हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:44 IST2025-08-05T13:43:28+5:302025-08-05T14:44:07+5:30
पश्चिम बंगालमध्ये हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर रेल्वेचा मोठा अपघात टळला.

हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या
India Railway Accident: पश्चिम बंगालमध्ये रेल्वे मोठा अपघात टळला. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूर पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी हा अपघात होता होता वाचला. अज्ञातांनी हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या मार्गावरील ट्रॅकमध्ये छेडछाड केली होती. जवळपास रेल्वे रुळांशी छेडछाड करून मोठा अपघात घडवण्याचा कट रचण्यात आला होता. पण रेल्वेतील कर्तव्यावर असलेल्या किमॅनच्या सतर्कतेमुळे वेळीच धोका टळला.
सोमवारी मनोहरपूरच्या घाघरा गावाजवळ ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या कीमनला रेल्वे ट्रॅकच्या पेंड्रोल क्लिप्स - ज्याला रेल्वे लाईनची चावी म्हणतात त्या दोन किमीपर्यंत काढून टाकण्यात आल्या होत्या. पेंड्रोल क्लिप्स लाईनवरून काढून एका ठिकाणी फेकण्यात आल्या होत्या. ही घटना रेल्वेच्या पोल क्रमांक ३६४/१ए ते ३६६/११ए दरम्यान घडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, किमॅनने ताबडतोब जवळच्या स्टेशन मास्टरला कळवले.
पेंड्रोल क्लिप्स लाईनवरून काढल्याचे कळताच विभागीय मुख्यालयात खळबळ उडाली. तातडीने कारवाई करत, सकाळी ११:२३ वाजता गोइलकेरा आणि मनोहरपूर दरम्यान तिसऱ्या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या. त्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी, पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान, काढून टाकलेल्या पेंड्रोल क्लिप्स एकत्र गोळा करून खांब क्रमांक ३६६/५अ जवळ टाकण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आणि काही तासांनंतर तिसऱ्या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
रेल्वे ट्रॅकवरुन गाड्या जाताना पेंड्रोल क्लिप्स हा एक महत्त्वाचा भाग आहे. जर पेंड्रोल क्लिप्स नसताना ट्रेन गेली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. ज्या भागात ही घटना घडली तो सारंडा या नक्षलग्रस्त भागात येतो. रविवारीही नक्षलवाद्यांनी करमपाडा येथे स्फोट घडवून रेल्वे ट्रॅक उडवून दिला होता, ज्यामध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पेंड्रोल क्लिप काढून टाकण्याची घटनाही नक्षलवाद्यांनी घडवली का असा प्रश्न विचारला जात आहे.