन उर्फ मनोज (५६) या दोघांनाही अटक केली.