"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:35 IST2025-06-21T17:34:03+5:302025-06-21T17:35:04+5:30
प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही.

"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
सोलापूर - अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार यांच्या एकत्र आत्महत्येच्या घटनेला अश्विनीची आणि त्याच्या जीवलग मित्राची ताटातूट, त्याचे दुसऱ्या युवतीशी निर्माण झालेले स्नेह, नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेले संबंध ही पार्श्वभूमी आहे. अश्विनीने नैराश्यातून आत्महत्या करण्याचं ठरवले. त्यामुळे आधीच घरातील नातेसंबंधाची गोपनीय भावनिक माहिती समजल्यामुळे कमालीचा निराश झालेल्या रोहितनेही तिच्याबरोबरच एकाच स्कार्फला गळफास घेऊन जीवन संपवले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
खरेतर शाळेपासूनचे सहा मित्र आणि त्यांच्या मैत्रिणीची ही गोष्ट...त्यातील रोहित अन् अश्विनी एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. रोहितचा जवळचा मित्र आदित्य होता, तो अश्विनीचा जीवलग मित्र बनला पण दीड वर्षापासून अश्विनीची तिच्या जीवलग मित्रापासून ताटातूट झाली. त्याच दरम्यान आदित्यला जीवलग मैत्रिण मिळाली. रोहितचा दुसरा मित्र राज यालाही एक मैत्रिण होती. आदित्यचा दुरावा अश्विनीला सहन होत नव्हता. यामुळे ती त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलण्यासाठी प्रयत्न करत होती. यासाठी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही.
वारंवार मित्र मैत्रिणींमध्ये भांडण होत असल्याने ग्रुपमधील सहा जणांनी ८ जून रोजी रुपाभवानी मंदिर परिसरात बैठक घेतली. या बैठकीत भांडणाचे मूळ कारण अश्विनीच असल्याचे कळालं, त्यानंतर ग्रुपमधील चार जणांनी रोहित आणि अश्विनीचा मोबाईल ब्लॉक केला अन् संबंध तोडून टाकले. यामुळे रोहित आणि अश्विनी कमालीचे तणावात गेले होते. जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा अन् नंतर सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने थेट आत्महत्या करण्याचे ठरवले. रोहित हा कर्णिकनगरमधील एका घरामध्ये असताना अश्विनी तिथे आली. तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काही ठाऊक नसलेली भावनिक माहिती कळाली. त्यामुळे तो आधीच तणावात होता. त्यानंतर मित्रांनी संबंध तोडून दिल्याने तणाव आणखी वाढला होता. याचवेळी अश्विनीने आणि रोहितने एकाच स्कार्फला गळफास घेत स्वत:ला संपवले.
माझ्या भांगेत कुंकू भर
आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहलेल्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे. हे तू ओळखायला हवे होते, यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असे अश्विनीनं चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चौघांचा जबाब नोंदविला
रोहित अन् अश्विनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या चार मित्र मैत्रिणींचा जबाब -नोदविला आहे. उद्या मयतांना आई -वडिलांना बोलावून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली. दरम्यान रोहितवर दुपारी रूपाभवानी हिंदू स्मशानभूमीत; तर अश्विनीवर रूद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचे पालक अन् नातेवाईकांनी आक्रोश केला.